म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कामगारांविरोधी धोरण राबविणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध देशभरातील कामगारांनी संपाची ातील हाक दिली आहे. हा संप येत्या आठ व नऊ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. कामगारविरोधी केंद्र सरकारला सत्तेतून खाली खेचणे, कंत्राटी कामगार भरती बंद करणे व खासगीकरणाला विरोध हा या संपामागील मुख्य उद्देश आहे.
देशातील सर्व केंद्रीय श्रमिक संघटनांनी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, असे राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)च्यावतिने कळविण्यात आले आहे. केंद्र सरकार सार्वजनिक बँका, रेल्वे, विमा, पोस्ट, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक, सार्वजनिक आस्थापना, केंद्र व राज्य सरकारच्या आस्थापना, सरकारी व निम सरकारी महामंडळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांसह संरक्षण क्षेत्रात देखील खासगीकरण व कंत्राटीकरण करीत आहे. हे खासगीकरण जनतेविरोध व सामाजिक सुरक्षा धोक्यात आणणारे आहे. देशभरातील कोट्यवधी कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक, सामाजिक शोषण सरकार व भांडवलदार करत आहेत. अनेक राज्यात किमान वेतनामध्ये दहा ते पंधरा वर्षे वाढ केली जात नाही. राज्य सरकारची अनेक महामंडळे किमान वेतन कायद्याची पायमल्ली करताना दिसतात. मोदी सरकारने कामगार क्षेत्रामध्ये 'नीम' ही नवीन वर्गवारी तयार केली आहे. कंत्राटी पद्धतीने भरती केलेले 'शिकाऊ कामगार' वर्षांनुवर्षे 'शिकाऊ कामगारच' राहणार आहेत. त्यामुळे भांडवलदारांना कमी वेतनात कुशल मनुष्यबळ मिळते. परंतु कामगारांना मात्र कोणतीही सेवा, सुविधा, हक्क, सुरक्षा नियमानुसार मिळत नाही. शेतकरी व कामगारांच्या श्रमावर देशाचा विकास होत असताना त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठीच हा देशव्यापी संप पुकरण्यात आला आहे, असे इंटककडून कळवण्यात आले आहे.
राज्यातील सर्व कामगारांनी सामील होऊन संप यशस्वी करावा, असे आवाहन इंटकचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड, सरचिटणीस के. के. नायर, एस. क्यू. झामा, महेंद्र घरत, जे. जी. माहूरकर, आर. पी. भटनागर, गोविंद मोहिते, अनिल गणाचार्य, नंदाताई भोसले, अॅड. मनोहर अक्कोलकर, मुकेश तिगोटे, नंदू खानविलकर, देवराज सिंग, कैलास कदम, विठ्ठल कदम, हिंदुराव पाटील, श्यामराव कुलकर्णी यांनी केले आहे.
\Bसामील संघटना \B
या संपात इंटक, आयटक, सीटू, हिंद मजदूर सभा, टीयुसीसी, एआययुटीयूसी, एआयसीसीटीयू, सेवा, युटीयूसी, एलपीएफ, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ, बँक, विमा, संरक्षण, पोस्ट, बीएसएनएल, केंद्र सरकारी कर्मचारी, वीज मंडळ, राज्य सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी (नर्स व इतर), अंगणवाडी, आशा, अंगमेहनती कष्टकरी, हमाल, बाजार समिती, वाहतूक, परिवहन, रिक्षा, पारी, फेरीवाले, बांधकाम, घर कामगार क्षेत्रातील संघटित, असंघटित सर्व कर्मचारी संघटना संपात सहभागी होणार आहेत.