म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद विकासनिधीचे वाटप समप्रमाणात करा, या मागणीसाठी संबळ वाजवत भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. जिल्हा परिषदेतील भाजपच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सकाळी अकरा वाजता झेडपीच्या प्रशासकीय इमारत आवार परिसरात आंदोलनास सुरुवात केली. भाजपचे गटनेते शिवाजी पाथ्रीकर, सदस्य एल. जी. गायकवाड, मधुकर वालतुरे, जितेंद्र जैस्वाल, रामदास परोडकर, पुष्पा काळे, श्याम बनसोडे, रेखा नांदुरकर, प्रा. सुरेश सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी भारूड, भजनही सादर केले. जिल्हा परिषद अंतर्गत ३०५४, ५०५४, उपकर, जिल्हा वार्षिक योजना, एमआयएन सहा सिंचन आदी लेखाशिर्षाकाखाली सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आर्थिक वर्ष सुरू होऊन सहा महिने लोटले. मात्र, या निधीचे नियोजन झालेले नाही. यावरून स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभेतही मोठी चर्चा झाली. २५ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षांनी सर्व सभासदांना विश्वासात घेऊन नियोजन केले जाईल, असे आश्वासन दिले. वेळेत नियोजन न झाल्यास हा निधी अर्खचित राहण्याची दाट आहे. त्यामुळे झेडपी अंतर्गत प्रत्येक तालुक्याच्या भौगिलिक रचनेनुसार निधी वाटप होणे गरजेचे आहे, पण शासन आदेशानुसार गतवर्षी निधीचे त्या प्रमाणात वाटप झाले नाही, असा आरोप करत आंदोलकांनी विकासनिधीच्या समान वाटपाची मागणी केली. \Bउपाध्यक्षांची शिष्टाई सफल \Bजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशव तायडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे सदस्य रमेश गायकवाड आदींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. सायंकाळी प्रशासनातर्फे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी भाजप सदस्यांची भेट घेत ११ ऑक्टोबरला बांधकाम समितीची बैठक आहे. निधीचे योग्य वाटप होईल, असे आश्वासन दिले. त्यावर समाधान झाल्याने भाजप सदस्यांनी आंदोलन स्थगित केले. बैठकीत निधीचे योग्य वाटप नाही झाल्यास १२ तारखेपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट