शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांचे आवाहन म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद - बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून रोजगार निर्मितीकडे लक्ष द्या, दुष्काळ निर्मूलनाच्या कामातही हातभार लावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळातर्फे बिझनेस एक्स्पोच्या अंतर्गत 'महा एक्स्पो' या व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते गुरुवारी झाले, तेव्हा त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. पशुसंवर्धन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, माजी अध्यक्ष रंगनाथ काळे, प्रदीप सोळुंके, अंबादास दानवे, व्दारकादास पाथ्रीकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिन मुळे यांची यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. 'व्यवसाय हा महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्रातील जनता व्यवसायात जास्त नाही. बीव्हीजी कंपनीचे उदाहरण देताना त्यांनी या कंपनीने महाराष्ट्राचा झेंडा दिल्लीत फडकवला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे सुप्रिया यांनी सांगितले. मनावर घेतले तर मराठी माणूस चांगला व्यवसाय करू शकतो, असा उल्लेख त्यांनी केला. मराठी माणसाचे पाऊल बाकी ठिकाणी पुढे असते, व्यवसायात देखील ते पुढेच पडले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जीएसटीमध्ये केल्या जाणाऱ्या सततच्या बदलाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बदलांमुळे व्यावसायिकांना त्रास होत आहे, असे सुळे म्हणाल्या. महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक यावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा संदर्भ त्यांनी भाषणात दिला. राजस्थानच्या मुख्यमंत्री राजस्थानीच साडी नेसतात, हा त्यांचा मार्केटिंगचा मुद्दा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या राज्यात टेक्सटाईल इंडस्ट्रीचा विकास झाला पाहिजे, अशी सूचना सुळे यांनी अर्जुन खोतकर यांना केली. निवडणुकीत टोकाचा विरोध करा, पण त्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करा, असे त्या म्हणाल्या. अर्जुन खोतकर, राजेश टोपे यांची यावेळी भाषणे झाली. हरिभाऊ बागडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. गणेश शिंदे यांनी केले. पुष्पा काळे, राम पवार, प्रदीप सोळुंके यांचीही यावेळी भाषणे झाली. 'महा एक्स्पो' या प्रदर्शनात १४० स्टॉल्स आहेत आणि हे प्रदर्शन शहानुरवाडी येथील श्रीहरी पॅव्हेलियनच्या परिसरात २८ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट