म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद 'चलो पंचायत अभियान' प्रत्येक गावात जाऊन यशस्वी करण्याची जबाबदारी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. तुम्ही करत असलेल्या कामाच्या प्रमाणपत्राची तुम्हाला गरज नाही. गावातील एका व्यक्तीने जरी सांगितले की, हा आमच्यासाठी धावून येतो तीच तुमच्या कामाची पावती असेल. राहुल गांधी यांचे हात अधिक मजबूत करायचे असतील, तर पुढील ७५ दिवस आपल्याला जोमाने काम करावे लागेल. त्यासाठी मराठवाडा पिंजून काढा' असे आवाहन युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या मराठवाडा विभागाची बैठक बुधवारी (२६ डिसेंबर) मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे घेण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रभारी प्रतिभा रघुवंशी, सहप्रभारी मनीष चौधरी यांसह प्रदेश पदाधिकारी, मराठवाड्यातील जिल्हाध्यक्ष, जिल्हापदाधिकारी व विधानसभा विभाग अध्यक्षांची उपस्थिती होती. युवक काँग्रेसतर्फे आयोजित 'चलो पंचायत अभियान' व राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या युवा क्रांती यात्रेच्या पूर्वतयारीसाठी तांबे यांनी ही बैठक आयोजित केली होती. 'मराठवाडा दुष्काळाने होरपळत असून शासनाने फक्त घोषणांचा पाऊस पाडलेला आहे. यावेळी युवक कॉंग्रेसने तालुकास्तरावर आंदोलने करण्याची गरज आहे,' असे मत जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले. युवकांना रोजगाराची गरज असतांना 'सीएम चषक' ऐवजी 'रोजगार चषक' आयोजित केला असता, तर युवकांना फायदा झाला असता, अशी टीका त्यांनी केली. या वेळी मंचावर औरंगाबाद जिल्हा प्रभारी मुक्तदीर देशमुख, आमेर अब्दुल सलीम, ब्रिज दत्त, करण ससाणे, आनंद दुबे, आदित्य पाटील, अकील पटेल, रुपेश जैस्वाल, प्रभाकर मुट्ठे, मोईन इनामदार, अथर शेख, मुजाहेद पटेल, धैर्यशील तायडे, मोसीन खान, विठ्ठल कोरडे, शेख नईम, सत्यजीत सोमवंशी, इद्रीस नवाब खान, गौरव जैस्वाल, अझहर शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेश उपाध्यक्ष नागसेन बेरजे यांनी केले, तर शहराध्यक्ष मुजफ्फर खान यांनी आभार मानले. \Bपाच कोटी लोकांपर्यंत पोचण्याचा संकल्प \B 'चलो पंचायत अभियान' हे जनसंपर्क एक जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाद्वारे २५ हजार गावे, ५०० लहान व २० मोठ्या शहरांमधील पाच कोटी जनतेपर्यंत पोहचण्याचा संकल्प करण्यात आला आहे. बेरोजगार युवक आणि शेतकरी हा मुख्य मुद्दा असून त्यांच्याकडे जाऊन त्यांचे कार्ड तयार करून घेणे, त्यांना काँग्रेस सरकार आल्यानंतर पुढे कशी मदत करता येईल, या दृष्टीने माहिती जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, असे सत्यजित तांबे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट