म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद 'लेखन मुक्त मनाने करण्याची गोष्ट असताना सामाजिक दबाव लेखकांसाठी अडसर ठरत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणी कुणाला उचलून देण्याची गोष्ट नाही. पण, हल्ली वैचारिक मतभिन्नता तुम्हाला देशद्रोही ठरवत आहे. आपण सगळेच सवंग व बुद्धिहीन प्रतिकांचे व उन्मादाचे बळी ठरत आहोत,' अशी खंत ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांनी व्यक्त केली. 'रानगंध' साहित्य पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या. पळसखेडे येथील महात्मा फुले सार्वजनिक ग्रंथालय आणि मंगला व रामलाल घुनावत आर. जी. इंडस्ट्रीज, ठाणे यांचा पहिला 'रानगंध' साहित्य पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना प्रदान करण्यात आला. मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर ज्येष्ठ कादंबरीकार श्याम मनोहर, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कवयित्री अनुराधा पाटील, प्रसिद्ध समीक्षक चंद्रकांत पाटील, दिलीप धोंडगे आणि बाळासाहेब महानोर यांची प्रमुख उपस्थिती होती. पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या सन्मानार्थ त्यांच्या वाढदिवशी दरवर्षी 'रानगंध' पुरस्कार दिला जाणार आहे. ४५ वर्षे कविता लेखनात मोलाचे योगदान दिल्याबद्दल अनुराधा पाटील यांना श्याम मनोहर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंर अनुराधा पाटील यांनी काव्य लेखन आणि सद्यस्थितीवर भाष्य केले. 'कवितेच्या पातळीवर जे वाटते ते लिहिले. माझे मानदंड ठरवून लिहित गेल्याने दृष्टी भिन्न झाली. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न गंभीर आहे. या उन्मादातून बहुजनांच्या साध्या परंपराही सुटल्या नाहीत. श्रद्धेचा भाग असलेली वारी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होती. ही आध्यात्मिक मार्गाने समानता सांगणारी वारी कुठे दिसत नाही. चार मिनिटे वारीला खांदा देऊन सेल्फी काढणारे नेते आणि कचरा तेवढा दिसतो. सणावारांचा आणि परंपरांचा असा इव्हेंट झाला आहे. राजधर्माच्या नावाखाली त्याला बिनबोभाट पाणी घातले जात आहे. अशा परिस्थितीत साहित्यातही हाताला काही दर्जेदार लागत नाही,' असे पाटील म्हणाल्या. \Bपुरस्कार का महत्त्वाचा ? \B'पुरस्कारामुळे आपल्या लेखनात काही बदल घडतो असे वाटत नाही. पण, तुम्हाला आनंद आणि समाधान देणारी ही गोष्ट असते. शिवाय, पुरस्कार मिळाल्यानंतर सजग व गंभीर होऊन वाड्मयीन जाणिवा कशा विस्तारतील हा विचार करता येतो' असे अनुराधा पाटील म्हणाल्या. वाचन संस्कृतीवर श्याम मनोहर यांनी विचार मांडले. 'भारतातील प्रत्येक गावात एक वाचनालय असावे. भारत हा वाचणाऱ्यांचा देश आहे, अशी ओळख व्हावी असे वाटते. पण, वाचनसंस्कृतीवर कुणी काहीच बोलत नाही. ही संस्कृती इतकी क्षीण आहे की तिच्यावर कुणीच पुस्तक लिहिले नाही. कविता, कादंबरी, वृत्तपत्र कसे वाचावे याचे धडे द्यावे. कारण, प्रत्येकाचे वाचन वेगळे असते' असे मनोहर म्हणाले. नरेंद्र चपळगावकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. श्रीधर नांदेडकर यांनी पाटील यांच्या काव्य लेखनावर भाष्य केले. मनोज बेलपत्रे यांनी सन्मानपत्र वाचले. बाळासाहेब महानोर यांनी प्रास्ताविक आणि रवी कोरडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट