म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बहुतेक देशांना शेतीसाठी पाणी टंचाईचा मुद्दा भेडसावत असल्यामुळे सूक्ष्म सिंचनाच्या पद्धतीत नवनवीन संशोधन सुरू आहे. महागडे ठिबक सिंचन तंत्रज्ञान आणि वारंवार दुरुस्तीचा खर्च या प्रमुख समस्या आहेत. जगभरातील तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ उपाय शोधण्यासाठी कार्यरत आहेत. जगभरात सूक्ष्म सिंचनाच्या समस्या सारख्याच असल्याचे मत विविध देशाच्या अभ्यासकांनी मांडले.
नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेत शेवटच्या दिवशी सिंचनातील तांत्रिक मुद्द्यांवर विविध सत्रात चर्चा झाली. हॉटेल अजंठा अॅम्बेसेडर येथे शुक्रवारी परिषद पार पडली. 'न्यू इनोव्हेशन्स अँड प्रॉडक्ट' विषयावर परिसंवाद झाला. 'आयसीआयडी'चे अध्यक्ष डॉ. ए. के. रणदेव, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचे सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी, इटलीचे डॉ. मार्को आर्शिरी, प्रोफेसर वाय. इ. यिल्दिरीम, इस्माइल तास, प्रमोदकुमार सिंग, 'सीडब्ल्यूसी'चे संचालक पी. डी. राव आणि राजीव कुमार यांनी परिसंवादात सहभाग घेतला. इटलीतील सूक्ष्म सिंचन पद्धतीवर मार्को यांनी माहिती दिली. 'जर्मनीत १८६० मध्ये ठिबक सिंचनचा वापर सुरू झाला. मातीच्या पाइपद्वारे पारंपरिक पद्धतीने ठिबक करण्यात आले होते. सिमचा ब्लास यांनी जॉर्डन खोऱ्यात नव्याने ठिबकचा वापर केला. १९६० मध्ये त्यांनी प्लास्टिक पाइपद्वारे ठिबक सिंचन करण्यात यश मिळवले. इटलीचे शेतकरी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करीत आहेत. कमी किमतीच्या ठिबक साहित्य निर्मितीचे काम सुरू आहे. खत आणि पाणी बचत हे प्रमुख फायदे दृष्टिपथात आहेत. पण, सतत नळ्यांचे कोंडणे आणि क्षारयुक्त पाण्याचा अडथळा दुरुस्तीला कारणीभूत ठरत आहे. जगभरात ही समस्या दिसत आहे. त्यामुळे महागडे तंत्रज्ञान आणि दुरुस्तीवर संशोधन अपेक्षित आहे,' असे डॉ. मार्को म्हणाले.
तुर्कस्तानमधील सूक्ष्म सिंचन पद्धतीवर प्रोफेसर यिल्दिरीम यांनी भाष्य केले. 'तुर्कस्तानमध्ये पाणीपुरवठा वाढविणे मोठे आव्हान आहे. अन्न व पाणी सुरक्षेसाठी पाण्याचा जपून वापर करण्याचे धोरण अवलंबिणे गरजेचे आहे. कमी पाण्यात जास्त उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष दिले आहे. सर्व क्षेत्रांपैकी फक्त कृषी क्षेत्राला ७४ टक्के पाणी पुरविले जाते. त्यामुळे पीक उत्पादकता, पाण्याचा सुयोग्य वापर आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. पाणी बचतीसाठी ठिबक आणि तुषार सिंचनात आधुनिक प्रयोग केले आहेत' असे यिल्दिमिर यांनी सांगितले. इतर तज्ज्ञांनीही ठिबक सिंचनाच्या पारंपरिक वापराला पर्याय शोधण्याची गरज व्यक्त केली. तंत्रज्ञान तुलनेने स्वस्त आणि सुलभ झाल्यास वापर वाढेल असा मुद्दा तज्ज्ञांनी चर्चेत अधोरेखित केला.
\Bनवीन ठिबक प्रणाली वापरा\B
पारंपरिक ठिबक सिंचन पद्धतीत पाण्याचा अपव्यय जास्त आहे. 'अल्ट्रा लो ड्रिप इरिगेशन' पद्धत वापरल्यास पाणी बचत होते. या पद्धतीत पिकांना अडथळा ठरणारे गवत येत नाही. शिवाय पाणी थेट मुळापर्यंत जात असल्यामुळे या पद्धतीचा फायदा जास्त असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. ठिबकच्या नळ्या उंदीर कुरतडत असल्याने नुकसान होते, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. इस्रायलमध्ये शेतात घुबडांसाठी झाडावर घरटी केली आहेत. एक घुबड महिनाभरात एक हजार उंदीर खात असल्यामुळे उंदरांचा बिमोड करणे सोपे झाले. अशा पद्धती वापरून ठिबक सिंचनचा प्रभावी वापर करा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
\Bसौर पंप ठरतील वरदान
\B
'सोलार पॉवर इंटिग्रेशन' विषयावरील परिसंवादात सौर पंपाचे फायदे तज्ज्ञांनी नमूद केले. या परिसंवादात ए. एन. एन. प्रसाद, 'डब्ल्यूटीसी'च्या शास्त्रज्ञ नीलम पटेल, पद्माकर वामन, पुनीत केळकर, नीरज शर्मा, वाराप्रसाद राव, चंद्रमोहनसिंग अधिकारी, अमित शर्मा सहभागी झाले. पिकांना पाणी देण्यासाठी भारतातील ५५ टक्के शेतकरी विद्युत मोटार वापरतात. सौर पंप वापरल्यास वीज बिल वाचणार असून खर्चात बचत होईल. याबाबत केंद्र सरकारने योजना जाहीर केल्या आहेत. सौर पंप खरेदी केल्यानंतर किमान तीन वर्षे दुरुस्ती आणि तांत्रिक मदत करणे संबंधित कंपनीला बंधनकारक आहे, असे नीलम पटेल यांनी सांगितले.