म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्याची दुष्काळात अक्षरश: होरपळ सुरू झाली आहे. विभागातील ५० नगरपालिका आणि २५ नगरपंचायतींपैकी बहुतांश शहरे तहानलेली असून, यापैकी अनेक शहरांना दहा ते बारा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वात मोठे शहरत असलेल्या औरंगाबादला चार दिवसांआड तर लातूर जिल्ह्यातील शहरांना तब्बल आठ ते दहा दिवसानंतर पाणी मिळत आहे.
हिवाळ्यामध्ये बाष्पीभवनाचा दर कमी असला तरी येणारा उन्हाळ्यात मराठवाड्यात दुष्काळाचे भीषण चटके सहन करावे लागणार आहेत. या अनुषंघाने प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दररोज आढावा घेण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अहवालानुसार औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड तसेच परभणी जिल्ह्यातील काही शहरांमधील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. औरंगाबादला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे २५ टक्के पाणीसाठा असला तरी महापालिकेच्या नियोजनशून्य वितरण व्यवस्थेमुळे शहराला चार ते पाच दिवसांआड पाणी मिळते. जिल्ह्यातील पैठण, वैजापूर, खुलताबाद व सिल्लोड शहरात तीन ते पाच दिवसानंतर पाणी मिळत आहे. सर्वाधिक पाणीटंचाई असलेल्या लातूर शहरात महापालिकेकडून सध्या आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत असून, जिल्ह्यातील औसा शहराला आठ ते दहा दिवसानंतर, निलंगा शहराला चार दिवसानंतर तर अहमदपूर शहराला नगर पालिकेकडून महिन्यातून केवळ दोन वेळेस पाणीपुरवठा करण्यात येत आहे. देवणी, शिरुर अनंतपाळ, जळकोट शहराला पाच तर रेणापूरला आठ दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या शहरांवर तीव्र पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी, शिरुर व वडवणी शहरांना आठ ते बारा दिवसानंतर पाणी मिळत आहे. या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा जूनपर्यंतचे वापरण्याचे नियोजन करण्यात येत असल्यामुळे या शहरांना आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
\Bजायकवाडीतून पाण्याचे प्रस्ताव
\Bबहुतांश नगरपालिकांनी टंचाईच्या कालावधीमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, विंधन विहीर घेणे, विहीर अधिग्रहण करणे आवश्यक असल्याचे प्रस्ताव दिले आहेत. यातील बहुतांश नगर पालिकांना; तसेच नगर पंचायतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेवराईसारख्या नगरपालिकेने पाणीपुवठा बंद झाल्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
सध्याची टँकर स्थिती
जिल्हा........ टँकर........... विहीर अधिग्रहण
औरंगाबाद...... ४६३..........२५६
जालना............९५...........९८
नांदेड...............०२...........०२
बीड ...............१३९............१४४
उस्मानाबाद.......०६..............९८
-------------------------------
एकूण..............७०५.............५९८