म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना देण्यात आलेले परीक्षा शुल्क हडप करणाऱ्या कॉलेजांवर फौजदारी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली. संघटनेने या मागणीसाठी उच्चशिक्षण सहसंचालकांना 'घेराओ' घातला.
मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर २०१४-१५, २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले. त्याचा निधी सहसंचालक, विद्यापीठामार्फत कॉलेजांना वितरितही करण्यात आला. कॉलेजांना मिळालेले हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना मिळालेच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत आवाज उठविला आहे. त्यात मंगळवारी 'मनविसे'च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांची भेट घेत शुल्क परत न करणाऱ्या कॉलेजांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. दुष्काळात विद्यार्थ्यांनी शुल्क भरले ते परत मिळाल्यानंतर कॉलेजांनी परत करणे अपेक्षित असतानाही त्यांनी ते केले नाही. अशा कॉलेजांना पाठिशी घालू नये. अशा शुल्क वाटपात निष्काळजीपणा करणाऱ्या महाविद्यालयांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर, उपाध्यक्ष प्रतिक गायकवाड, कार्तिक फरकडे, संदीप राजपूत, रितेश देवरे, उमेश काळे, किरण पाटील, शुभम घोरपडे, सचिन कुंटे, गजानन गोमटे, विशाल गोंधळे, किरण म्हस्के, रविराज कांबळे आदींची उपस्थिती होती.
\Bयंदाचे शुल्क तात्काळ परत द्या\B
यंदाही राज्यसरकारने परीक्षा शुल्कमाफीची घोषणा केली आहे. त्यासंदर्बातील अध्यादेश नोव्हेंबरमध्ये काढण्यात आला. त्यापूर्वी बीएड, विधी अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे परीक्षा शुल्क भरलेले होते. त्यामुळे यंदा शुल्कमाफीचा थेट लाभ विद्यार्थ्यांना मिळाला नाही. मागील अनुभव लक्षात घेत यंदाच्या शुल्कमाफीची रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
शासनाने शुल्कमाफीचा निधी दिला, मात्र कॉलेजांनी तो परत केलाच नाही. अशा कॉलेजांवर गुन्हे दाखल करावेत, अशी आमची मागणी आहे. परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळाले की, नाही हे पाहण्याची जबाबदारी विद्यापीठ, उच्च शिक्षण विभागाची. त्यांनी दुर्लक्ष केल्याने विद्यार्थी त्यापासून वंचित राहिले.
- राजीव जावळीकर, जिल्हाध्यक्ष, मनविसे.