\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\B \Bनागरिकांना कोणतेही कारणे नकोत, त्यांना पाणी हवे आहे. महापालिकेने कारणांची जंत्री न मांडता पाणी पुरवठ्याचे योग्य प्रकारे नियोजन करावे, अशा भावना 'मटा राउंड टेबल'मध्ये व्यक्त झाल्या. शहरातील अभूतपूर्व पाणीबाणीमुळे जनता त्रस्त झाली असून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 'मटा राउंड टेबल'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर भगवान घडमोडे, माजी सभापती व विद्यमान नगरसेवक राजू शिंदे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, अजीम खान, 'एमआयएम'चे गटनेते नासेर सिद्दिकी, माजी नगरसेवक समीर राजूरकर, रवी कावडे, लायन्स क्लबचे शेख अहेमद, कामगार नेते कृष्णा बनकर, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता किरण धांडे हे उपस्थित होते. पाणीप्रश्नावर त्यांनी आपापली बाजू मांडली. \B \Bमहापालिका नियोजनात कमी पडते \B पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात महापालिका कमी पडत आहे, हे मान्य करावेच लागेल. अधिकाऱ्यांची आपसातील भांडणे देखील त्याला कारणीभूत आहेत. कर्मचाऱ्यांवर होत असलेले हल्ले ही चिंतेची बाब आहे. हल्ल्यांमुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांचे मनोधैर्य कमी होते. सध्या शहरात पाण्याची परिस्थिती बिकट झाली आहे. पोलिस बंदोबस्तात काम करणे भूषणावह नाही. सर्वच वॉर्ड पाण्याच्या कमतरेमुळे त्रस्त आहेत. सिडको एन ५च्या जलकुंभावर पाणी नसणे, ही आत्मपरिक्षणाची बाब आहे. सिडको एन ५ व एन ७च्या जलकुंभावरून होणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी विशेष अधिकारी असला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. याबद्दल आयुक्तांना पत्र देखील देणार आहे. कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले, पाण्यासाठी नगरसेवकांना करावे लागणारे उपोषण यातून मार्ग काढावा लागेल. नक्षत्रवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत आणि शहर ते सिडको एन ५पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल याचा अभ्यास करण्याचे डॉ. राजेंद्र होलानी यांना सांगण्यात येईल. या संदर्भात आयुक्त हे डॉ. होलानी यांना योग्य त्या सूचना देतील. पाण्याचे संकट ऐन सणात आले आहे. सर्वांनाच पाणी मिळाले पाहिजे. काही नागरिक तुपाशी तर काही उपाशी, असे नको. नक्षत्रवाडी येथे १२५ एमएलडी पाणी येते, हे पाणी पुढे कोठे मुरते हे तपासायला सांगितले आहे. आवश्यक अधिकारी-कर्मचारी उपलब्ध करून देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. हर्सूल तलावातून रोज पाच एमएलडी, तर नहरींमधून दीड एमएलडी पाणी मिळत होते. पाण्याचे हे दोन्हीही स्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे जायकवाडीच्या पाण्यावरचा भार वाढत आहे. एक्स्प्रेस जलवाहिनीवरून एक दिवस पूर्णपणे सिडको-हडको भागाला पाणीपुरवठा करण्याचा व दुसऱ्या दिवशी अन्य भागाला पाणी पुरवठा करण्याचा विचार करता येईल. -नंदकुमार घोडेले, महापौर \Bमहापालिकेचा नियोजन शून्य कारभार\B नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. जनता पाण्यासाठी त्रस्त आहे. पाणी पुरवठ्याच्या वेळा निश्चित नाहीत. लोकांना पाणी हवे आहे, कारणे नकोत. शहरासाठी येणारे पाणी जाते कोठे हेच कळत नाही. वॉशिंग सेंटर, सर्व्हिस सेंटर्स, हॉटेल्सला होणारा पाणी पुरवठा तपासला पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एक्स्प्रेस जलवाहिनीवरून पाणी घेतले जात असल्याने सिडको- हडकोला सर्वात जास्त गॅप आहे. नक्षत्रवाडी येथील एमबीआर (संतुलित टाकी) भरला जात नाही. एमबीआर भरला, तर सर्वांना मुबलक पाणी मिळेल. महापालिकेत मोठ्या प्रमाणावर आउट सोर्सिंगचे कर्मचारी आहेत. त्यातील बहुतेक कर्मचारी हे अधिकाऱ्यांचे नातेवाईक आहेत, त्यामुळे ते काहीच काम करीत नाहीत. महापालिका प्रशासनाचे त्यांच्यावर नियंत्रण नाही. शहरातील काही वॉर्डामध्ये दोन दिवसाआड, काही वॉर्डांत तीन दिवसांआड, तर काही वॉर्डांमध्ये सात-सात दिवस पाणी मिळत नाही. बिल्डर्सच्या वसाहतींना पाणी मिळते. त्यांना मुख्य जलवाहिनीवरून कनेक्शन दिले जाते. सर्वसामान्यांच्या वसाहतींना मात्र पाणी मिळत नाही. आपले शहर चांगले आहे, ते चांगलेच राहिले पाहिजे. समांतर जलवाहिनीची योजना चांगली आहे. पण त्या योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्या मानवनिर्मित जीर्ण झाल्या आहेत. एमआयडीसीची जलवाहिनी त्याच काळात तयार करण्यात आली, ती जलवाहिनी चांगली आहे आणि महापालिकेच्या जलवाहिन्या इतक्या जीर्ण कशा झाल्या याचाही विचार झाला पाहीजे. -भगवान घडमोडे, माजी महापौर \Bसमांतर जलवाहिनी शिवाय पर्याय नाही \B औरंगाबाद शहरासाठी जायकवाडीहून टाकलेल्या दोन्हीही जलवाहिन्यांचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. काहींना वाटते समांतर जलवाहिनीसाठी पाण्याची ओरड सुरू आहे. समांतर जलवाहिनीची योजना करणे गरजेचे आहेच. कुणाच्या माध्यमातूनही समांतरची योजना करावी, अशी आमची भूमिका आहे. शहरात ७० किलोमीटरची पाइपलाइन जास्तीची टाकण्यात आली आहे, ती टाकताना पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे पाणी देता येत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. समांतर जलवाहिनीशिवाय शहराची तहान भागणार नाही. अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत आणि शहर वाढत आहे, त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे. -कृष्णा बनकर, कामगार नेते \Bसमांतर जलवाहिनीचे नाव बदला \B समांतर जलवाहिनी हा शब्द बदनाम झाला आहे, असे वाटते. त्यामुळे समांतर जलवाहिनी हा शब्द बदलून 'नवीन जलवाहिनी योजना' असे नाव करा आणि हे काम लवकर पूर्ण करा. महापालिकेत मधल्याकाळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आलेल्या अधिकाऱ्यांनी अनागोंदी पद्धतीने पाइपलाइन टाकल्या. या पाइपलाइन टाकल्यामुळे पाणीपुरवठा योजनेवर प्रशासनाचे नियंत्रण राहिले नाही. नियंत्रणाबाहेर ही यंत्रणा गेली आहे, शिवाय पाणीपुरवठा विभागाला कर्मचारी कमी आहेत. शहरात येणारे पाणी वाढत नाही तोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव प्रशासनानेच मांडला होता. तो रद्द करण्याचा प्रस्ताव देखील प्रशासनाने मांडला होता. समांतर जलवाहिनीचे काम होणे गरजेचे आहे. कुणालाही या योजनेचे काम द्या पण समांतर जलवाहिनीचे काम लवकर करून घ्या. हे काम करताना जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत प्राधान्याने काम करण्यात यावे. मिटरने पाणी घेण्याची मानसिकता लोकांनी केली पाहिजे. समांतर जलवाहिनीचा प्रकल्प मंजूर होऊन दहा वर्षे झाली, आता किती दिवस या प्रकल्पाची वाट पहायची. -समीर राजूरकर, माजी नगरसेवक \Bनागरिक वेठीस धरले जातात\B लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मिळून नागरिकांना वेठीस धरतात. नागरिकांना सोयी-सुविधा हव्या असतात. त्या त्यांना मिळत नाहीत. आजही अनेक भागात टँकर बंद आहेत. मागणी करूनही नागरिकांना टँकर मिळत नाहीत. नगरसेवक अधिकाऱ्यांना बळी पडतात. शहरात निर्माण झालेल्या पाणीबाणीला अधिकारी जितके जबाबदार आहेत तितकेच नगरसेवक देखील जबाबदार आहेत. शहरासाठी समांतर जलवाहिनी गरजेची आहे, पण त्यात जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे मूळ काम सोडून शहरातील पाणीपट्टी वसुलीचे काम त्या कंपनीला देण्यात आले. त्यामुळे सगळे गणित बिघडले. समांतर