म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या महिन्याभरापासून मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता अधिक गडद होत आहे. दुष्काळी मराठवाड्याला आता केवळ टँकर आणि विहीर अधिग्रहणाचा आधार असल्याचे चित्र वाढलेल्या टँकर; तसेच विहीर अधिग्रहणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. विभागात गेल्या दीड महिन्यांपासून टँकरसंख्येत दुपटीने, तर विहिरी अधिग्रहणात तीपटीने वाढ झाली आहे.
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये टँकरने साडेआठशेचा आकडा पार केला आहे. दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या मराठवाड्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत असून, विभागातील ६७९ गावे व ९८ वाड्यांमधील तब्बल १४ लाख २ हजार नागरिकांची तहान ८७६ टँकरद्वारे भागविण्यात येत असल्याचे भीषण वास्तव आहे. विभागात ८७१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, यातील तब्बल ४१७ विहिरी केवळ टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून टँकर, विहीर अधिग्रहण करण्याचा सपाटा सुरू आहे. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी मराठवाड्यात केवळ ३५० टँकर सुरू होते, दोन जानेवारी २०१९पर्यंत पाच जिल्ह्यांत टँकरसंख्येत ४६१ने भर पडून ही संख्या ८७६ झाली. एक नोव्हेंबर रोजी विभागामध्ये प्रशासनाकडून २६१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. आज यामध्ये तब्बल तिप्पट वाढ होऊन संख्या ८७१वर पोचली आहे.
मराठवाड्यात सध्या सुरू असलेल्या ८७६ टँकरपैकी ५१९ टँकर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत, जिल्ह्यातील सात लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातही तीन लाख नागरीकांची तहान २२२ टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. टँकर हा पाणीटंचाईवरील सर्वात शेवटचा उपाय असल्यामुळे हा पर्याय सहजतेने वापरण्यात येत असल्याचे चित्र मराठवाड्यात आहे.
\Bमराठवाड्यातील विहीर अधिग्रहण
\Bजिल्हा........ टँकरसाठी...... टँकर व्यतिरिक्त......एकूण
औरंगाबाद........१०५............६२...................२६७
जालना............१०१............४२....................१४३
परभणी............००............१३......................१३
नांदेड.............०२.............००.....................०२
बीड................१०१...........१५९..................२६०
लातूर.............००..............३५....................३५
उस्मानाबाद.......०८...........१४३...................१५१
एकूण..........४१७.............४५४...................८७१
\Bजिल्हानिहाय टँकर
\Bजिल्हा......... टँकर.................. अवलंबून लोकसंख्या
औरंगाबाद.....५१९...................७ लाख ९३ हजार
जालना..........१२५.....................२ लाख १० हजार
नांदेड............०२....................१२ हजार ६००
बीड..............२२२...................३ लाख ७० हजार
उस्मानाबाद......०८..................१६ हजार १४९
एकूण............८७६............... १४ लाख २ हजार ४१७