म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद बांगलादेशात उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. तेथील क्षमता पाहा आणि उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करा, असे आवाहन बांगलादेशाचे उच्चायुक्त सय्यद मुझ्झम अली यांनी उद्योजकांना केले आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहराबद्दल वाचून होतो, पण जागतिक दर्जाची उद्योगनगरी येथे आहे, हे औरंगाबादेत आल्यावरच कळले, असे उद्गार ही त्यांनी यावेळी काढले. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) आणि बांगला देशाचे उप उच्चायुक्तातर्फे शुक्रवारी हॉटेल राम इंटरनॅशनल येथे बांगलादेशातील उद्योगाच्या संधी या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी येथील उद्योजकांशी संवाद साधताना बांगलादेशचे उच्चायुक्त सय्यद मुझ्झम अली बोलत होते. 'सीएमआयए'चे अध्यक्ष राम भोगले, उपउच्चायुक्त रहेमान आदी उपस्थित होते. प्रारंभी उद्योजक भोगले यांनी उच्चायुक्तांना औरंगाबादच्या उद्योगाची डिरेक्टरी, मानचिन्ह देत त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी बोलताना उच्चायुक्त अली यांनी, बांगलादेश रेडिमेड कपडे विक्रीत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. हे केवळ भारतामुळे शक्य झाले. कारण आमच्या देशात कापूस तयार होत नाही. तो आम्ही भारतातून आयात करतो, असे नमूद केले. भारत व बांगलादेशाची संस्कृती सारखी आहे, असे सांगतानाच त्यांनी,'आमच्या देशाकडून दहशतवादाला कधीच थारा दिल जात नाही. सुरक्षेला प्राधान्य दिले जाते,' असे नमूद केले. मी स्वातंत्र्य सैनिक आहे. त्यामुळे लिखित भाषण बाजूला ठेऊन मनापासून बोलतोय, अशी साद घालून त्यांनी,'बांगलादेशात उद्योगाच्या मोठ्या संधी आहेत, तेथील क्षमता पाहा,' असे आवाहन केले. बांगलादेशात औषधनिर्माण उद्योग अत्यंत उच्च दर्जाचा आहे. भारत-बांगलादेश एकत्र येऊन औषधनिर्माण क्षेत्रात काम केले तर चीनला नक्कीच मागे टाकू शकतो, असेही ते म्हणाले. भोगले यांनी औरंगाबादेतील उद्योग क्षेत्राच्या विस्तारासंदर्भात माहिती दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट