December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जुन्या वादातून तसेच अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या खून प्रकरणातील आरोपी पंडित विश्वनाथ पवार याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी बुधवारी (१९ डिसेंबर) फेटाळला.
या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश मधुकर पवार यांनी फिर्याद दिली होती. चिंचोली लिंबाजी शिवारातील गट क्रमांक ५७ मध्ये मथाजी लक्ष्मण बनसोडे (५०, रा. चिंचोली लिंबाजी, ता. कन्नड) यांचा मृतदेह २० ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास सापडला होता. या प्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी राजेंद्र नारायण बावस्कर, पंडित विश्वनाथ पवार, संजय देवबा पवार व विलास सांडू मगर यांनी मथाजी लक्ष्मण बनसोडे यांना जुन्या भांडणावरुन १९ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ ते ११ या वेळेत काठ्या, केबल वायर व इतर साहित्याने गंभीर स्वरुपाची मारहाण केल्याची कबुली दिली होती. त्याचवेळी जुन्या वादातून व अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे मथाजी यांचा चौघांनी खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात स्पष्ट झाले होते. त्यावरून आरोपींविरुद्ध भादंवि ३०२, २०१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस कोठडी दरम्यान आरोपी राजेंद्र बावस्कर याने तिघांच्या सहाय्याने खून केल्याचे कबुल केले होते. या चौघांना अटक होऊन त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानंतर पंडित पवार वगळता इतर तिघांनी नियमित जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता, तर पंडित विश्वनाथ पवार (३०, रा. चिंचोली, ता. कन्नड) याने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला होता.
\Bआरोपी पुरावा करू शकतो नष्ट
\Bआरोपी पंडित याच्या नियमित जामिनावरील सुनावणीवेळी, मथाजी यांना मारहाण करताना दोन प्रत्यक्षदर्शींनी पाहिले होते. जामीन मंजूर केल्यास आरोपी साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, पुरावा नष्ट करू शकतो. तसेच इतर तीन आरोपींचा नियमित जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळलेला आहे. त्यामुळे पंडित याचाही नियमित जामीन फेटाळावा, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा अनिल देशमुख हिच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी राहुल सुरेंद्र शर्मा याला बुधवारी (१९ डिसेंबर) कोर्टात हजर केले असता २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी दिले. दरम्यान, आरोपी राहुल याच्यासोबत काम करणारे तीन परप्रांतीय मजूर हे देखील त्या घटनेनंतर बाहेरगावी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा गुन्ह्याशी संबंध आहे का, याचा तपास करावयाचा असल्याने शर्माची पोलिस कोठडी मागण्यात आली.
'एमजीएम'च्या गंगा वसतिगृहातील खोली क्रमांक ३३४ मध्ये राहणाऱ्या आकांक्षा देशमुख हिचा १० डिसेंबर रोजी खून झाला. या प्रकरणात सिडको पोलिसांनी संशयित आरोपी राहुल शर्मा याला मोबाईल लोकशनवरून वाराणसी ते मुंबई महानगर एक्स्प्रेसने जनरल डब्यातून प्रवास करताना धावत्या रेल्वेतून ताब्यात घेतले. राहुल सुरेंद्र शर्मा (वय २६, रा. दुधी, पोस्ट डुमरडोहा, जि. सोनभद्र, उत्तर प्रदेश) याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला १८ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता अटक करून बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. खून करण्यामागे उद्देश काय होता, तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे का, याच्या सखोल तपासासह आरोपीच्या ताब्यातून सोन्याची चेन जप्त करावयाची आहे. या घटनेनंतर शहर सोडून गेलेले आरोपीसोबत काम करणारे तीन परप्रांतीय मजुरांच्या गुन्ह्याशी संबंध आहे का, शर्मा याचे साथीदार आदी बाबींचा तपास करावयाचा असल्याने सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील अॅड. सूर्यकांत सोनटक्के यांनी केली. ही विनंती मान्य करण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आकांक्षा देशमुखच्या खुनानंतर महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये असे प्रसंग उद्भल्यास महिला व तरुणींना स्वत:चे रक्षण करता यावे यासाठी कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कम्युनिटी पोलिसिंग आणि धवल क्रांती रिसर्चच्या वतीने हा उपक्रम घेण्यात येत आहे. यामध्ये शहरातील महाविद्यालयामध्ये कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये रामेश्वर चायल, अश्विनी चायल, रिजवाना पटेल, जान्हवी देशमुख, अस्मिता भवर आणि राजश्री सोनवणे हे प्रशिक्षण देणार आहेत. या कराटे प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक बुधवारी 'एमजीएम'मध्ये करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, एपीआय घनश्याम सोनवणे, धवल क्रांतीचे डॉ. किशोर उढाण, अविनाश जोशी, अॅड. पंकज कुलकर्णी, डॉ. सोनी चव्हाण, रेक्टर प्रेरणा दळवी यांची उपस्थिती होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाहतूक बेट दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांना सुशोभीकरण कसे करणार याबद्दल समितीसमोर सादरीकरण करावे लागणार आहे. त्यानंतरच हे बेट दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
शहराचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. सुमारे दोनशे चौक, वाहतूक बेट आणि रस्ता दुभाजक सुशोभीकरणासाठी दानशूर व्यक्ती, व्यावसायिक, संस्था - संघटनांना दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाच्यासाठी गेल्या आठवड्यात 'जेएनईसी'च्या सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला सुमारे दोनशे नागरिक, व्यावसायिक उपस्थित होते. त्यापैकी अनेकांनी चौक व वाहतूक बेटांच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी तयारी दाखवली. पाच वर्षांसाठी करार करा आणि काम करण्यास तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर महापालिकेने चौक व वाहतूक बेट दत्तक देण्याच्या संदर्भात प्रत्यक्ष काम सुरू केले आहे.
\Bसमिती करणार निरीक्षण
\Bवाहतूक बेट कामासाठी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांचा समावेश असणारी समिती तयार केली जाणार आहे. त्यात आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिकांचा समावेश असेल. ही समिती चौक, वाहतूक बेट आणि रस्ता दुभाजक दत्तक देण्याबद्दल निर्णय करणार आहे. ज्या संस्थेला किंवा व्यक्तीला या योजनेत भाग घ्यायचा आहे, त्यांना सुशोभीकरण व सौंदर्यीकरणाबद्दल सादरीकरण करावे लागेल. हे सादरीकरण पाहून दत्तक योजनेत त्या व्यक्ती किंवा संस्थेच्या सहभाग करून घेण्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
जळगाव ते औरंगाबाद रस्त्यावर लिहाखेडी फाटा येथील एका ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने मोटरसायकल स्वारास चिरडले. या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी रात्री साडे सात वाजता झाला. अपघातात ठार झालेल्या पित्याचे नाव पापाखान हैदरखान (वय ६०,) व मुलाचे नाव शाहरुखखान पापाखान (वय २३ रा. डोंगरगाव ता. सिल्लोड), असे आहे. दोघे सोयगाव येथे भंगारचा व्यवसाय करत होते.
सोयगाव येथून काम आटोपून दोन्ही पिता-पुत्र हे घरी डोंगरगाव येथे येत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला (एम एच २० एक्स ०१२७) यास जोरांची धडक दिली. या अपघातात दोघे जागीच ठार झाले. अपघातास कारणीभूत असलेले वाहन मात्र पसार झाले. पोलिस त्याचा शोध घेत आहे. अपघात होताच स्थानिक नागरिकांच्या माहितीवरून पोलिस तत्काळ अपघातस्थळी दाखल झाले. दोन मृतांना सुनील मिरकर यांच्या रुग्णवाहिकेतून सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले. या अपघाताची नोंद अजिंठा पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात आमदार अब्दुल सत्तार, सुरेश पाटील बनकर, सुनील पाटील मिरकर, इद्रीस मुलतानी, नंदकिशोर सहारे, विजय वानखेडे, निजाम पठाण यांनी भेट देऊन मृताच्या कुटुंबाचे सांत्वन केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
December 19, 2018, 2:30 pm
विकासकामाच्या उद्घाटनात मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंच्या वेळेचे त्रांगडे
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ आणि सिटी बससेवेचे लोकार्पण करण्यासाठी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मात्र या कार्यक्रमासाठी २३ डिसेंबरची वेळ दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना डावलत ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यक्रम करायचा की ठाकरेंना वेळ बदलायला लावायची असा नवा पेच महापालिकेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ, सिटी बससेवेचे लोकार्पण, एसटीपीचे उद्घाटन आणि कचऱ्यापासून गॅस निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन हे सर्व कार्यक्रम एकाच दिवशी व्हावेत, असा महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. त्या दृष्टीने त्यांनी शिवसेनेचे नेते तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची वेळ घेतली. त्यांनी २३ डिसेंबर रोजी येण्याचे मान्य केले. आदित्य ठाकरे यांनी वेळ मिळाल्यावर मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हालचाल सुरू केली. २३ डिसेंबरच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेते विकास जैन आणि विरोधीपक्षनेते जमीर कादरी बुधवारी मुंबईत गेले. त्यांना सायंकाळी साडेपाच वाजता वर्षा बंगल्यावर या असे सांगण्यात आले. साडेपाचच्या ऐवजी दहा मिनीटे उशिरा हे सर्वजण 'वर्षा' वर पोचले. पदाधिकाऱ्यांना उशीर झाल्यामुळे 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी भाजपचे आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक सुरू केली. बैठक संपण्याची वाट पहात महापौरांसह पालिकेचे पदाधिकारी आठ वाजेपर्यंत वेटिंगरुममध्ये बसून राहिले. मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आम्ही रात्री नऊ वाजताच्या रेल्वेने परत निघत आहोत, असे महापौरांनी 'मटा' शी बोलताना सांगितले.
उपमहापौर विजय औताडे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी महापौर आले आहेत ही माहिती मुख्यमंत्र्यांना आमदार अतुल सावे यांनी भाजप आमदारांची बैठक सुरू असताना दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सावे यांच्यासह आमदार सुजीतसिंह ठाकूर यांना महापौरांशी चर्चा करण्यासाठी पाठविले. महापौरांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा उद्देश ठाकूर यांना सांगितला. महापौरांचा निरोप घेऊन ठाकूर मुख्यमंत्र्यांकडे गेले. चिठ्ठीवर त्यांनी महापौरांचा निरोप लिहून मुख्यमंत्र्यांकडे चिठ्ठी दिली. मुख्यमंत्र्यांनी त्याच चिठ्ठीवर निरोप लिहून जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण औरंगाबादला येऊ, असा उल्लेख केला आणि हा निरोप महापौरांना पोचवा असे ठाकूर यांना त्यांनी सांगितले. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांचा निरोप महापौरांना सांगितला. हा निरोप ऐकून महापौर माघारी फिरले.
महापौर सापडले पेचात
मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांच्या कामासाठी १०० कोटींचा विशेष निधी दिला. कचराकोडी फोडण्यासाठी ९१ कोटींचा निधी दिला. रस्त्यांच्या कामासाठी आणखी शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची त्यांची तयारी आहे. असे असताना २३ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांना डावलून आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत विविध कामांचा शुभारंभ करायचा की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थांबून मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच शुभारंभ करायचा असा पेच महापालिकेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. २३ डिसेंबर रोजी कार्यक्रम होणार नाही हे आदित्य ठाकरे यांना कसे आणि कुणी सांगायचे असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांना डावलून महापौरांनी विविध कामांच्या शुभारंभाचा कार्यक्रम घेतला तर भविष्यात मुख्यमंत्र्यांकडून शहरासाठी मदत मिळवताना अडचण निर्माण होऊ शकते, असेही बोलले जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपल्याला सभोवताली अनेक काळजाला भिडणारे अनेक सामाजिक विषय आहेत, त्यासाठी अभ्यास, निरीक्षण महत्त्वाचे आहे. अशा विषयांसह समाजातील आदर्शमूल्यांची जपणूक करणाऱ्या दर्जेदार लघुपटांची निर्मिती शक्य असल्याचा सूर बुधवारी झालेल्या लघुपट महोत्सवात मान्यवरांच्या मार्गदर्शनातून निघाला.
पवार स्टुडिओ व फाउंडेशनतर्फे महसूल प्रबोधिनी सभागृहात बुधवारी लघूपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक डॉ. देवदत्त म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयंत शेवतेकर, यांच्यासह प्रा. पंजाबराव मोरे, शेषराव पठाडे, आयोजक अर्जुन पवार, प्रमोद माने, प्रा. सिद्धार्थ तायडे, संजय राजूरकर आदी उपस्थित होते. डॉ. म्हात्रे यांनी चित्रपट निर्मितीचा इतिहास सांगून पौराणिक, कौटुंबिक, सामाजिक, प्रादेशिक प्रवास उलगडून तरूण बदलत्या संकल्पना चित्रपटांत आणत आहेत आणि करिअर करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. शेवतेकर म्हणाले, अभ्यास आणि अनुभवातून लघुपटांची निर्मिती केल्यास सामाजिक जाणिवा मोठ्या प्रमाणात जपल्या जातील. लघुपटांचे पेव फुटले आहे. मात्र, हे लघुपट बनवताना संयम, सूक्ष्म अभ्यास आणि निरीक्षण तसेच अनुभवाचा उपयोग केल्यास एका मिनिटाच्या चित्रपटालाही जग डोक्यावर घेऊ शकते. यावेळी प्रा. मोरे यांनीही लघुपटांचे यश मांडले. आजच्या कलावंतांमध्येही नागराज मंजुळेसारखे प्रतिभावान कलाकार दडलेले आहेत. अशा महोत्सवातून असे कलाकार पुढे येतील असेही ते म्हणाले. पत्रकार शाहीर शेषराव पठाडे यांनी अशा महोत्सवातून सर्जनशिलतेला चालना मिळून अनेक भावी दिग्दर्शक आणि निर्मात्याची पिढी घडविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी अर्जुन पवार, वसंतराज वक्ते, सुनील कोरके, जॉन भालेराव आदींनी परिश्रम घेतले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
क्रांती चौक उड्डाण पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी बुधवारी दिले.
औरंगाबाद खंडपीठातील वकील रूपेश जैस्वाल यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने या आधी दिलेल्या आदेशानुसार विविध कामांचा आढावा घेत आदेश दिले. शिवाजीनगर येथील रेल्वे लाइनखालून जाणारा भुयारी मार्ग तीन मीटर उंचीचा असावा की चार मीटर, यावर महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त पाहणीत एकमत न झाल्याने यावर एकत्रित बैठक घेऊन निर्णय करण्यात येईल, असे म्हणणे सार्वजनिक बांधकाम विभागाने मांडल्यानंतर खंडपीठाने ते म्हणणे रेकॉर्डवर घेतले. क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या २०१५मध्ये व्हाइट टॉपिंगच्या, ३० कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या रस्त्यावर ३९ कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाविरोधात जैस्वाल यांनी आक्षेप अर्ज दाखल केला. एकीकडे रस्ते बांधण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले जाते आणि दुसरीकडे एकाच रस्त्यासाठी ३९ कोटी रुपयांच्या खर्च प्रस्तावित केला जातो आहे. हा ३९ कोटींचा निधी शहरातील इतर नादुरुस्त रस्त्यांवर खर्च करण्यात यावा, अशी विनंती या अर्जात करण्यात आली आहे.
\Bचार जानेवारीला सुनावणी
\Bगोलवाडी रेल्वे उड्डाणपुलासंदर्भात रेल्वेच्या वतीने मनीष नावंदर यांनी सांगितले की, २० कोटी रुपयांच्या आतील कामांसाठी रेल्वेची एक विशेष समिती (सीएओ/सी) यांची परवानगी घ्यावी लागते. यावर खंडपीठाने आदेशित केले, की समितीकडून अशी परवानगी दहा दिवसांत मिळवावी आणि त्यापुढील १५ दिवसांत या कामाचे ई -टेंडर काढण्यात यावेत. शहरातील उड्डाणपुलांखालील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात काय कारवाई केली, याबाबत शपथपत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश खंडपीठाने राज्य शासनाला दिले. राज्य शासनातर्फे अमरजितसिंह गिरासे, महापालिकेतर्फे राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले. या याचिकेची सुनावणी चार जानेवारीला होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका सुरू असून पहाटे तसेच सायंकाळी शहर गारठून जाते. गेल्या आठवड्यामध्ये ९.८ अंशावर घसरलेल्या तापमानाची बुधवारी (१९ डिसेंबर) आणखी घसरण होऊन किमान तापमान ८.९ अंश होते. तापमान कमी होऊन सोबत थंड वारे वाहत असल्यामुळे शहरवासीयांना प्रचंड थंडी जाणवत आहे. डिसेंबरमध्ये थंडीत वाढ झाली असून काही दिवसांपासून पहाटे थंडी व दिवसा कडक ऊन आणि सूर्य मावळताच पुन्हा थंडी असे वातावरण शहरवासीयांना अनुभवायला मिळत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
December 19, 2018, 2:30 pm
वाळूज महानगर: चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी आलेल्या चोराला पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याचा ताब्यातून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. या दुचाकींची किंमत सुमारे सव्वा लाख रुपये आहे. सय्यद सिराज (वय ३० रा. दौलताबाद), असे त्याचे नाव आहे. तो काही दिवस पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करत होता. त्याच्या पसार साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत.
वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात एक जण चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. येथे पोलिस पथकाने सकाळी साडेदहाच्या सुमारास संशयिताला अडवून दुचाकीच्या कागदपत्राची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून संशय बळावल्याने पोलिस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. एका साथीदारांच्या मदतीने विविध ठिकाणावरून पाच दुचाकी चोरल्या असून त्या दौलताबादला राहत्या घरी लपवल्याचे त्याने चौकशीत सांगितले. सय्यद सिराज हा मूळ पंढरपूर (ता़ औरंगाबाद)चा रहिवासी आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल रोडे, हेडकॉन्स्टेबल वसंत शेळके, पोलिस नाईक फकीरचंद फडे, सुधीर सोनवणे, प्रकाश गायकवाड, शैलेंद्र अडियाल, पोलिस शिपाई मनमोहन कोलिमी, राजकुमार सूर्यवंशी, देवीदास इंदोरे, बाळासाहेब आंधळे, प्रदीप कुटे यांच्या पथकाने सापळा रचला होता.
\Bजप्त केलेल्या दुचाकी\B
बजाज पल्सर एम एच २१ ए सी ५००१, हिरो स्प्लेंडर एम एच ०५ एए ८५०, टीव्हीएस स्टार सीटी एम एच २० एक्यु २८०२,
बजाज डिस्कव्हर एम एच १८ एएम ५६५६, होंडा सीबी एम एच ०५ एसी २३८६
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाहतूक बेट दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांना सुशोभीकरण कसे करणार याबद्दल समितीसमोर सादरीकरण करावे लागणार आहे. त्यानंतरच हे बेट दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
शहराचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. सुमारे दोनशे चौक, वाहतूक बेट आणि रस्ता दुभाजक सुशोभीकरणासाठी दानशूर व्यक्ती, व्यावसायिक, संस्था - संघटनांना दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणाच्यासाठी गेल्या आठवड्यात 'जेएनईसी'च्या सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला सुमारे दोनशे नागरिक, व्यावसायिक उपस्थित होते. त्यापैकी अनेकांनी चौक व वाहतूक बेटांच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी तयारी दाखवली. पाच वर्षांसाठी करार करा आणि काम करण्यास तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर महापालिकेने चौक व वाहतूक बेट दत्तक देण्याच्या संदर्भात प्रत्यक्ष काम सुरू केले आहे.
\Bसमिती करणार निरीक्षण
\Bवाहतूक बेट कामासाठी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांचा समावेश असणारी समिती तयार केली जाणार आहे. त्यात आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिकांचा समावेश असेल. ही समिती चौक, वाहतूक बेट आणि रस्ता दुभाजक दत्तक देण्याबद्दल निर्णय करणार आहे. ज्या संस्थेला किंवा व्यक्तीला या योजनेत भाग घ्यायचा आहे, त्यांना सुशोभीकरण व सौंदर्यीकरणाबद्दल सादरीकरण करावे लागेल. हे सादरीकरण पाहून दत्तक योजनेत त्या व्यक्ती किंवा संस्थेच्या सहभाग करून घेण्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. आकांक्षा देशमुख खून प्रकरण अवघ्या सात दिवसांत उघडकीस आणत आरोपीला अटक करणाऱ्या सिडको पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवसेना महिला आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांचा सत्कार करण्यात आला.
एमजीएम कँपसमधील गंगा हॉस्टेलच्या खोली क्रमांक ३३४ मध्ये राहणारी विद्यार्थीनी आकांक्षा देशमुख हिचा १० डिसेंबर रोजी रात्री गळा आवळून खून करण्यात आला होता. वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या खुनाचा गंभीर प्रकार घडल्याने हे प्रकरण राजकीय पक्षांनी देखील उचलून धरले होते. सिडको पोलिसांनी अथक तपास करीत संशयित आरोपी राहुल शर्मा या मजुराला उत्तरप्रदेश येथून जेरबंद केले. शिवसेना महिला आघाडीने बुधवारी गुन्हा उघडकीस आल्यामुळे पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, संध्या जाधव, राजश्री पोफळे, स्मीता जोशी, प्राजक्ता राजपूत यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. तसेच मनसेच्या वतीने ललीत सरदेशपांडे आणि सहकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक परदेशी यांचा सत्कार केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा - देवळाई परिसरात विकास करण्यासाठी तयार करण्यात येत असलेला सहाशे कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजुरीसाठी येत्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. सभेच्या मान्यतेनंतर तो शासनाकडे पाठवण्यात येईल. पाणीपुरवठा आणि ड्रेनेजलाइन कामांसाठी हा अहवाल तयार केला जात आहे.
सातारा - देवळाई परिसराचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर या परिसराच्या विकासासाठी शासनाने विशेष निधी द्यावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा निधी मिळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाला पाठवणे गरजेचे आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने यश इनोव्हेशन सोल्युशन्स या संस्थेला काम दिले आहे. या संस्थेने ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात सातारा - देवळाई भागाचे ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सर्वेक्षण केले. सुमारे १८० मीटर उंचीवरून छायाचित्र घेतली. या आधारे पाणीपुरवठा जलवाहिन्या आणि ड्रेनेजलाइन कुठे आणि कशा टाकायच्या याचा आराखडा डीपीआर स्वरुपात तयार करण्याचे काम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठ ते दहा दिवसांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर 'डीपीआर' मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवला जाणार आहे. या मंजुरीनंतर तो शासनाकडे पाठवण्यात येईल. शासनाचा नगरविकास विभाग 'डीपीआर'चा अभ्यास करून निधी देण्याबद्दल निर्णय घेईल.
\Bआचारसंहितेपूर्वी शासन दरबारी
\Bलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सातारा - देवळाईचा डीपीआर शासन दरबारी सादर केला जावा, यासाठी महापालिकेचे पदाधिकारी आग्रही आहेत. त्यामुळे लवकरात लवकर 'डीपीआर' तयार करून तो सर्वसाधारण सभेत मांडला जावा, यासाठी पदाधिकारी व काही नगरसेवकांकडून पाठपुरावा केला जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेने मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आठ दिवसांत ३०७ कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आठ झोन कार्यालयाच्या क्षेत्रात ही कार्यवाही करण्यात आली.
मोकाट कुत्र्यांपासून होणाऱ्या त्रासाबद्दल नगरसेवक व नागरिक नेहमी आवाज उठवतात. मोकाट कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे गेल्या महिन्यात दोन बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुत्र्यांचा प्रश्न पालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतला. ११ डिसेंबर ३१ डिसेंबर दरम्यान कुत्रे पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश पशूसंवर्धन विभागाला देण्यात आले. दररोज किमान पन्नास कुत्रे पकडा आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करा, असे या विभागाला सांगण्यात आले. झोन कार्यालयनिहाय या मोहिमेचे नियोजन करण्याची सूचना देण्यात आली. मोकाट कुत्रे पकडण्यासाठी महापालिकेने ब्ल्यू क्रॉस या संस्थेची नेमणूक केली आहे. संस्थेने पालिकेच्या मदतीने तीन डॉग व्हॅन तयार केल्या आहेत. या व्हॅनवर पंधरा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांनी ११ ते १८ डिसेंबरच्या दरम्यान ३०७ मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या. झोन क्रमांक एक ते आठपर्यंत ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती शाहेद शेख यांनी दिली. गुरुवारी झोन क्रमांक नऊ कार्यालयाच्या क्षेत्रात कुत्रे पकडण्याची कारवाई केली जाणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
'ईश्वर चराचरात आहे. माणसाच्या सत्कर्माने त्याला देवपण प्राप्त करता येऊ शकते. यासाठी त्याचे कर्म महत्त्वाचे आहेत. आपण जगत असतांना दुसऱ्याला जगायला मदत करणे हीच खरी मानवता आहे. त्यामुळे प्रत्येकाने चांगले कर्म करणे गरजेचे असून धर्म संस्कृती याची भक्तीला जोड झाल्यास नवी दिशा मिळते,' असा उपदेश जगदगुरु नरेद्रंचार्य महाराज यांनी केले.
स्व.गोकुळचंद खिंवसरा सामाजिक प्रतिष्ठाणतर्फे आयोजित राज्यस्तरीय कीर्तन प्रवचन महोत्सवात त्यांनी बुधवारी प्रवचन दिले. 'मनुष्य जन्म हा महत् प्रयासाने मिळणार आहे. त्याचे सार्थक करणे आपले काम आहे. तुमच्या बुद्धीचा वापर कसा करता यावर त्याचे फलित अवंलबून आहे. देवाला देखील चुकीने केलेल्या गोष्टीचे प्रायश्चित भोगावे लागले असेल, तर तुम्ही आम्ही कोण?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोह मायेचा त्याग केला तर ईश्वर प्राप्ती करू शकतो, त्यासाठी संन्यास घेण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. त्यांनी सुमारे अडीच तास भाविकांना उपदेश केला.
यावेळी आयोजक राजेश खिंवसरा व त्यांच्या कुटुंबाच्या वतीने महाराजांची पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार, आमदार संतोष दानवे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रीस मुलतानी, वैजयंती खैरे, सुरेश बनकर, देविदास लोंखडे, ज्ञानेश्वर मोठे, विष्णू काटकर, अॅड अशोक तायडे, कमलेश कटारिया, राजू गौर, दादाराव आळणे, नंदकिशोर संहारे आदींनी महाराजांचे दर्शन घेतले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
येथील गिरजानगरमध्ये एका घरात अचानक गॅस सिलिंडरचा भडका उडून संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम आदी जळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेचा पंचनामा तहसील कार्यालयातर्फे करण्यात आला.
किसन काशिनाथ बनसोडे हे गट क्रमांक ३५३मधील गिरजानगर येथे राहतात. त्यांनी मंगळवारी (१८ डिसेंबर) इंडेन गँस एजन्सीतून सिलिंडर आणले व जोडणी करून ते सुरू केले. सिलिंडर सुरू करताच अचानक मोठा भडका उडाला. काही वेळात घरातील वस्तूंनी पेट घेतला. जमलेल्या नागरिकांनी त्वरित घरातील पाणी ओतले शिवाय शेजारीच असलेले टँकर बोलावून संजय गायकवाड, प्रभाकर बनसोडे, विजय ढोले, विजय बनसोडे, अजय बनसोडे, अनिल बनसोडे आदींनी मदतकार्य केले. संजय गायकवाड यांनी पेटलेल्या घरात घुसून गॅस सिलिंडर विझवला. तो वेळीच विझवला नसता तर स्फोट होण्याची दाट शक्यता होती. या घटनेचा पंचनामा तलाठी दिलीप बावस्कर यांनी केला आहे. मजूर असलेल्या बनसोडे यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आकांक्षा देशमुख खून प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या परप्रांतीय आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी जिल्हा वकील संघाला एका निवेदनाद्वारे बुधवारी करण्यात आली.
