म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद कर्णपुरा परिसरातील किमान २० ते २५ वर्षांचे भले मोठे झालेले झाड केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि कुठल्याही परवानगीशिवाय सहा ऑक्टोबर रोजी परस्पर तोडून टाकण्यात आले. त्यानंतर या वृक्षतोडीची तक्रार उशिरा का होईना छावणी परिषदेकडून छावणी पोलिस ठाण्यात देण्यात आली खरी, परंतु अजूनही छावणी पोलिस ठाण्यात यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. घटनेच्या तब्बल दोन आठवड्यानंतरही गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होत आहे. कर्णपुरा यात्रा जिथे भरते, त्या परिसरातील हे मोठे झाड अचानक तोडण्यात आले आणि या संबंधी 'मटा'ने ठळक वृत्त प्रकाशित केले होते. मोठ्या वृक्षाच्या तोडीनंतरही छावणी परिषदेकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप झाल्यानंतर व परिषदेवर दबाव वाढल्यानंतर परिषदेने छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. अर्थात, तक्रार देऊनही अनेक दिवस लोटले असून, वृक्षतोडीच्या घटनेला १५ दिवस पूर्ण झाले आहे. त्यानंतरही ना वृक्ष तोडणाऱ्याविरुद्ध काही कारवाई झाली आहे, ना या प्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्णपुरा यात्रेचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारानेच हे झाड तोडले आहे. मात्र या प्रकाराविरुद्ध कारवाई करण्याऐवजी हा गुन्हा दडपला जात असल्याचाही आरोप होत आहे. हितसंबंधांमुळे या प्रकारावरच पांघरुण घातले जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात छावणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांना विचारले असता, 'या विषयीची तक्रार पोलिस ठाण्यात आलेली आहे व याबाबत कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, यासाठी वन विभागाचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यातही आले. लवकरच याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल.' \Bपरिषदेकडूनही टोलवाटोलवी\B छावणी परिषदेकडून पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्याआधी ही तक्रार कोणी द्यायची, यावरूनही परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी सुरू होती. लिपिक; तसेच स्वच्छता निरीक्षकामध्ये ही टोलवाटोलवी सुरू होती. परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्र काढल्यानंतरच ही तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आल्याचे समोर येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट