डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
आयुष्यात खूप माणसे भेटतात. प्रसंगी जवळही येतात. पण त्यापैकी फार थोडे मित्र होतात. हे मित्रही आयुष्यभर टिकतात असे नाही. कुठल्या तरी कारणाने काहींशी मतभेद होतात. हे मतभेद कधी वैचारिक असतात तर पुष्कळदा वैयक्तिकही असतात. काही मित्रांचा मात्र फार कटू अनुभव येतो. ते समोर गोड बोलतात आणि पाठ फिरली की, निंदा करायला लागतात. कटकारस्थानेही करतात. ते दूरही जातात. त्यांच्याशी मैत्री केल्याचा पश्चात्ताप करावा लागतो. (अर्थात तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते) फार कमी मित्र असे असतात की, ज्यांच्याशी मैत्री असल्यामुळे कधीच पश्चात्ताप होत नाही. उलट आनंद द्विगुणित होत जातो. अशा फार कमी मित्रांमध्ये अविनाश डोळस यांचा मी समावेश करेन. सतत आनंदी राहणारे, मिस्कील बोलणारे, बोलता बोलता सहज टोप्या उडवणारे माझे मित्र अविनाश डोळस हे फार उदार हृदयी आहेत. त्यांचा सगळ्यात मोठा गुण कोणता असेल तर त्यांना कधी कोणाल मत्सर वाटत नाही. संत तुकारामांनी 'कोणाही जीवाचा न घडो मत्सर' असे म्हटले आहे. संत तुकारामांच्या कल्पनेतला माणूस कोण? असे विचारले तर 'अविनाश डोळस' असे उत्तर देईन. याचा अर्थ अविनाश डोळस यांना जीवनात त्रास झाला नाही, असे नाही. अनेक वेळा अनेक ठिकाणी त्यांना डावलण्यातही आले आहे. तरीही ते कधी कटू बोलत नाहीत. कोणाचा मत्सर करीत नाहीत. सतत चेहऱ्यावर हास्यच असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य काय असा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर म्हणजे ते डॉ. बाबासाहेत आंबेडकरांच्या विचारांचे सच्चे पाईक आहेत. पुष्कळ लोक बाबासाहेबांकडे एक वैयक्तिक फायद्याची गोष्ट म्हणून पाहतात. आयुष्यात पुढे जाण्यासाठी डॉ. बाबासाहेबांचे नाव वापरत राहतात. अविनाश डोळस हे असे कधी करणार नाहीत. समाजात शांतपणे काम करीत राहणे, सामाजिक अन्याय अत्याचाराच्या विरोधात सतत संघर्ष करीत राहणे हाच डॉ. आंबेडकरांच्या शिकवणुकीचा खराखुरा अर्थ आहे, हे अविनाश डोळस पक्के जाणून आहेत. म्हणून वैयक्तिक आयुष्यातील करिअरपेक्षा, प्रसिद्धीपेक्षा सामाजिक कार्य त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. समाजात समता निर्माण करणारे विचार पेरीत राहणे अधिक महत्त्वाचे वाटते. आणि ते ते सातत्याने करीत राहतात. याच संदर्भात आणखी एका गोष्टीचा निर्देश केला पाहिजे. ते नाशिकहून आलेले आहेत. म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या कर्मभूमीतून आलेले आहेत. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वेळी महाराष्ट्रातील समतेच्या लढ्याचे केंद्र नाशिक होते. पुढे दादासाहेबांनी समतेचा लढा अधिक व्यापक केला. ते भूमिहीनांच्या प्रश्नाला भिडले आणि त्याचे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रव्यापी झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील ते एक अग्रणी नेते होते. अविनाश डोळस यांच्या व्यक्तिमत्त्वावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे आणि नाशिकला झालेल्या समता संघर्षाचे दाट संस्कार आहेत. म्हणजे नाशिकचे संस्कार आणि दादासाहेब गायकवाड यांच्याशी बांधीलकी घेऊन ते औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयात शिकायला आले.
मिलिंद महाविद्यालय म्हणजे समाज परिवर्तनाची प्रयोगशाळा. या प्रयोगशाळेत ते तावूनसुलाखून बाहेर पडले. एक वैचारिक बैठक त्यांना प्राप्त झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य आणि जीवन यांचा त्यांनी जवळून मनःपूर्वक अभ्यास केला. या सगळ्यांमधून अविनाश डोळस हे निर्मत्सरी, आनंदी अणि आपल्या भूमिकेवर ठाम असणारे व्यक्तिमत्त्व घडले. म्हणूनच अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांवर ते समतोल भूमिका मांडू शकतात. एका प्रकारे सामाजिक प्रश्नांवर, दलित प्रश्नांवर वैचारिक भूमिका मांडणारे तटस्थ विचारवंत आहेत. म्हणूनच दलितांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या चळवळीचे ने वैचारिक भाष्यकार आहेत. म्हणूनच त्यांचे अशा प्रश्नांसबंधीचे विवेचन गळे वेगळे असते. समंजस असते. ते कधी आक्रस्ताळेपणा करीत नाहीत की मळ भमिकाही सोडीत नाहीत. त्याचे कारण त्यांना स्वत:पेक्षा समाज मोठा वाटतो. म्हणूनच समाजातील वेगवेगळ्या विचारधारा समजून घेणे, त्यातील संवादी विचारधारांशी संवाद करणे महत्त्वाचे वाटते. त्या दृष्टीने डावी विचारसरणी त्यांना महत्त्वाची वाटते. डाव्या विचारांच्या केंद्रस्थानी कार्ल मार्क्स आहे. परंतु पुष्कळदा मार्क्सचे नाव काढले की अनेकांना त्रास होतो. तसे अविनाश डोळस यांचे नाही. शेवटी डावे समाजातल्या शोषणांसंबंधीच बोलतात आणि कृती करतात. भारतातील जटिल जातिव्यवस्था डाव्यांना कळली नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. कळली नाही, असे मी म्हणणार नाही पण जातिप्रश्नांपेक्षा ते आर्थिक प्रश्न महत्त्वाचे मानतात. आर्थिक समता आली की, सर्व प्रश्न सुटतील असे डाव्यांना वाटते. डावे जेव्हा आर्थिक समतेबद्दल बोलतात, तेव्हा ते समाजातील शोषणाबद्दलच बोलत असतात. दलित चळवळी याही शोषणमुक्तीचा विचार करतात. समतेसाठीच संघर्ष करतात. म्हणजे 'शोषणमुक्ती' हा दोन्ही चळवळींना जोडणारा दुवा आहे. हा दुवा अधिक घट्ट झाला पाहिजे असे अविनाश डोळस यांना वाटते. त्या दृष्टीने ते डाव्या चळवळींकडे पाहतात. डावे आणि दलित जवळ येणे ही काळाचीही गरज आहे. नाहीतर भांडवलशाही सर्वच शोषितांना उद्ध्वस्त करायला तयारच आहे. मग डावे आणि दलित चळवळी जवळ का येत नाहीत हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचे उत्तर इतिहासामध्ये सापडते. असे अविनाश डोळस यांचे म्हणणे आहे. इतिहासामध्ये डाव्या चळवळीकडूनही जशा चुका झाल्या तशाच दलित चळवळीकडून झाल्या. शेवटी चुकांवरती मात करणे हेच आपल्या हाती असते. ती काळाची गरज असते. ही काळाची खेळी ओळखणारे आणि दोन्ही चळवळी जवळ आल्या पाहिजेत असे म्हणणारे अति हे एक विचारवंत आहेत.
नाटक, कथा, समीक्षा या क्षेत्रात त्यांनी लक्षणीय लेखन केले आहे त्याच कारण म्हणजे त्याची वैचारिक भूमिका. किंबहुना आंबेडकरवादाची भक्कम बैठक असल्यामुळेच त्यांना जीवनाकडे आणि साहित्याकडे पाहण्याची एक मर्मग्राही अन्वेषणदृष्टी प्राप्त झालेली आहे. ही मर्मग्राही अन्वेषण दृष्टी त्यांच्या ललितलेखनातून जशी व्यक्त होते, त्याचप्रमाणे त्यांच्या समीक्षा लेखनातूनही व्यक्त होते. परंतु त्यांच्या वैचारिक भूमिकेचा ठळक आविष्कार झाला आहे तो त्यांच्या वैचारिक लेखनातून.
लेखकाची वैचारिक बैठक पक्की असली की, त्या लेखकाचे सगळेच लेखन वेगळे आणि महत्त्वाचे होते. अविनाश डोळस यांच्या बाबतीत हेच म्हणता येईल. अर्थात ही भूमिका तयार होण्यामध्ये आंबेडकरवादाचा आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या कर्तृत्वाचा जो ठसा त्यांच्यावर उमटला त्याचा आहे. याचा निर्देश पूर्वी केलेलाच आहे. पण आणखी एका गोष्टीचा निर्देश केला पाहिजे. ती गोष्ट म्हणजे मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या ते अतिशय जवळचे आहेत. दोघांमध्ये एक वैचारिक देवघेव होत असते.
महाराष्ट्राच्या राजकारणातील बाळासाहेब आंबेडकर हे एक सुसंस्कृत राजकारणी आहेत. फायदा होवो किंवा तोटा होवो, वैचारिक भूमिका सोडायची नाही हे त्यांचे तत्त्व आहे. त्यामुळे डाव्या पक्षांपासून सर्व परिवर्तनवादी चळवळींना ते हवे असतात. केवढ्याही धकाधकीचा असो, बाळासाहेब सतत नवे नवे वाचत असतात. त्यावर चिंतन करीत असतात. त्यावर चर्चा करीत असतात. वाचन करणारे नेते राजकारणामध्ये अतिशय दुर्मिळ आहेत. पं. जवाहरलाल नेहरू, नंबुद्रीपाद, रफिक झकेरीया, यशवंतराव चव्हाण, प्रभाकर संझगिरी, कॉ. डांगे अशी वाचन करणाच्या पुढा-यांची सहज आठवलेली नावे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तर उल्लेख करावाच लागेल. बाळासाहेब आंबेडकर हे परंपरेमध्ये बसणारे नेतृत्व आहे. अशा चिंतनशील व्यक्तिमत्त्वाच्या जवळ अविनाश डोळस आहेत. त्यामुळेही त्यांच्या भूमिका पक्क्या होत गेल्या. आणि त्या भूमिकांच्या साह्यानेच ते जीवनातल्या जटील प्रश्नांकडे पाहतात. समाजपरिवर्तनाकडे आणि साहित्याकडेही पाहतात.
महाविद्यालयातील शिकविणे आणि सारी कामे सांभाळून अविनाश डोळस आणि त्यांचे सहकारी हे सारे करीत. रात्ररात्र प्रवास करून परत येत आणि थकण्याची पर्वा न करता महाविद्यालयात वेळेवर हजर होत. त्यांचे विभागप्रमुख ल. बा. रायमाने आणि महाविद्यालयातील त्यांचे इतर सहकारी त्यांना समजून घेत. प्रा. रायमाने अविनाश डोळस याचे शिक्षक, पण घरोबा एवढा जवळचा की शिक्षक-विद्यार्थी नाते संपून ते मित्र होऊन गेलेले. प्रा. रायमाने आणि इतर शिक्षक त्यांना समजून घेत. विद्यार्थ्यांना तर त्यांच्याविषयी प्रेम आणि आदरच वाटत होता. आजही डॉ. महेंद्र भवरे, राम दुतोंडे यांच्यासारखे त्यांचे जुने विद्यार्थी प्रा. रायमाने व प्रा. अविनाश डोळस यांच्यावर नितांत प्रेम करतात.
आपले जीवन दलितांच्या आणि शोषितांच्या चळवळीसाठी आहे, हे त्यांनी पक्के ठरविलेले आहे. परिणामी काही संधी त्यांनी स्वतःहून नाकारल्या. १९८२-८३ मधील गोष्ट असेल. तेव्हा अविनाश डोळस एक विद्यार्थिप्रिय आणि समंजस शिक्षक म्हणून नावारूपाला आलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधे त्यांनी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालकाचे पद स्वीकारावे, अशी अनेकांची इच्छा होती. पण ती त्यांनी विनम्रपणे नाकारली. मला ही गोष्ट महत्त्वाची वाटते. । मित्रांबाबत मात्र ते कमालीचे हळवे आहेत. त्यांच्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. कुणाशी मतभेद झाले तरी ते त्याच्याबद्दल कटू कधी बोलत नाहीत. असा एक प्रसंग मला माहीत आहे. जवळच्या एका मित्राचा (जो रोज घरी यायचा) काही कारण नसताना गैरसमज झाला. ते मित्र सतत प्रा. अविनाश डोळस यांच्यासंबंधी वाईटसाईट बोलत असत. माझ्याहीजवळ त्यांनी त्यांची निंदा केली. मी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीमध्ये नव्हते. या उलट प्रा. अविनाश डोळस यांचे वर्तन होते. त्यांनी कधीही त्या मित्राबद्दल कटू उद्गार काढले नाहीत. उलट ते कसे चांगले लेखक आहेत, हेच सांगत. ही घटना महत्त्वाची वाटते. कधी काळी आपण मित्र होतो, तो काळ आनंदाचा होता याचे कायम स्मरण ठेवणे हा प्रा. डोळस यांचा स्वभाव आहे. ही त्यांच्या स्वभावातील उदारता हा सगळ्यात मोठा गुण आहे.
(प्रा. अविनाश डोळस यांच्या डोळस या गौरव ग्रंथातील लेखाचा संपादित भाग)