म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मजुरांची संख्या, मस्टर तसेच जॉबकार्डमध्ये घोळ, उशिरा देण्यात येणारी मजूरी तसेच अपूर्ण कामांमुळे मराठवाड्यात बदनाम असलेल्या 'मनरेगा'ला पुनरुज्जीवन देण्याचा प्रयत्न प्रशासकीय स्तरावरून होत आहे. दुष्काळाच्या झळा सहन करत असलेल्या मराठवाड्यात रोहयो प्रशासनाने सव्वा लाख कामांचे नियोजन केले असले तरी नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्षात मात्र केवळ अडीच हजार कामांवर केवळ ११ हजार ७३२ मजूर उपस्थित आहेत. दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यातील लोकांच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगा योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा मानस विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी गावनिहाय आराखडे करून प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, तरीही मजूर मिळत नसल्याची स्थिती आहे. बहुतांश ठिकाणी वैयक्तिक लाभाची कामे सुरू आहेत. मात्र, ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक कामांची संख्याच कमी असल्यामुळे तसेच अत्यल्प मजुरीमुळेही मजूर उपस्थितीला फटका बसला असल्याचे चित्र आहे. १२ नोव्हेंबर रोजी विभागात सर्वाधिक ३९४५ मजूर उस्मानाबाद जिल्ह्यात असून सर्वात कमी ८६ मजूर परभणी जिल्ह्यातील कामांवर आहेत. ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक कामे देण्यात येतात. मात्र, सध्या विभागात केवळ १ हजार ७९३ कामे सुरू आहेत. गेल्यावर्षी या योजनेला प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने गेल्यावर्षी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या पुढाकाराने मार्च महिन्यामध्ये मनरेगा सप्ताह राबविण्यात आला. यासाठी आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच कृषी, रोहयो विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या होत्या व त्याचा उपयोगही झाला होता. या सप्ताहामध्ये गावामध्ये मनरेगासाठी पात्र लाभार्थी कुटूंब किती, जॉबकार्डधारकांची संख्या, रखडलेले नुतनीकरण, पात्र लाभार्थ्यांना योजनेतील कोणत्या पद्धतीचे कामाची गरज आहे. याबाबतची माहिती गोळा करण्यात आली होती. ग्रामपंचायत स्तरावरील कामे अधिक यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या ९९३ कामांच्या तुलनेत ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या १७९३ कामांना मजुरांची उपस्थिती आहे. विभागात ८ हजार ३८२ मजूर ग्रामपंचायतींच्या कामांवर तर ६ हजार ४ मजूर यंत्रणांच्या कामावर उपस्थित असल्याचा १२ नोव्हेंबर रोजीचा अहवाल आहे. जिल्हानिहाय स्थिती जिल्हा............. कामांची संख्या........ सरासरी मजूरसंख्या औरंगाबाद...........४४७..................... १ हजार ७५९ जालना................३३७.....................१ हजार ४३७ परभणी................४१२.....................१ हजार २४७ हिंगोली.................१५०......................४४१ बीड.....................७२१......................२ हजार ७०० नांदेड..................७२१.......................५ हजार ३११ उस्मानाबाद............५९.......................३९६ लातूर....................२५९.....................१ हजार ९४ ----------------------------------------------. एकूण...................२ हजार ७८६...............१४ हजार ३८६
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट