म. टा. प्रतिनिधी, बीड
'कष्टकरी समाजासोबत दसरा साजरा करण्याची शिकवण मला भगवानबाबा व गोपीनाथ मुंडे यांनी दिली आहे. दसरा मेळव्यानिमित्त भगवान बाबा आज नगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात सीमोलंघन करून सावरगाव येथे दाखल झाले आहेत,' असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. आता सावरगावचे स्मारक 'भगवान भक्तीगड' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
सावरगाव येथील दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, आज स्टेजवर डाव्या बाजूला लोकनेते आणि उजव्या बाजूला संत-महंत बसले आहेत. एवढी शक्ती माझ्यासोबत आहे की, शंकराचार्य, शिवाचार्य, संत तुकाराम महाराजांचे वंशज, नामदेव महाराजांचे वंशज, वारकरी संतपीठाचे प्रकाश महाराज बोधले हे स्मारकाच्या निमित्ताने आशीर्वाद देण्यासाठी सावरगाव येथे आले आहेत. माझ्या जीवनात शब्दाला महत्त्व आहे. मागच्या वर्षी तुमच्या साक्षीने मी सांगितले होते की, भगवान बाबांच्या स्मारकाची एका वर्षात उभारणी करेल. तेंव्हा काही लोकांनी टीका केली. प्रश्न निर्माण केले की, ताई सावरगाव येथे कशामुळे स्मारक करत आहेत? मी सांगितले की धौम्य गडावर ज्याला भगवानगड म्हणून ओळखले जाते तिथे भगवान बाबा राहत होते ती त्यांची कर्मभूमी आहे. त्यांची जन्मभूमी सावरगाव आहे. भगवान बाबांच्या शिष्यानी बनवलेला हा भगवान भक्तीगड आहे. आता सावरगावचे स्मारक 'भगवान भक्तीगड' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. दरवर्षी भगवानभक्ती गडावर यायचे. मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत तिला घेऊन यायचे आणि एक धागा तिच्या हातात बांधायचा. दर दसऱ्याला भक्तीचा धागा बांधण्यासाठी इथे यायचे. इथून आपली पुढील दिशा ठरणार आहे, असे त्या म्हणाल्या.
'मी आज तुमच्यामुळे सरकारमध्ये मंत्री आहे. तुमच्यामुळे मी ग्रामविकास मंत्री म्हणून विकासाची गंगा आणत आहे. सरकार आल्यानंतर जलयुक्त शिवार योजना सुरू केली. त्यामधून मधून हजारो टँकर बंद केले. दोन वर्षात अडीच लाख लोकांना घरे दिली. एवढा निधी कधीच मिळाला नाही. प्रत्येक गावात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ग्रामपंचायत कार्यालय दिले. एक रुपया न घेता शिक्षकांना बदल्या करून दिल्या,' असे त्या म्हणाल्या. संत नामदेव महाराजांचे वंशज महादेव महाराज नामदार यांनी त्यांच्या आशिर्वादपर भाषणात पंकजा मुंडे राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात, असे आशीर्वाद दिले. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. पदावर बसण्यापेक्षा आपल्या विचाराचे सरकार आणणे महत्त्वाचे आहे. पदावर बसणाऱ्या व्यक्तीमागे पंकजाचेही योगदान असावे असे वाटते, असे त्या म्हणाल्या. संतपीठाचे प्रकाश महाराज बोधले यांनी सावरगावचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पंकजा मुंडे यांचे नाव लिहिले जाईल, असे मत व्यक्त केले.
.....
\Bमाणसे पाहून उमेदवारी \B
भाजपचे आमदार आणि खासदार यांच्या कामगिरीच्या सर्वेक्षणात बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची जागा धोक्याची दाखवण्यात आल्याचे वृत्त माध्यमात आले. मात्र कुठल्याही निवडणुकीची उमेदवारी ही सर्वेक्षणाच्या निष्कर्षावर दिली जात नाही, तर माणूस पाहून दिली जाते. आमच्यामागे लोकांचा पाठिंबा हा घटक महत्त्वाचा आहे. सर्वेक्षण कुणाला पहायचा असेल, तर आज येथे पाहा, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाकडे निर्देश केला. आमच्यासाठी कोणतीही धोक्याची घंटा नाही, तर २०१९ मध्ये पुन्हा आम्हीच विजयाची घंटा वाजवणार. देशात आणि राज्यात पुन्हा भाजपची सत्ता स्थापना करण्याची भगवान बाबांच्या जन्मस्थळ शपथ घेत आहे, असे त्या म्हणाल्या.
.....
\Bस्वागतासाठी नियत चांगली लागते: खा. मुंडे
\B
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्या म्हणाल्या की, वर्षभर या दिवसाची वाट पंकजाताई काय सांगणार यासाठी पाहिली जाते. यावर्षी भगवान बाबांची देखणी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या मेळाव्यास देशाच्या विविध भागातून भाविक आले. यापूर्वी हा दसरा मेळाव्याचा मान नगर जिल्ह्याला मिळत होता. तो आता बीड जिल्ह्याला मिळाला आहे. बीडची खासदार म्हणून उपस्थित भाविकांचे मी स्वागत करते. भगवान बाबांच्या शिकवणीवर चालण्यासाठी आठवण करून देणारा हा दिवस आहे. नेते मंडळी घोषणा करतात पण त्याचे पालन अनेकदा करीत नाही. पण पंकजाताईंनी स्मारकाचा शब्द दिला आणि स्मारकाचे काम पूर्णत्वास नेले आहे. मी या स्मारकासाठी गोपीनाथगडावरील गुलाबाची फुले भगवान बाबांच्या चरणी अर्पण करण्यासाठी घेऊन आले आहे. सावरगावकरांनी गेल्यावर्षीपासून मुंडे साहेबांच्या कन्या म्हणून आमचे स्वागत केले. स्वागत करण्यासाठी ऐपत नाही, तर नियत चांगली लागते.