एमजीएमच्या वसतिगृहात १० डिसेंबर रोजी आकांक्षा देशमुख या विद्यार्थिनीचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी सिडको पोलिसांनी त्या ठिकाणी बांधकाम करणारा उत्तरप्रदेश येथील मजूर संशयित आरोपी राहुल शर्माला अटक केली आहे. परप्रांतीय आरोपीच्या मुद्द्यावरून मनसेने उडी घेतली आहे. जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षाची भेट घेत मनसेने त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात हे प्रकरण संवेदनशील आणि गंभीर आहे. बाहेर राज्यातील रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय आरोपीने स्थानिक मुलीची हत्या केली आहे. आकांक्षा ही आई-वडिलांना एकुलती एक होती. या सर्व बाबींचा विचार करून परप्रांतीय आरोपी राहुल शर्माचे वकीलपत्र स्वीकारू नये, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, जिल्हा संघटक बिपीन नाईक, संदीप कुलकर्णी, वैभव मिटकर, सतनामसिंग गुलाटी, राजू जावळीकर, मंगेश साळवे, राहुल पाटील, प्रवीण मोहिते, अॅड. निनाद खोचे आणि किरण जोगदंडे आदींची उपस्थीती होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस आयुक्तलयात बुधवारी सकाळी विविध आस्थापनांच्या विशाखा समितीची सदस्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ-निवारण प्रतिबंध भरपाई कार्यशाळा कायदा २०१३चे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला विशाखा समिती सदस्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी या कार्यशाळेमध्ये शहरातील महाविद्यालय, शासकीय कार्यालय, शासकीय वैद्यकीय कॉलेज, खासगी वैद्यकीय कॉलेज, आकाशवाणी, कारागृह, प्रसार माध्यमे, खासगी कंपन्यामधील विशाखाचे सदस्य, शासकीय आणि निमशासकीय कार्यालय आदींचे सदस्य उपस्थित होते. अॅड. विजय देशमुख यांनी कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ आणि कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी महिला अत्याचार सबंधातील गुन्ह्याची माहिती सांगितली. सहायक सरकारी वकील अॅड.अर्चना गोंधळेकर यांनी या कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत उपस्थित महिलांना दामिनी पुस्तकाचे वाटप करण्यात आले. या कार्यशाळेला विशाखा समितीतील २५० सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस निरीक्षक किरण पाटील, उपनिरीक्षक जयश्री कुलकर्णी यांच्यासह महिला सहाय कक्षातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 19, 2018, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, पैठण
भागवत एकादशीनिमित्त बुधवारी हजारे भाविकांनी कडाक्याच्या थंडीत गोदावरीच्या पात्रात स्नान करून नाथ समाधी मंदिर व गावातील नाथ मंदिरात दर्शन घेतले. कडाक्याच्या थंडीतही सकाळपासून गंगास्नान व त्यानंतर दर्शनासाठी भाविकांचे जथ्थे नाथनगरीत दाखल झाले. दुपारनंतर शहरातील नाथ मंदिर मार्गावरील रस्ते रस्ते पायी येणाऱ्या दिंड्या व एसटी बससह विविध वाहनांतून आलेल्या वारकरी भाविकांनी गजबजून गेले. गावातील नाथ मंदिरात नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते विजयी पांडुरंग व नाथांच्या पादुकांची विधिवत, मंत्रघोषात अभिषेक व इतर पूजा करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 19, 2018, 9:05 pm
म. टा. प्रतिनिधी, बीड
प्रेमविवाहाला असणाऱ्या विरोधातून, दाम्पत्यावर सख्ख्या मेहुण्याने जीवघेणा हल्ल्याची घटना बीडमध्ये बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या घटनेमध्ये तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेतील तरुण-तरुणी इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकत होते.
सुमित वाघमारे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो जिल्ह्यातील तालखेडचा (ता. माजलगाव) रहिवासी आहे. सुमित आणि त्याची प्रेयसी दोघेही बीडमधील एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकत होते आणि तेथेच त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, त्या मुलीच्या घरातून त्याला विरोध होता. तरीही दोघांनी दोन महिन्यांपूर्वी विवाह केला होता. त्यातून सुमित आणि मुलीचा भाऊ बालाजी लांडगे यांच्यामध्ये जोरदार भांडणही झाले होते. याच रागातून बालाजीने काही मित्रांच्या साथीने बुधवारी सुमित व त्याच्या पत्नीवर हल्ला केला. यामध्ये सुमितचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्व आरोपी फरार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