म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद स्तन कर्करोगाच्या जनजागृतीचा अतिरेक होत असून, ब्रेस्ट कॅन्सरचा बागलबुवा उभा राहात आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठी भीती असून, भीतीपोटी आणखी वेगळे त्रास होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. खरे म्हणजे स्तनाच्या ७० टक्के गाठी या कर्करोगाच्या नसतातच, हे आधी महिलांनी लक्षात घेतले पाहिजे, असे मत 'असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया'चे भावी नियोजित अध्यक्ष डॉ. पी. रघुराम यांनी मॅसिकॉन परिषदेत व्यक्त केले आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या अतिरेकी जनजागृतीकडेही लक्ष वेधले. 'मॅसिकॉन परिषद २०१९'मधील निरंतर वैद्यकीय शिक्षण (सीएमई) सत्राचे उद्घाटन गुरुवारी (३१ जानेवारी) एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात झाले. या वेळी एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, 'सर्जन्स ऑफ इंडिया'चे राज्य शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रताप वरुटे व डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. सतीश धारप, महाराष्ट्र शाखेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. उमेश भालेराव, उपाध्यक्ष डॉ. रॉय पाटणकर, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मिलींद देशपांडे, सचिव डॉ. राजेंद्र शिंदे, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख, मानद सचिव डॉ. निखील चौहान यांची उपस्थिती होती. परिषदेच्या पहिल्या दिवशी व्याख्याने, चर्चासत्रे व परिसंवाद झाले. 'डायबेटिक फुट'वरील परिसंवादासाठी डॉ. मिलिंद रुके हे निमंत्रक होते, तर डॉ. सिद्धार्थ दुभाषी, डॉ. सुनील करी व डॉ. तुषार रेगे यांनी परिसंवादात सहभाग नोंदवला. 'ट्रॉमा केस कॅप्सुल'वरील चर्चासत्रात निमंत्रक डॉ. सतीश धारप यांनी, आपत्कालिन परिस्थितीत रुग्ण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचला पाहिजे आणि सक्षम डॉक्टरांकडून असा रुग्ण हाताळला गेला पाहिजे तेव्हाच रुग्ण वाचण्याची व बरा होण्याची शक्यता अधिकाधिक वाढेल, असे मत नोंदविले. डॉ. विजय शिवपुजे, डॉ. गिरीश बक्षी आणि डॉ. ए. एम. कुरेशी यांचा चर्चासत्रात सहभाग होता. या व्यतिरिक्त सौम्य स्तनविकारावरील चर्चासत्रात डॉ. अनघा अवरुडकर, डॉ. मीनाक्षी येवला, डॉ. अंजली डावले, डॉ. वर्षा रोटे-कागीनाळकर व डॉ. अरुणा कराड यांचा सहभाग होता, तर डॉ. रघुराम निमंत्रक होते. परिषदेसाठी डॉ. शिंदे, डॉ. सूर्यवंशी, डॉ. देशपांडे, संयोजन प्रमुख डॉ. पुरुषोत्तम दरख, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर मुसांडे, वैज्ञानिक समिती अध्यक्ष डॉ. नुसरत फारुकी, डॉ. देशमुख, डॉ. केदार साने, डॉ. चौहान, डॉ. अन्सारी आदींनी पुढाकार घेतला. \Bअर्थपूर्ण संशोधनासाठी एकत्र यावे \Bदैनंदिन जीवनात उपयोग होईल अशा अर्थपूर्ण संशोधनासाठी डॉक्टर, इंजिनिअर व बायोटेक्नॉलॉजिस्ट यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे मत एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम यांनी परिषदेच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले. या प्रसंगी डॉ. रघुराम यांनी परिषदेला शुभेच्छा देताना 'सर्जन्स ऑफ इंडिया'च्या २०१९ ते २०२१ या कालावधीच्या दृष्टीकोन विधानाबद्दल उपस्थितांना अंतर्मुख केले. \Bआज 'मीट द एक्स्पर्ट' \Bपरिषदेत शुक्रवारी शस्त्रक्रियांची प्रात्याक्षिके होतील आणि दुपारी तीन ते साडेचार या वेळेत 'मीट दी एक्स्पर्ट' हा कार्यक्रम द्योतन हॉलमध्ये होणार असून, कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टर आम्लपित्त व बद्धकोष्ठता या विषयावर जनसामान्यांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट