दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना चिंता व्यक्त होत आहे. दुष्काळाला तोंड देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. पण, आता नागरिकही सरसावले आहेत. सिल्लोड तालुक्यात एक लग्न अत्यंत साधेपणाने करून सर्व रक्कम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुष्काळ निवारण समितीला देणगीदाखल देण्यात आली.
यावर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असली तरी अनेक विवाह सोहळे मोठ्या थाटामाटात सुरू आहेत. त्यावर अकारण खर्च केला जात आहे. पण, सारोळा येथे झालेला एक विवाह याला छेद देणारा ठरला.
माजी आमदार सांडु पाटील लोखंडे याचे पुतणे व रमेश आनंदा लोखंडे यांचा मुलगा सतीश व सारोळा येथील सुधाकर नारायण वराडे यांची मुलगी अश्विनी या दोन्ही परिवारांनी साखरपुड्याचा कार्यक्रमासाठी पाहुण्यांना निमंत्रने दिली होती. पण, पाहुण्यांनी दुष्काळी परिस्थिती पाहता दोन्ही परिवारांकडे साधेपणाने लग्न करावे, अशी विनंती केली. त्यानंतर माजी आमदार लोखंडे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांनी अर्ध्या तासात हा विवाह सोहळा घडवून आणला. कोणताही गाजावाजा न करता सनई चौघड्याच्या सुरात व वायफळ खर्च टाळत लग्न लाऊन आदर्श उभा केला. पालोदकर यांनी दोन्ही परिवारांना व वधु-वरांना शुभेच्छा देऊन या पद्धतीने विवाह करण्यास तयार केले. लग्न सोहळ्यासाठी येणारा खर्च राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुष्काळ निवारण निधीला प्रदान करण्यात आला. दुष्काळ निवारण समितीचे देवगिरी प्रांत प्रमुख शंकर डापके यांनी ही रक्कम स्वीकारली.
यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. मछिद्र पाखरे, सुरेश बनकर, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे, गजानन राऊत, दिलीप दाणेकर, पुंडलिक लोखंडे, प्रकाश वराडे, प्रा. शिवराम साखळे, रामदास हिवाळे, संजय डमाळे, संजय कळात्रे, शंकर डापके यांच्यासह नातेवाईक व गावकरी उपस्थित होते.
चार वर्षांपासून तालुक्यातील दुष्काळ व नापिकी यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे सर्वांनी लग्न सोहळे साध्या पद्धतीने पार पाडावेत. यामुळे दोन्ही परिवाराला लागणाऱ्या खर्चाला आळा बसेल
- सांडू पाटील लोखंडे, माजी आमदार
लग्न सोहळ्यानिमित्त तालुक्यात फिरत असताना भरमसाठ खर्च, डीजे, बँड-बाजा असा थाटमाट दिसतो. मात्र, हे लग्न हा बडेजाव टाळून अर्धा तासात पार पडला. तालुक्याने वराडे व लोखंडे परिवारांचा आदर्श घ्यावा.
-प्रभाकर पालोदकर, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट