म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये महात्मा गांधी आणि विनायक सावरकर यांच्या तसबिरी समोरासमोर आहेत. त्यामुळे गांधी स्वीकारायचे असतील, तर सावरकरांकडे पाठ फिरवावी लागेल, हे अपरिहार्य राजकीय वास्तव आहे. हे वास्तव स्वीकारावेच लागेल, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी व्यक्त केले. पंडित नेहरु जयंतीनिमित्त बुधवारी एनएसयुआयतर्फे गांधी भवन येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर हे होते. यावेळी बोलताना टकले यांनी आजघडीला लोकशाहीचे स्तंभ सध्याच्या सत्ताधाऱ्याकडून डळमळीत केले जात असताना नेहरुंची लोकशाहीप्रती बांधीलकी कशी होती याचा तुलनात्मक फरक समजावून सांगितला. भारताची पहिती मतदार यादी अनेक अडचणीच्या प्रसंगातून घडत गेली. जगाच्या पाठीवर अत्यंत आधुनिक व सर्व समाज घटकांचे हितरक्षण करणारी ही पहिली मतदार यादी होती. या सर्व प्रक्रियेत पंडित नेहरूंचे भरीव योगदान असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शंकाचे त्यांनी निरसन केले. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव मानस पगार, महाराष्ट्र एनएसयुआयचे उपाध्यक्ष सागर साळुंके, मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौरव जैस्वाल, पूर्व विधानसभा उपाध्यक्ष मजीद पठाण, आरिफ खान हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन औरंगाबाद जिल्हा एनएसयुआयचे महासचिव प्रथमेश देशपांडे, आकाश बारहाते, जिल्हा सचिव ओंकार मुखेकर, ऋषिकेश खंडागळे, अभिषेक शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन ऋषिकेश पवार यांनी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट