म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक बुधवारपासून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालय दुष्काळ नियोजनाच्या तयारीला लागले आहे, मात्र, कृषी विभाग तसेच इतर जिल्ह्यांकडून माहिती मिळविताना मंगळवारी (४ डिसेंबर) प्रशासनाची दमछाक उडाली.
दुष्काळाच्या दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पाहणीसाठी येणारे अधिकारी बैठक घेणार आहेत. दुष्काळाचे मोजमाप करण्यासाठी जाणाऱ्या पथकाला परिस्थितीची नेमकी माहिती व्हावी यासाठी विविध विभागांकडून पीपीटी तसेच संबंधित माहिती मागविण्यात येणार आहे. मात्र, मंगळवारी दुपारपर्यंतही कृषी विभागाकडून पीपीटी विभागीय कार्यालयाला मिळाली नव्हती. शिवाय जिल्हा प्रशासनानेही दुष्काळी पथक नेमके कोणत्या गावाला भेटी देणार आहेत याबाबतचीही माहिती पाठविली नव्हती, तर काही जिल्ह्यांमधून नियोजनामध्ये वारंवार बदल होत असल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची चिडचीड सुरू होती.
दरम्यान, बुधवारी (५ डिसेंबर) सकाळी नऊ ते साडेदहा दरम्यान विभागीय आयुक्तालयात या पथकासमोर दुष्काळीस्थितीची माहिती सादर करण्यात येणार आहे. यानंतर एक पथक औरंगाबाद जिल्हात भेटी देऊन जळगावकडे रवाना होईल. दुसरे पथक जालना येथून बुलडाणा येथे रवाना होईल. तर तिसरे पथक पुण्याच्या दिशेने रवाना होईल. मराठवाड्यात दोन दिवस पाहणी करण्यात आल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिन्ही पथके मुंबईत एकत्र येऊन बैठक घेतील, असे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले. यंदा अत्यल्प पावसामुळे राज्य सरकारने १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला, त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी राज्यातील २६८ महसुली मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर करुन सवलती देण्याचे जाहीर केले. यामध्ये मराठवाडा विभागाचा बहुतांश भागाचा समावेश करण्यात आला आहे, विभागात दुष्काळामुळे खरीप आणि रबी पिकांची धुळधाण उडाली असून पेरणीचा खर्च निघेल एवढेही उत्पन्न मिळाले नसल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडले आहे. दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर निधी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.
मराठवाड्याची स्थिती
पर्जन्यमान - ५०१.७४ मिमी (सरासरीच्या तुलनेत ६४.४१ टक्के)
५० टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान तालुके - ११,
५० ते ७५ टक्के - ४९
७५ ते १०० टक्के - ८८
१०० टक्क्यांपेक्षा अधिक - २०
पाणीसाठा
मोठे प्रकल्प - २५.९३ टक्क्के
लघु प्रकल्प - १४.८६ टक्के
एकुण पाणीसाठा - २२.६३ टक्के
जायकवाडी - २७.०० टक्के
पैसेवारी (खरीप)
हंगामी - ५० पैसे खालील गावे - २९५८ (औरंगाबाद १३३५, जालना - ९९२, बीड- ६७१)
सुधारित - ५० पैसे खालील गावे - ६४५८ (औरंगाबाद १३३९, जालना - ९७१, परभणी ७५४, नांदेड - ३०५, बीड - १४०२, लातूर ९५१, उस्मानाबाद ७३६)
टँकर
एकूण - ५१८
औरंगाबाद ४०८, जालना ६१, नांदेड २, बीड ४२, उस्मानाबाद ४.
गेल्या पाच वर्षातील स्थिती - २०१३-१४ - २१३६, २०१४-१५ - १४४४, २०१५-१६ - ४०१५, २०१६-१७ - ९४०
विहीर अधिग्रहण
एकुण - ३८७
औरंगाबाद २१३, जालना ७५, नांदेड २, बीड ३४, उस्मानाबाद ६३.