म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील सर्वांत मोठे रुग्णालय असलेल्या आणि वैद्यकीय क्षेत्रातील 'मदर इन्स्टिट्यूट' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) तब्बल ७६४ पदे चक्क वर्षानुवर्षे रिक्त आहेत, तर दुसरीकडे 'सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल' व 'राज्य कर्करोग संस्थे'ची तब्बल १,५१० पदांची निर्मिती अनेक महिन्यांपासून खोळंबली आहे. हे कमी म्हणून की काय, २८ कोटींच्या निधीचीही प्रतीक्षा आहे. त्याचवेळी गेल्या दोन वर्षांपासून औषध टंचाईचा तीव्र सामना करणाऱ्या घाटीची औषध टंचाईपासून अद्यापही मुक्तता झालेली नाही. परिणामी, गोरगरीब रुग्णांचा आरोग्याचा मूलभूत हक्कदेखील हिरावून घेतला जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
गोरगरीब व फाटक्या रुग्णांना सेवा देणाऱ्यांचे हात छाटण्याचा प्रकार घाटीमध्ये किमान दशकापासून अखंडपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याशिवाय राहात नाही. सद्यस्थितीत वर्ग एक ते चारपर्यंतची तब्बल ७६४ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही रुग्णालयाचा कणा मानण्यात येणाऱ्या परिचारिकांची ३८९, तर ज्यांच्याशिवाय रुग्णालय चालूच शकत अशा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची २४६ पदेही रिक्त आहेत आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती तर दशकापासून बंद केल्यामुळे रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून ६६ कंत्राटी कर्मचारी घेतले गेले असले तरी प्रत्यक्षात २४६ कर्मचाऱ्यांची तुलना ६६ कर्मचाऱ्यांशी होऊ शकत नाही, हेही स्पष्टच आहे. अशी स्थिती एकीकडे असताना, 'पीएमएसएसवाय'अंतर्गत घाटी परिसरात उभे राहात असलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी १,१४८ पदांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे अनेक महिन्यांपासून पडून आहे. पहिल्या टप्प्यात ४६५ पदे मंजूर होणार असल्याचे सांगण्यात आले खरे; परंतु तेवढ्या पदांनाही अद्याप मंजुरी मिळालेली नाही. एवढेच काय तर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या ११ केव्ही सबस्टेशनसाठी ३ कोटी ४० लाखांचा निधीदेखील प्राप्त झालेला नाही. तसेच राज्यातील एकमेव 'राज्य कर्करोग संस्थे'च्या म्हणजेच शासकीय विभागीय कर्करुग्णालयाच्या विस्तारीकरणातील ३६२ पदांचा प्रस्तावही अनेक महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.
\Bआहारासाठीही निधी नसल्याची स्थिती
\Bघाटीतील औषधे, वैद्यकीय साहित्य, नवीन उपकरणे व त्याचबरोबर उपकरणांच्या देखभालीसाठी मागच्या काही वर्षांत मागितलेला निधी त्या त्या वेळी कधीच पूर्णांशाने मिळाला नाही, हेही घाटीचे आणखी एक दुर्दैव. मागितल्याच्या निम्मा तर कधी त्याहीपेक्षा कमीच निधी मिळाल्यामुळे थकीत बिले साचून राहिली आहेत आणि त्यामुळेच घाटी प्रशासनाकडून २८ कोटींची पुरवणी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. मात्र अजूनही निधीचा पत्ता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून अनेक जीवनदायी उपकरणांची दुरुस्ती रखडल्याचे दिसून येत आहे. आजघडीला रुग्णालयातील आहारासाठीदेखील निधी नसल्याचे दिसून येत आहे. याच आहारासाठी १ कोटी ३६ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, तर त्यातील ९९ लाख रुपये उपलब्ध झाले व अजूनही ४० लाखांचा निधी बाकी असल्यामुळे बिले थकल्याचे समजते. परिणामी, निधी नसल्याचा फटका आता गोरगरीब रुग्णांच्या आहारावर होणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
\Bमागितलेली निम्मीच औषधी प्राप्त
\Bगेल्या अनेक महिन्यांपूर्वी १५६ प्रकारच्या औषधांची मागणी करण्यात आली होती; परंतु आजतागायत केवळ ७४ प्रकारची औषधे घाटी रुग्णालयाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे औषध टंचाई, वैद्यकीय साहित्याच्या टंचाईचा सामना आजही काही प्रमाणात करावा लागत आहे. श्वानदंश, सर्पदंशावरील इंजेक्शनचाही कायम तुटवडा आहे. एकीकडे अशी स्थिती असताना, दुसरीकडे 'डीपीसी'तून नवीन १२८ स्लाईस सिटी स्कॅनसाठी ७ कोटींचा निधी मिळाल्यानंतर व हा निधी ९ महिन्यांपूर्वीच 'हाफकिन'ला वर्ग झाल्यानंतरही हे महत्वाचे उपकरण घाटीला प्राप्त झालेले नाही. तसेच घाटीतील नवीन ३ टेस्ला एमआरआय मशीनसाठी शिर्डी संस्थानकडून तब्बल १५ कोटी रुपये मिळाले व हा निधीदेखील 'हाफकिन'कडे वर्ग करुन अनेक महिले लोटले आहेत. मात्र हे उपकरणही घाटीत उपलब्ध झालेले नाही.
घाटीच्या सर्व प्रकारच्या खर्चासाठी सुमारे २८ कोटींची पुरवणी मागणी यापूर्वीच करण्यात आलेली आहे. या निधीतून मार्चपर्यंतची गरज भागू शकेल. हा निधी लवकरच उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
\Bडॉ. कानन येळीकर\B, अधिष्ठाता, घाटी