म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद बिले थकल्यामुळे माजी सैनिकांची वाहने संकटात सापडली आहेत. त्याचा परिणाम म्हणून नागरिक मित्र पथक चार चाकीवरून दुचाकीवर येणार आहे. दुचाकीवरून गस्तीची कामे कशी करणार, असा प्रश्न माजी सैनिकांच्या समोर निर्माण झाला आहे. महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या कल्पनेतून माजी सैनिकांचे नागरिक मित्र पथक स्थापन करण्यात आले आहे. नऊ झोन कार्यालयांसाठी नऊ पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. एका पथकात नऊ माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका पथकाला एक टाटा सुमो गाडी देण्यात आली आहे. या गाडीतून पथकातील माजी सैनिकांनी त्यांच्या त्यांच्या झोन कार्यालयाच्या क्षेत्रात गस्त घालावी. कचरा जाळणाऱ्यांवर प्रतिबंध घालावा, प्लास्टिक बंदीसंदर्भात कठोर कारवाई करावी, कचरा वर्गीकरणाबद्दल जनजागृती, अशी कामे माजी सैनिकांना देण्यात आली आहेत. पाच सप्टेंबर रोजी नागरिक मित्र पथके कार्यान्वित करण्यात आली. दीड ते पावणेदोन महिन्यात या पथकांना घरघर लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; नागरिक मित्र पथकांना देण्यात आलेल्या चारचाकी वाहनांची बिले थकली आहेत. एका वाहनाचे एका महिन्याचे भाडे ३२ हजार रुपये आहे. नऊ वाहनांचे भाडे दोन लाख ८८ हजार रुपये आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे वाहनांचे भाडे थकल्यामुळे वाहने बंद करण्याचा इशारा संबंधित एजन्सीने दिला आहे. चारचाकी वाहने बंद झाल्यास माजी सैनिकांना दुचाकी वाहने देण्याचा विचार पालिकेचे प्रशासन करीत आहे. दुचाकी वाहनावरून गस्त घालताना टीमवर्क राहणार नाही व नागरिकांकडून त्रास होईल, अशा भावना व्यक्त होत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट