म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद यवतमाळ येथील नियोजित ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वाद टोकाला पोहचला असून, संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण ऐनवेळी संयोजकांनी रद्द केल्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या संमेलनात निमंत्रित असलेल्या मराठवाड्यातील साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार घालत झुंडशाहीचा निषेध नोंदवला आहे. यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या संयोजकांनी उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर साहित्यिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा निषेध केला. कविसंमेलन आणि परिसंवादात निमंत्रित असलेल्या साहित्यिकांनी बहिष्कार जाहीर केला. 'प्रसारमाध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य' या विषयावरील परिसंवादात सहभागी असलेले प्रा. जयदेव डोळे यांच्यासह इतर चार वक्त्यांनी बहिष्कार घातल्याने परिसंवाद रद्द झाला आहे. कवयित्री प्रभा गणोरकर यांची मुलाखत घेणाऱ्या साहित्यिकांनीही बहिष्कार जाहीर केला. या संमेलनात कवी केशव देशमुख, रामप्रसाद तौर, बालाजी सुतार, इंद्रजित भालेराव, दासू वैद्य, सुचिता खल्लाळ, श्रीकांत देशमुख, डॉ. गणेश मोहिते, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. जयदेव डोळे हे मराठवाड्यातील साहित्यिक निमंत्रित होते. या साहित्यिकांनी जाहीर निषेध नोंदवत संमेलनात सहभागी होणार नाही असे सांगितले. नयनतारा सहगल यांना अखिल भारतीय साहित्य महामंडळाने निमंत्रण दिले होते. मात्र, संयोजक सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्यामुळे दबाव सुरू झाला. या दबावातूनच निमंत्रण रद्द झाल्याची साहित्य वर्तुळात चर्चा आहे. स्मरणिकेत छापण्यासाठी सहगल यांचे भाषण उपलब्ध झाले होते. भाषण वाचल्यानंतर संभाव्य गैरसोय ओळखून निमंत्रण रद्द करण्यात आल्याची टीका साहित्यिकांनी केली. \B'मसाप'ने नोंदवला निषेध \Bसाहित्य संमेलनापूर्वी १० जानेवारीला अ. भा. साहित्य महामंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत घटकसंस्था असलेले मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी परखड भूमिका जाहीर करणार आहेत. 'निमंत्रण रद्द करण्यापूर्वी तुम्ही आमच्याशी बोलले असते तर विरोध केला असता. अर्थात, त्याचा काहीही उपयोग झाला नसता हे वेगळे. तुमच्याबरोबर निष्कारण आम्ही झोडपले जात आहोत. घेतलेला निर्णय धिक्कार करावा असाच आहे' असे 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे. झुंडशाहीच्या दबावाखाली केलेली कृती उद्वेगजनक, निषेधार्ह आहे. एका ज्येष्ठ लेखिकेचा उपमर्द होत असताना साहित्य महामंडळाने रोखठोक भूमिका घेऊन संमेलन रद्द करावे. मी संमेलनावर बहिष्कार घालत आहे. - आसाराम लोमटे, साहित्यिक शबरीमला मंदिर प्रवेश ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन अशा प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना रोखले जात आहे. अशा स्त्रीद्वेष्ट्या संमेलनावर बहिष्कार घालत आहे. - प्रा. जयदेव डोळे, साहित्यिक संमेलनातील परिसंवादात मी नियोजित वक्ता आहे. नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द केल्याने धक्का बसला. विचार दडपण्याचा हा प्रयत्न असून संमेलनात सहभागी होणार नाही. - डॉ. रामचंद्र काळुंखे, समीक्षक संयोजकांनी दिलगिरी व्यक्त करून नयनतारा सहगल यांना सन्मानाने निमंत्रित करावे. उद्घाटकीय भाषण ऐकण्याची संधी महाराष्ट्राला द्यावी. तूर्तास, मी 'मराठी समीक्षेची समीक्षा' परिसंवादातील निमंत्रित या नात्याने संमेलनावर बहिष्कार टाकतो. - डॉ. गणेश मोहिते, समीक्षक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट