म. टा. विशेष प्रतिनधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक वारसा असणारी स्मारके संरक्षित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले आहेत. महापालिका आणि राज्य सरकारला या स्मारकाच्या देखरेखीसाठी आणि संरक्षाणासाठी पुरेसा निधी देण्यासही सांगितले आहे. त्यासाठी चार महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणासह वारसा स्थळांच्या परिसरात असलेली आठ धोकादायक पेट्रोल पंप शहराबाहेर हलविण्याचे विनंती करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते शहीद अस्लम गुलाम अहमद यांनी केली होती. कायद्यानुसार पुरातत्वीय संरक्षित स्थळे, शासकीय आणि सार्वजनिक कार्यालये यांच्याशेजारी पेट्रोल पंप असू नये आणि दोन पंपामध्ये एक किलोमीटर अंतर आवश्यक आहे. असे असतानाही शहरातील आठ पेट्रोल पंप कायद्याचा भंग करीत आहेत. त्यांना शहराबाहेर हलविण्याची विनंती याचिकाकर्त्याचे वकील कृपा दक्षिणी यांनी केली होती. हे पेट्रोल पंप प्राचीन ऐतिहासिक वारसास्थळाला धोकादायक आहेत त्याविषयी विचार करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करून कोर्टाने त्या काढण्याच्या किंवा स्थलांतरीत करण्याचा चेंडू पालिका आणि राज्य सरकारकडे टोलविला आहे. त्यांनाच यासंदर्भात कायद्याला धरून निर्णय देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पेट्रोल पंपाच्या बाजूला अस्तित्वात असणाऱ्या रस्त्याची रुंदी किमान १२ मीटर असली पाहिजे. शाळा आणि हॉस्पिटल हे संरक्षित ठेवण्याची गरज आहे. अंतराविषयी स्वतंत्र नियम राज्य शासनाने तयार केलेले नाहीत. आधीपासूनच बनिवलेल्या नियमानुसार परवानगी दिली जाते. असे मतही कोर्टाने नोंदविले आहे. केंद्राच्या नियमानुसार हे अंतर १०० मीटर असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्राधिकरणाने पेट्रोल पंप बंद करण्यासाठी किंवा ते हलविण्या संदर्भात कोणतेही पाऊल उचचले नाही.
आज औरंगाबाद शहरात ५२ पैकी १३ दरवाजे अस्तित्वात आहे. हे सर्व दरवाजे ऐतिहासिक आहेत. दिल्ली, मकाई, पैठण आणि रोशन गेट ही दरवाजे चारही दिशांना आहेत. किले अर्क दरवाज्याचे अस्तित्व वेगळे आहे. भडकल, रंगीन, दिल्ली आणि नौबत या ऐतिहासिक दरवाजांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हिंदुस्तानचे सम्राट औरंगजेबचा या शहराला इतिहास आहे. त्यांनी राज्य केलेला कालावधीही कमी नाही. त्यांच्या कारकीर्दीतच शहर विकसित झाले. औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक वारसास्थळे ही एकतर राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहेत किंवा महापालिकेच्या. या वारसास्थळांकडे राज्य सरकार आणि महापालिकाने योग्य ते लक्ष दिले नाही, असे मतही कोर्टाने व्यक्त केले आहे. या सर्व वारसास्थळांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले जाऊ शकते, परंतु त्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची गरज आहे. पेट्रोल कंपन्यांकडे उदासिनतेचा दृष्टीकोन आहे.
प्राचीन स्मारकाच्या सरंक्षणासाठी राज्याने पाऊल उचलणे आवश्यक आहे. सध्याच्या आक्षेपार्ह आणि धोकादायक व्यवसायांच्या बाबतील सुरक्षा उपाय करणे आवश्यक आहे. या याचिकेत सिडकोतर्फे अजय देशपांडे, शासनातर्फे महेंद्र नेरलीकर, महापालिका तर्फे जैन शहा, राज्य पुरातत्व तर्फे आनंद भंडारी, पंप चालकातर्फे एस. व्ही. कुलकर्णी, अंजली दुबे-वाजपेयी आिण केंद्र शासनातर्फे संजू देशपांडे यांनी काम पाहिले.
जाफरगेट जवळील अशोक ब्रदर्सच्या (सध्या खलील चौधरी यांच्याकडे ताबा) पेट्रोल पंपाला आग लागली होती. या आगीमुळे किंवा अन्य बाबींमुळे ऐतिहासिक वारसास्थळांना धोका पोहोचू शकतो. त्यामुळेच ही याचिका केली होती.
- शाहीद अस्लम गुलाम अहमद, याचिकाकर्ते