म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शिवाजीनगर परिसरातील जलकुंभाजवळ महापालिकेच्या जागेवर करण्यात येत असलेल्या अतिक्रमणाच्या मुद्यावरून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देता देता अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. माजी महापौर भगवान घडमोडे यांनी त्यांच्या वॉर्डातील अतिक्रमणांचा विषय मांडला. 'रस्त्यांवर हातगाड्यांचे अतिक्रमण आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी आपण अनेकवेळा केली, पण त्याची दखल अतिक्रमण हटाव विभागाने घेतली नाही. हा विभाग अस्तित्वात आहे की नाही,' असा सवाल त्यांनी केला. यावर अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख ए. बी. देशमुख यांनी 'आपण उद्या स्वत: स्थळ पाहणी करून कारवाई करू,' असे आश्वासन दिले. त्यानंतर घडमोडे यांनी शिवाजीनगर परिसरातील जलकुंभाजवळ पालिकेच्या जागेवर करण्यात येत असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा मांडला. 'या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमित बांधकाम केले जात आहे. त्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. पालिकेच्या जागेवर होत असलेल्या अतिक्रमणावर कारवाई का केली जात नाही,' असा सवाल त्यांनी केला. या सवालाला उत्तर देता देता ए. बी. देशमुख आणि पाठक यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली. पाठक म्हणाले, 'ज्या व्यक्तीने बांधकाम केले आहे त्याने पालिकेच्या कारवाईला कोर्टातून स्टे मिळवला आहे.' यावर 'स्टेचे स्वरुप काय आहे,' असा प्रश्न राजू शिंदे यांनी विचारला तेव्हा 'थर्ड पार्टी स्टे आहे,' असे विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी सांगितले. यावर नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत म्हणाल्या, 'थर्डपार्टी स्टे येईपर्यंत आपण थांबलो कसे काय. महापालिकेचा वकील हजर न झाल्यामुळे थर्डपार्टी स्टे मिळाला,' ही बाब त्यांनी लक्षात आणून दिली. या मुळे अधिकारी पुढे काहीच बोलू शकले नाहीत. महापौरांनी त्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट