म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आपापल्या मतदारसंघामध्ये पाणी आणि दुष्काळी उपाययोजनांवर मोठमोठी भाषणे ठोकणारे आणि मतदान पदरात पाडून घेऊन आमदार, खासदार झालेले लोकप्रतिनिधीच पाण्यासारख्या महत्वाच्या विषयाच्या बैठकीला अनुपस्थित राहत असल्याचे चित्र एकात्मिक राज्य जल आराखडा व मराठवाड्यातील विविध प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिसले.
गुरुवारी (३१ जानेवारी) मराठावाडा विकास मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीसाठी मराठवाड्यातील सर्व आमदार तसेच खासदारांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या बैठकीसाठी केवळ विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि प्रशांत बंब या दोनच आमदारांशिवाय अन्य कोणतेही लोकप्रतिनिधी आले नाहीत. बैठकीसाठी सर्व महापौर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनाही निमंत्रण पाठविण्यात आले होते. मात्र, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, नांदेडच्या महापौर शीला भवरे, जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर या तीनच लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली.
सातत्याने दुष्काळामुळे होरपळून निघणाऱ्या मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनाच पाणीप्रश्नाबद्दल किती आस्था आहे, हे या बैठकीवरून स्पष्ट झाले. या बैठकीमध्ये एकात्मिक राज्य जल आराखड्यात मराठवाड्यावर कसा अन्याय झालेला आहे, याची सविस्तर माहिती देऊन मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याची मागणी नोंदविण्यासाठी लोकप्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर आणण्याचा मराठवाडा विकास मंडळाचा प्रयत्न होता. मात्र, या प्रयत्नांना मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनीच फाटा दिला. हा आराखडा मंजूर होण्याआधीच त्यात मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याची नोंद न झाल्यास पुढील २० वर्षे झगडावे लागेल, अशा शब्दांत उपस्थितांनी खंत व्यक्त केली.
आमदारांना जलआराखड्याबाबत माहिती व्हावी यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही माहिती समजून घेऊन मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करावा तसेच मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा यासाठी या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. बैठकीला उपस्थित असलेली मंडळीच माझ्यासाठी आमदार आहे. हा आराखडा मंजूर झाल्यास त्यात बदल होणार नाही. त्यात मराठवाड्याची मागणी नोंदवली न गेल्यास ही तूट कायमचीच राहील, अशी खंत व्यक्त करत शंकरराव नागरे यांनी जल आराखड्याचे सादरीकरण केले.
बैठकीसाठी मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, सदस्य सचिव डी. एम. मुगळीकर, तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे, डॉ. अशोक बेलखोडे, कृष्णा लव्हेकर, शरद अदवंत, मनोरमा शर्मा, विलासचंद्र काबरा, जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मराठवाड्याचा विकास व्हावा, असमतोल दूर व्हावा ही सर्वांची भावना आहे. मात्र, केवळ भावना असून काही होत नाही. कृतीही करावी लागते. सरकारदरबारी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी दबाव आणणे आवश्यक आहे. मात्र, यामुळे प्रादेशिक मनभिन्नता होईल असे घडू नये. विकास मंडळाच्या निधीचा वापर योग्य पद्धतीने होत नव्हता. म्हणून २००९ पासून निधी मिळणे बंद केला असल्याचेही बागडे यांनी यावेळी सांगितले.
हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. यापुढे अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये बैठक घेऊन हा विषय उचलून धरू. औरंगाबादमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीसंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींसोबत संपर्क करण्यात आला होता. पत्रव्यवहारही करण्यात आला होता. बैठकीच्या नियोजनासाठी पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येईल.
- डॉ. भागवत कराड, अध्यक्ष, मराठवाडा विकास मंडळ
मराठवाड्यासंदर्भात दर तीन महिन्याला मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात यावी. आपल्या नकळत इतर भागातील आमदारांचा दबाव नेतेमंडळी व अधिकाऱ्यांवर आहे. आज शेकडो आत्महत्या होत आहेत. या बैठकीशिवाय आमदारांना काय मोठे असू शकते? आपल्या मागण्यांसंदर्भात लोकांचाही रेटा लोकप्रतिनिधींकडे हवा. २० फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यातील सर्व आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊ.
प्रशांत बंब, आमदार