म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फास्ट फूड, जंक फूडचा वाढलेला वापर, अनियमित खाण्या-पिण्याच्या वेळा, चुकीची आहार पद्धती-जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जागरणे आदी कारणांमुळे जवळजवळ निम्म्या लोकांना वयाच्या पन्नाशीपर्यंत मुळव्याधीची कोणती ना कोणती लक्षणे आढळून येत आहे. त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे आता किशोरवयीन; तसेच पौगंडावस्थेतील मुलांमध्येही मुळव्याधीची समस्या दिसून येत आहे. या प्रकारच्या एकूण रुग्णांपैकी ३० ते ४० टक्के रुग्ण हे चक्क किशोरवयीन-पौगंडावस्थेतील मुले असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अशा बहुतांश मुलांवर उपचार, तर त्यातील काहींवर शस्त्रक्रिया करण्याचीही वेळ येत असल्याचे जागतिक मूळव्याध दिनानिमित्त समोर येत आहे.
या वाढत्या समस्येवर लक्ष वेधण्यासाठीच २० नोव्हेंबर रोजी जागतिक मुळव्याध दिन पाळला जातो. यासंदर्भात शहरातील प्रोक्टोलॉजिस्ट डॉ. अतुल देशपांडे म्हणाले, 'बदलती जीवनशैली, पाश्चातीकरणामुळे मागच्या ३० वर्षांत देशातील मुळव्याधीच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. जवळजवळ ५० टक्के लोकांना वयाच्या ५० वर्षांपर्यंत मुळव्याधीची कोणती ना कोणती लक्षणे हमखास आढळून येतात, असेही दिसून आले आहे. विशेष म्हणजे महिला; तसेच पुरुषांमध्ये समान प्रमाणात समस्या आढळून येतात. त्यातच आता आठ ते १८-१९ वर्षांपर्यंतच्या किशोरवयीन व पौगंडावस्थेतील मुलांमध्ये, युवकांमध्येही मुळव्याधीची समस्या दिसून येत आहे.'
मुलांमध्ये तसेच युवकांमध्ये जंक फूड-फास्ट फूड आणि कोल्ड्रिंक्स सेवनाचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. नियमित व वेळेवर आहार घेण्याचे प्रमाणही कमी होत असतानाच पाणी कमी पिणे किंवा पाण्याऐवजी कोल्ड्रिंक्स घेतले जात आहेत. याच दुष्टचक्रामुळे घट्ट-कठीण शौच (हार्ड स्टूल) होण्याची समस्या निर्माण होते आणि हेच मूळव्याधीचे मुख्य कारण आहे. मुळात पाण्याची जागा कोल्ड्रिंक्स किंवा इतर काहीही घेऊ शकत नाही आणि कमी पाणी पिणे, हे या समस्येला खतपाणी घालणारे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मलावरोध तसेच जागरण हेदेखील महत्त्वाचे कारण ठरत असल्याचे डॉ. देशपांडे म्हणाले.
\Bचौथ्या पायरीवर शस्त्रक्रिया अनिवार्य
\Bमूळव्याधीच्या पहिल्या-दुसऱ्या पायरीवर जीवनशैलीत योग्य बदलांबरोबरच विविध उपचार; तसेच इंजेक्शन्स उपयुक्त ठरतात, मात्र रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या पायरीमध्ये उपचारासाठी आला तर अशा वेळी शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊ शकते. आजार लपवणे व उपचारासाठी उशिरा येणे, हे या प्रकारच्या रुग्णांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. मूळव्याधीबरोबरच 'फिशर' या आजाराचे मूळदेखील बद्धकोष्ठतेमध्येच आहे. अलीकडे टाक्यांच्या शस्त्रक्रियेशिवाय 'स्टेप्लर' ही वेदनाशामक शस्त्रक्रियाही लोकप्रिय झाली आहे. नजिकच्या काळात लेझर शस्त्रक्रिया उपलब्ध होतील, असेही डॉ. देशपांडे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
\Bसंवेदना नष्ट होण्यातून दुष्टचक्र
\Bउशिरा झोपणे व उशिरा उठणे, या प्रकारची जीवनशैली अधिकाधिक लोकांमध्ये दिसून येत आहे. याच जीवनशैलीमुळे संवेदना नष्ट होऊन बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. त्यातच व्यायामाचा व शारीरिक हालचालींचा अभाव हेदेखील महत्वाचे कारण मूळव्याधीमागे आहे. युवकांमध्ये ही समस्या झपाट्याने वाढत असून, सद्यस्थितीत ३० ते ४० टक्के मुले; तसेच युवकांमध्ये ही समस्या दिसून येत असल्याचे प्रोक्टोलॉजिस्ट डॉ. प्रसाद वैद्य यांनी सांगितले.
\Bअशी घ्या काळजी...
\B- आहारात भरपूर तंतूमय पदार्थांचा समावेश करा
- भरपूर प्रमाणात पाणी प्या, शौच्चास जोर देऊ नका
- शौच्चकुपात मोबाईल, इतर गॅझेटस् घेऊन जाऊ नका
- घट्ट कपडे वापरू नका, आंतरभागात स्वच्छता ठेवा
- जंक फूड, फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ, कोल्ड्रिंक्स टाळा
- आहारात मसालेदार पदार्थांचा वापर कमीत कमी करा
\Bअशी आहेत आजाराची लक्षणे...
\B- गुदद्वारावाटे रक्तस्त्राव होणे
- गुदद्वारात दुखणे, आग, जळजळ
- शौच्चास करताना मांस बाहेर येणे