म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या खुलताबाद येथील वाहतूक नियमन करण्यासाठी वळण रस्ता (रिंग रोड) व उड्डाणपूल बांधण्याची मागणी होत आहे. विशेषत: दर शनिवारी व उरूस कालावधीत वळण रस्ता व उड्डाणपुलाची गरज ठळकपणे स्पष्ट होते.
ईद ए मिलादच्या पर्वावर मोहंमद पैगंबर यांच्या पवित्र पोशाखाचे दर्शन घेण्यासाठी व नियमितपणे श्री भद्रा मारुती मंदिरात दर्शनासाटी येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीमुळे सतत मनस्ताप सहन करावा लागतो. येथील मोठी आळी भागात बुधवारी एका जड वाहनाने वीज खांबाला धडक दिल्याने तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. यात जीवितहानी झाली नाही. उरुसामुळे वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात येणारे सर्व मुख्य रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, शैक्षणिक सहलींना याचा फटका बसला. पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूककोंडी झाल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला. खुलताबाद शहरात येण्यासाठी खिर्डी रोड, राजीवगांधीनगर, लहानीआळी, मोठीआळी, श्री भद्रा मारुती मंदिर, नवीन पोलिस ठाणे, फुलंब्री रोड हा एकमेव रस्ता खुला होता. येथील वाहतूक सुरळीत करतांना पोलिसांची दमछाक झाली. ही परिस्थिती टाळण्यासाठी पर्यटन प्राधिकरणातून वळण रस्ता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे औरंगाबाद, वेरूळ, म्हैसमाळ, अजिंठाकडे जाण्या-येण्याच्या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी होत आहे.
उरूस, हनुमान जयंती, वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा, म्हैसमाळ येथील श्री गिरीजादेवी यात्रा या काळात खुलताबाद येथील वाहतूक व्यवस्था कोलमडते. पर्यायी रस्ते नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ही स्थिती अनेक वर्षांपासूनची असूनही संबंधित अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. वाहतूककोंडीची शक्यता लक्षात आल्यानंतर शरणापूर फाटा ते खुलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जड वाहनांना बंदी करून एकेरी वाहतूक करण्याची उपाययोजना केली जाते.
\Bनेहमीच वाहतूककोंडी
\B
वेरूळ, खुलताबाद, म्हैसमाळ या महत्त्वाच्या ठिकाणी सतत शैक्षणिक सहली येतात. सहलींचे नियोजन आधीच झालेले असते. यात्रा, उरूस गर्दीचा अंदाज नसल्याने सहलींना वाहतूक कोंडीचा फटका बसतो. खुलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ येथे पर्यटकांच्या खासगी वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सतत भेडसावत आहे. याबाबत प्रशासन, नगर पालिका, पोलिस, वाहतूक पोलिस, दर्गा कमिटी, मंदिर देवस्थान ट्रस्टने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
\Bविद्यार्थ्यांचा हिरमोड \B
खुलताबाद शहरातील मुख्य रस्ते बंद असल्याचा फटका शैक्षणिक सहलींच्या वाहनांना बसतो. फुलंब्री मार्गे अजिंठा लेणी पाहून वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी आलेल्या सहलीच्या वाहनांना आलेल्या रस्त्याने परत जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो, तर वेरूळ लेणी पाहून श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या सहलीच्या विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते.
औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावर नंद्राबाद ते फुलंब्री रोड या वळण रस्ताकरिता सर्वेक्षण झाले आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांशी बोलणे झाले असून प्रस्ताव सादर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. हा रस्ता मंजूर झाल्यास भाविकांची अडचण दूर होईल.
-मिठ्ठू पाटील बारगळ , अध्यक्ष श्री भद्रा मारुती संस्थान
पर्यटक व भाविकांच्या सोयीसाठी वळण रस्ता व उड्डाणपूल अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे नगर पालिकेतर्फे पर्यटन प्राधिकरण अंतर्गत खुलताबाद शहरात वळण रस्ता व उड्डाणपूल बांधण्याकरिता पाठपुरावा करण्यात येईल.
- अॅड एस. एम. कमर, नगराध्यक्ष