म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शहरातील एका व्यापाऱ्याला ७० कोटींचे कर्ज मिळवून देतो असे अमिष दाखवून पाच जणांनी नऊ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सुरेशचंद्र बाकलीवाल (रा. भाग्यनगर) यांना के. के. जैन फायनान्स कंपनीकडून व्यापारासाठी ७० कोटी रुपये कर्ज मिळवून देतो अशी थाप दिनेश जैन, अशरफ खान, सुनील सकपाल, विपुल पांडे आणि जितू यांनी मारली. बाकलीवाल यांचा विश्वास संपादन करून एक लाख रुपये डिपॉजिट भरण्यास लावले. तसेच कर्जाच्या प्रोसेसिंग फिसच्या नावाखाली आठ लाख ८९ हजार रुपये २१ मे २०१७ पासून ते २३ नोव्हेंबर २०१८ पर्यंत घेतले. सदर पैसे घेऊनही कर्ज मिळाले नाही. त्यामुळे बाकलीवाल यांनी तगादा लावल्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणात बाकलीवाल यांनी दिनेश जैन, अशरफ खान, सुनील सकपाल, विपुल पांडे आणि जितू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. \Bबनावट कागदपत्राआधारे फसवणूक \Bतेवीस हजारांचे कर्ज बुडवून दोघांनी कंपनीची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी राजेंद्र होनाजी इंगोले (रा. साई संकल्पना, गारखेडा) यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, साजेद खान निसार खान, शेख रेहान शेख खलीद (रा. शहाबाजार) यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे मोबाइल दुकानानतून कर्ज काढले होते. या कर्जापैकी २३ हजार ४३३ कर्ज बुडवून या दोघांनी कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. \Bपैसे देणाऱ्याला मारहाण \Bकर्ज मंजूर करून देतो म्हणून पैसे घेतले. त्यानंतर कामही केले नाही. उलट पैसे मागितल्यास मारहाण केली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन दिनेश आसावार (रा. कासलीवाल मार्वल) यांनी सौदागर सपकाळ (रा. चौधरी कॉलनी) यांना बँकेतून कर्ज काढण्यासाठी दोन लाख रुपये अडव्हॉन्स घेतले होते. मात्र, त्यांनी कर्ज मंजूर करून दिले नाही. तेव्हा आसावार यांनी दोन लाख रुपये परत मागितले असता २१ नोव्हेंबर रोजी दहाच्या सुमारास सौदागर सपकाळ हे पवन आसावारच्या घरी आले. पैसे परत देणार नाही म्हणत मारहाण केली. या प्रकरणी आसावार याच्या फिर्यादीवरून सपकाळ याच्याविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ………………
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट