म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ऐतिहासिक, सामाजिक नाट्य सादरीकरणातून नेमका संदेश देत बालकलाकारांनी बालनाट्य स्पर्धा गाजवली. स्पर्धेत आठ नाटकांचे सादरीकरण झाले. औरंगाबाद केंद्रावर कमी प्रवेशिका आल्यामुळे एकाच दिवसात स्पर्धा संपली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या १६ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. या स्पर्धेचे गोविंदभाई श्रॉफ नाट्यगृहात मंगळवारी सकाळी उदघाटन करण्यात आले. यावेळी रंगकर्मी प्रा. किशोर शिरसाठ, रमाकांत मुळे आणि नंदू भुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. औरंगाबाद केंद्रावरील प्राथमिक फेरीत आठ नाटकांचे प्रयोग सादर झाले. धनंजय सरदेशपांडे लिखित 'हॅलो रोबो', अभय कुलकर्णी 'संगीत वचनपूर्ती', असिफ अन्सारी लिखित 'कस्तुरी', हरिदास घुगासे लिखित 'नवा सूर्य', अरविंद जगताप लिखित 'कंपनी', किरण लद्दे लिखित 'छोटी छोटीसी बात', नवनाथ पवार लिखित 'नमामी गंगे' आणि गो. या. सावजी लिखित 'टिल्याची करामत' या नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले. मराठवाड्यात चार केंद्रावर ही स्पर्धा पार पडली. बीड केंद्रावर ४८ नाटक, नांदेड आणि लातूर केंद्रावर १६ नाटकांच्या प्रवेशिका आहेत. मात्र, औरंगाबाद केंद्रावर सर्वात कमी प्रवेशिका आल्या. महोत्सवाला विद्यार्थी व नाट्य रसिक उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट