म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनधारकांचा आता वाहन परवाना धोक्यात येणार आहे. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी हे आदेश जारी केले आहेत. यामध्ये विविध सहा प्रकारच्या गुन्ह्याचा समावेश असून, तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हे लायसेन्स रद्द करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सुरक्षा समितीची स्थापना केली आहे. ही समिती देशातील सर्व राज्यांना रस्ते सुरक्षेसंदर्भात वेळोवेळी निर्देश देते. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये राज्यांमधील अपघात, मृत्यूचे प्रमाण यावर चिंता व्यक्त करण्यात आली; तसेच पोलिस विभागातर्फे वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या चालकांचा वाहन परवाना निलंबित स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामध्ये खालील सहा प्रकारच्या गुन्ह्याचा समावेश आहे. त्यात विहित मर्यादापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, मद्य प्राशन करून वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आदी कलमांचा समावेश आहे. पोलिस विभाग प्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहनचालकाच्या गुन्ह्याची माहिती देत परवाना रद्द करण्यासंदर्भात अहवाल पाठवणार आहे. याच्या नोंदी संगणक प्रणालीत घेण्यात येणार असून, यामुळे वाहनचालकांना भविष्यात शासकीय सुविधा, पासपोर्ट काढण्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. वाहनचालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट