म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद कोर्टात सुरू असलेल्या विविध प्रकरणातील दाव्यावरून आपसात वाद होऊन हाणामारीच्या चार वेगवेगळ्या घटना घडल्या. छावणी, हर्सूल, बेगमपुरा आणि पुंडलिकनगर भागात हे प्रकार घडले असून संबधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टात सुरू असलेल्या वादातून मारहाणीची पहिली घटना शनिवारी सकाळी नऊ वाजता छावणी परिसरात घडली. येथील एका महिलेने कोर्टामध्ये चार जणाविरुद्ध मारहाणीची केस दाखल केली आहे. सोमवारी सकाळी संशयित आरोपी मुशीर शेख याने 'तू केसमध्ये माझे नाव का टाकले' या कारणावरून महिलेच्या घरात शिरून मारहाण करीत अश्लिल शिवीगाळ केली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी मुशीर शेख विरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीचा दुसरा प्रकार शनिवारी सायंकाळी हर्सूल परिसरात घडला. येथील एका महिलेला संशयित आरोपी दादाराव भीका साबळे (रा. लोनवाडी, ता. सिल्लोड) याने 'तू माझ्याविरुद्ध कोर्टात दावा का दाखल केला' या कारणावरून मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी दादाराव विरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टातील खटल्याच्या वादातून मारहाणीची तिसरी घटना नऊ जानेवारी रोजी दुपारी बेगमपुरा भागात घडली. राजू खान चांदखान (वय २७) याचा काही जणासोबत जुन्या वाड्याच्या इसार पावतीवरून कोर्टात वाद सुरू आहे. या कारणावरून राजू खानच्या घरात शिरून त्याला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संशयित आरोपी उमरखान अकबरखान, वाजेदखान उमरखान आणि माजेदखान उमरखान यांच्या विरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची चौथी घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता गारखेडा भागात घडली. येथील राजपाल रघुनाथ चव्हाण (वय २६) या तरुणाला कोर्टातील भांडणाच्या कारणावरून चौघांनी रस्त्यात अडवून मारहाण केली. याप्रकरणी चव्हाणच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शरद राठोड, विकास उगवले, गोपीनाथ राठोड आणि एका महिला आरोपीवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट