म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळेच शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेत आणीबाणी निर्माण झाली आहे, असा आरोप नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी 'मटा' राउंड टेबलमध्ये केला. सध्याची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी विशेषाधिकारी नियुक्त केला जाईल, अशी घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी यावेळी केली.
जायकवाडी धरणात मुबलक पाणी असताना औरंगाबाद शहरात मात्र पाणी पुरवठ्यात अभूतपूर्व समस्या निर्माण झाल्या आहेत. काही भागात तीन दिवसांआड, तर काही भागात सात-आठ दिवसांच्या नंतरही पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांच्या रोषामुळे नगरसेवकही आक्रमक झाले आहेत. पाणी पुरवठ्यात सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने काय करता येईल यावर साधकबाधक चर्चा होऊन मार्ग निघण्याच्या उद्देशाने 'मटा' तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राउंड टेबलमध्ये महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर भगवान घडमोडे, माजी सभापती व विद्यामान नगरसेवक राजू शिंदे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, अजीम खान, 'एमआयएम'चे गटनेते नासेर सिद्दिकी, माजी नगरसेवक समीर राजूरकर, रवी कावडे, लायन्स क्लबचे शेख अहेमद, कामगार नेते कृष्णा बनकर, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किरण धांडे सहभागी झाले होते.
शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम झाले पाहिजे. हे काम कोणत्याही एजन्सीच्या मार्फत करा, पण लवकर काम झाले पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शहरात सध्या पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे, अशा भावनाही व्यक्त झाल्या. यातून मार्ग काढण्यासाठी ठोस उपाययोजना केली पाहिजे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
सध्या निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नक्षत्रवाडी ते सिडको एन ५ पर्यंतच्या वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यात सुधारणा करण्यासाठी विशेष अधिकारी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युडी) नियुक्त केला जाणार आहे, अशी माहिती महापौरांनी दिली. पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिकेने डॉ. राजेंद्र होलानी यांना तज्ज्ञ म्हणून नियुक्त केले आहे. त्यांना नक्षत्रवाडी पासून औरंगाबाद शहरापर्यंत पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. नक्षत्रवाडीपर्यंत १२५ एमएलडी पाणी येते, मग पुढे या पाण्याचे काय होते, पाणी कुठे जाते हे डॉ. होलानी तपासतील, त्यानंतर आवश्यक त्या उपययोजना केल्या जातील, असे महापौरांनी स्पष्ट केले.
\Bउद्योगमंत्र्यांना गळ घालणार\B
एमआयडीसीचे पाच एमएलडी पाणी मिळावे यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना गळ घालणार असल्याचे महापौर म्हणाले. एमआयडीसीकडून मिळणारे सर्वच्या सर्व पाणी सिडकोसाठी वापरण्याचे नियोजन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
\B(सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात) \B