जलवाहिनी ही योजना झाली तरच पाण्याचा प्रश्न सुटेल. कोणाच्याही माध्यमातून या योजनेचे काम करा. -शेख अहेमद, सदस्य, लायन्स क्लब \Bसोळाशे ठिकाणी वेल्डिंग\B जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत सध्या अस्तित्वातील जलवाहिनींना सोळाशे ठिकाणी वेल्डिंग करण्यात आले आहे. जलवाहिन्या शरपंजरी पडल्या आहेत. दर माणसी १३५ लिटर पाणी मिळाले पाहिजे, सध्याच्या स्थितीत तेवढे पाणी मिळत नाही. पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढीचा मुद्दा आणि समांतर जलवाहिनीचा मुद्दा यांच्यात परस्पर काही संबंध नाही. उपविधींमुळे पाणीपट्टीत दहा टक्के वाढ नंतर करण्यात आली. शहरात येणाऱ्या पाण्यात तब्बल ३० टक्के गळती आहे. सुमारे ५० टक्के लोकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्याची यंत्रणा सुधारली पाहिजे. पाणी किती येते आणि पाण्याचे किती वाटप होते, याचा हिशेब ठेवला गेला पाहिजे. मुख्य जलवाहिनीवर कनेक्शन्स घेतल्यामुळे जलकुंभ भरत नाहीत. त्यामुळे नागरिकांना ग्रॅव्हिटीने (गुरूत्वाकर्षणाने) पाणी देता येत नाही. पाणीपुरवठा यंत्रणेवर प्रशासनाचे योग्य प्रकारे नियंत्रण असले पाहिजे. -राजेंद्र जंजाळ, नगरसेवक \Bयंत्रणा सुधारणे गरजेचे\B पाणी पुरवठ्याची यंत्रणा सुधारणे गरजेचे आहे. शहराला २७८ एमएलडी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात १२५ एमएलडीच पाणी मिळते. १२५ एमएलडीतून एक दिवसाआड पाणी देणे शक्य आहे. त्यादृष्टीने नियोजन झाले पाहिजे. सिडको-हडको भागासाठी ३० ते ३२ एमएलडी पाण्याची गरज आहे, पण तेवढे पाणी मिळत नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कर्मचारी कमी आहेत. आठ ते नऊ उपअभियंते, ४० शाखा अभियंत्यांची गरज आहे. विस्कळीत पाणी पुरवठ्याबद्दल विचार करताना कर्मचारी भरतीचाही विचार झाला पाहिजे. समांतर जलवाहिनीचा प्रकल्प चांगला होता. बारकाईने अभ्यास केल्यानंतर या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. त्यात नंतर बदल होत गेले. समांतरच्या कंपनीकडून अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे काम करून घेतले नाही. कंपनीच्या काळात शहरात १३०० किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात आली. यापैकी एकही पाइप हायड्रॉलिक पद्धतीने टाकण्यात आला नाही. विस्कळीत पाणी पुरवठ्याचा विचार करताना समांतर जलवाहिनीचा विचार करावाच लागतो. कारण सध्या ३० टक्के पाणी गळती आहे. एकूणच पाणी पुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे असून यंत्रणेत सुधारणा होणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा व्यवस्था सुधारायची असेल तर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम केलेल्या व करणाऱ्या आजी-माजी अधिकाऱ्यांची बैठक घेतली पाहिजे. त्यांच्या सूचना लक्षात घेऊन नियोजन केले पाहीजे. -राजू शिंदे, नगरसेवक \Bनियोजनाचा अभाव \B पाणीपुरवठा यंत्रणेत नियोजनाचा अभाव आहे. पूर्वी पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत होता आताच त्यात अडचणी कशा काय निर्माण होत आहेत याचा सखोल विचार केला पाहिजे. नियोजन बिघडलेले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शहराची लोकसंख्या, शहरात येणारे पाणी याचा विचार करून योग्य प्रकारे नियोजन केले पाहिजे. शहागंज येथील जलकुंभावर भीषण स्थिती आहे. या टाकीवरून १७ वॉर्डांना पाणीपुरवठा केला जातो. सर्वच वॉर्ड पाणी पुरवठ्याबद्दल असमाधानी आहेत. समांतर जलवाहिनीसाठी नेमलेल्या कंपनीने आपल्या मर्जीनुसार काम केल्यामुळे ही स्थिती निर्माण झालीआहे. खासगीकरणातून काहीही साध्य झालेले नाही. -नासेर सिद्दिकी, गटनेता, एमआयएम
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट