म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद भगवान फार्मसी कॉलेज, औरंगाबाद येथे एआयसीटीई मानकानुसार त्रुटी आढळून आल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे स्थलांतर करणेबाबतची प्रक्रिया एआयसीटीई व सहसंचालक तंत्रशिक्षण औरंगाबाद यांनी चालू केली होती. या स्थलांतराला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. मंगेश पाटील यांनी अंतरिम स्थगिती दिल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. भगवान महाविद्यालयाच्या रेणुका आंबेकर, पूजा वारे व इतर विद्यार्थी प्रतिनिधींनी ३०९ विद्यार्थ्यांच्या वतीने याचिका दाखल केली. त्यामध्ये या विद्यार्थ्यांना याच कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुभा द्यावी अशी विनंती केली होती. विद्यार्थ्यांपाठोपाठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबावावे व महाविद्यालयावर प्रशासक नियुक्ती करावी ही विनंती करत वेगळी याचिका केली. कर्मचाऱ्यांच्या प्रकरणामध्ये एआयसीटीई, राज्य शासन, तंत्रशिक्षण संचालनालय, विद्यापीठ व महाविद्यालय यांना नोटीस बजावली. 'महाराष्ट्र टाइम्स'ने बातमी ही २५ सप्टेंबर रोजी सर्वप्रथम प्रसिद्ध केली तेव्हा एकच खळबळ माजली. 'मटा'ने या बातमीचा कायम पाठपुरावा केला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पुढील काही दिवसात होणाऱ्या अंतर्गत व विद्यापीठाच्या परीक्षा यांचा तसेच राष्ट्रीय स्तरावर होऊ घातलेल्या गेट, जी-पॅट, नाईपर, इ बाबत कुठलाही विचार करण्यात आला नाही. सदर निर्णय घेताना एआयसीटीई व शासकीय अधीकारी यांनी फक्त महाविद्यालय प्रशासनास त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली, परंतु महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांना ती संधी दिलेली नव्हती. भगवान फार्मसी कॉलेज, औरंगाबाद महाविद्यालयाची एआयसीटीईने मान्यता रद्द करून इतर पर्यायी व्यवस्थेचा विचार न करता व लागू असणाऱ्या नियमाच्या विचार न करता शैक्षणीक वर्षाच्या मध्यावधीतच विद्यार्थ्यांचे स्थलांतर करणेबाबत महाराष्ट्र शासनास कळविले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार इतर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे दिसून आले. तसेच काही अपवाद वगळता इतर महाविद्यालयामध्ये उपलब्ध पायाभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याचे तसेच मुलीच्यासाठी वसतिगृहाची सोय नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सदरील महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगानुसार नियमित वेतन देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेले होते. मात्र, या आदेशांची पूर्तता करण्यास व विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा पुरविण्यास महाविद्यालय प्रशासनाने एआयसीटीईला नकार लेखी स्वरुपात कळविला होता. परंतु प्रशासक नियुक्तीची नामुष्की टाळण्यासाठी आश्चर्यकारकरित्या महाविद्यालय प्रशासनाने माघार घेत कॉलेज चालविण्यास न्यायालयाला होकार दिला. डॉ. भागवत कराड व डॉ. राजीव खेडकर हे या संस्थेचे अनुक्रमे कोषाध्यक्ष व सचिव आहेत. \B...तर निर्णयाचा फेरविचार \Bभगवान फार्मसी महाविद्यालयाने विधापीठाची संलग्नता घेण्यासाठीची शुल्क भरलेली नाही. त्यामुळे महाविद्यालयाकडून संलग्नता शुल्क आकारून विधापीठाने संलग्नतेबाबत नियमानुसार कार्यवाही असेही न्यायालयाने यात नमूद केले आहे. तसेच एआयसीटीईनेसुद्धा त्यांच्या अटींची पूर्तता केल्यास व येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याना नियमानुसार पूर्ण वेतन दिल्यास महाविद्यालयाच्या मान्यतेबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास तयार असल्याचे न्यायालयास लेखी उत्तरात सांगितले. त्यामुळे येथील विद्यार्थी व महाविद्यालयाच्या कर्मचारी यांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. दिवाळीच्या सुट्टीनंतर या प्रकरणाची सुनावणी होईल. याचिकाकर्त्यांतर्फे पी. आर. कात्नेश्वरकर व पुष्कर शेंदुर्णीकर यांनी बाजू मांडली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट