म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी शहर परिसरालगत होणाऱ्या महामार्गांच्या कामासाठी महापालिकेच्या 'एसटीपी'चे (सिव्हरेज ट्रीटमेंट प्लान्ट) पाणी वापरावे, असे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले. शहर तसेच परिसरामध्ये होत असलेले सिमेंट रस्ते, तसेच वृक्षारोपण, संवर्धन, गृहनिर्माण सोसायटी आदी बांधकामांसाठी या पाण्याचा वापर व्हावा, असे प्रयत्न महापौर तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. शहर परिसरात सध्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग व सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे. या कामासाठी 'एसटीपी'चे पाणी वापरणे सोईचे होणार आहे. यामुळे समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेसोबत करार करून 'एसटीपी' केंद्राचेच पाणी वापरणे बंधनकारक केले आहे. यासाठी कंत्राटदाराला पालिकेसोबत करार करून पाणी उपलब्ध करून घ्यावे लागणार आहे. याच प्रकारे सोलापूर-धुळे महामार्गासाठीही 'एसटीपी' केंद्राचे पाणी वापरण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच शहरातील गृहनिर्माण प्रकल्पांसाठी या पाण्याचा वापर करावा, यासाठी क्रेडाई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा सुरू आहे. बांधकाम व्यावसायिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. \Bहजार लिटरला पाच रुपये \B समृद्धी महामार्गाच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नसली तरी ३० महिन्यांमध्ये या रस्त्याचे बांधकाम पूर्ण होईल, असे नियोजन आहे. शिवाय पुढील काही काही वर्षे रस्त्याच्या दुरुस्ती आणि रस्त्यालगत वृक्षारोपण करून संवर्धन करावे लागणार आहे. समृद्धी महामार्गासाठी रोज दहा एमएलडी पाण्याची गरज आहे. महापालिकेतर्फे पाच रुपये प्रति एक हजार लिटर दराने हे पाणी दिले जाणार आहे. मात्र, पाणी वाहतूक करणे खर्चिक ठरणार असल्याने कंत्राटदाराकडून 'एसटीपी' प्लाँटवरून थेट जलवाहिनी टाकून पाणी घेऊन जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. \B'एसटीपी'चे शुद्ध पाणी नाल्यात\B सध्या शहरात कांचनवाडी तसेच सिडको एन १२ येथील सलीम अली उद्यान परिसरात, असे दोन 'एसटीपी' प्लाँट आहेत. या दोन्ही प्लाँटमधून दररोज सुमारे ६० ते ६५ एमएलडी पाणी शुद्ध केले जाते. मात्र या पाण्याचा उपयोग होत नाही. शुद्धीकरण केलेले पाणी नाल्यात सोडून देण्यात येते. संबंधित यंत्रणांनी हे पाणी घेतल्यास, पाण्याचा वापर होईल व पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल या उद्देशाने प्रयत्न करण्यात येत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट