म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अनेक वर्षांपासून कचरा टाकण्यात येत असल्याने नारेगाव येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. तिच परिस्थिती आता हर्सूलमध्ये निर्माण झाली आहे. सावंगी तलावाच्या संरक्षक भिंतीलगत कचरा डेपो उभारण्यात आला आहे. येथे पूर्ण क्षमतेने कचरा प्रक्रिया होत नसल्याने अजूनही सुमारे दीडशे टनापेक्षा जास्त कचरा पडून आहे. यामुळे सुटणारी दुर्गंधी, मोकाट कुत्रे यांचा त्रास वाढला आहे. हर्सूलची परिस्थिती नारेगाव सारखी होत आहे.
वर्षभरापूर्वी शहराची कचराकोंडी झाली तेव्हा त्याचा तेवढा फटका महापालिकेच्या झोन क्रमांक ४ च्या नागरिकांना बसला नाही. कारण, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेले परिश्रम. झोन क्रमांक ४ मध्ये हर्सूल, भगतसिंगनगर, म्हसोबानगर, एकतानगर, चेतनानगर, वानखेडेनगर-होनाजीनगर, यादवनगर, सिडको एन- ११, मयूरपार्क, मयूरनगर, सुदर्शननगर, रोजाबाग, भारतमातानगर, विश्वासनगर, हर्षनगर, स्वामी विवेकानंदनगर, श्रीकृष्णनगर, पवननगर या भागांचा समावेश होतो. या सर्व भागात घंटागाडीतून कचरा नियमितपणे उचलला जात होता. या भागातील कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्या व संकलित कचरा थेट नारेगावला पाठवला जात होता. यामुळे नागरिकांना कचराकोंडीचा त्रास जाणवला नाही. अंतर्गत रस्ते आणि मुख्य रस्त्यावरील दुभाजक स्वच्छ ठेवण्याची मोहीम पालिका कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने राबवली.
शहराची कचराकोंडी झाल्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार पालिकेला कचरा टाकण्यासाठी जागा शोधावी लागली होती. तेव्हा सावंगी तलावा शेजारी कचरा टाकण्यासाठी आलेल्या पालिका प्रशासनाला स्थानिक नगरसेवकासह नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. तेव्हा कचऱ्यावर प्रक्रिया करून समस्या सोडविण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. या आश्वासनानंतर हर्सूलकरांनी विरोध मागे घेतला. मात्र त्यानंतर अजूनही कचरा प्रक्रिया पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. नागपूरच्या एका कंपनीने दररोज १६ टन कचऱ्यावर प्रक्रियेस एक महिन्यापूर्वी सुरुवात केली. काही दिवसात दुसरे प्रक्रिया यंत्र सुरू होणार आहे. वर्गीकरण न करताच येथे कचरा टाकला जातो. यामुळे सावंगी तलावाशेजारील डेपोतील कचरा वाढत आहे. परिणामी, या कचऱ्याचे मोठे संकट हर्सूलकरांसमोर उभे आहे.
\Bऐतिहासिक नहर धोक्यात \B
सावंगी तलावातून ऐतिहासिक नहर सुरू होते. याशिवाय तलावातील विहिरीतून हर्सूल गावाला पाणीपुरवठा केला जातो. कचऱ्यामुळे दूषित पाणी झिरपून तलावाशेजारील विहिरीचे पाणी दूषित पाणी झाले आहे. भूजल दूषित होण्याचा धोका असल्याने ऐतिहासिक नहरीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एकतानगरमधून दररोज कचरा संकलन केले जाते. पण, हर्सूल जेलपुढील मैदानात अजूनही कचरा पडून आहे. येथे पूर्वी कचराकुंडी होती, आता कचऱ्याचे अवशेष मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. वॉर्डात प्रवेश करतानाच हे दृश्य नजरेस पडत आहे. हा परिसर स्वच्छ करण्याची मागणी आहे.
…
\Bनव्या वसाहतींत कचरा संकलन अनियमित \B
एकतानगर, चेतनानगर आणि हर्सूलच्या पश्चिमेला नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. हर्सूलच्या पश्चिमेकडील फातेमानगर, फिजापार्क, करीमनगर, उमर कॉलनी, हुजैफा पार्क, कैसर पार्क, एकबालनगर आदी वसाहती दहा वर्षांपूर्वी स्थापन झाल्या. या भागातून नियमित कचरा संकलन होत नाही. हरसिद्धी माता मंदिरापासून जांभूळ वनापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा साचला आहे. धनगर समाज स्मशानभूमिशेजारी छोटाशा कचरा डेपो तयार करण्यात आला आहे.
\B
पवननगर वॉर्डातील काम अद्वितीय\B
…
पवननगर वॉर्ड क्रमांक ३० मध्ये कचरा संकलनाचे काम नियमित केले जाते. नगरसेवक नितीन चित्ते यांच्या पुढाकाराने येथे कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. वॉर्डातील कचरा वॉर्डातच रिचवला जात आहे.
\Bस्वामी विवेकानंदनगरमध्ये हवेत पालिकेचे कर्मचारी \B
स्वामी विवेकानंदनगरमध्ये नागरिकांना स्वच्छतेची जाणीव झाली आहे. या वॉर्डातून पालिका कर्मचारी दररोज कचरा संकलन करतात. आता पालिकेऐवजी खासगी कर्मचारी पाठवण्यात येत आहेत. या भागातून एक दिवसाआड कचरा उचलला जात असून पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कचरा संकलन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
\Bशिळ्या अन्नाची पशुपालकांकडून खरेदी \B
या झोनमधून कचरा संकलनावेळी मोठ्या प्रमाणावर शिळ्या पोळ्या, भाकरी वेगळ्या जमा केल्या जातात. त्या परिसरातील पशुपालक खरेदी करून गायी, म्हशींना देतात, अशी माहिती मजुरांनी दिली. जाधवनगर, सुदर्शननगर, रोजाबाग, स्वामी विवेकानंदनगर, श्रीकृष्णनगर अणि पवननगर या भागातून जमा होणाऱ्या कचऱ्यातील भंगार आणि इतर सामान काही जण विकत घेत आहे. यातून बचत गटांना दररोज चार ते साडे चार हजारांची कमाई होत आहे. बचत गटांना होत आहे.
आमच्या भागातून कचऱ्याचे संकलन योग्य पद्धतीने केले जात आहे. पूर्वी रस्त्यावर पडलेला कचरा आता दिसत नाही.प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा अजूनही काही रस्त्यावर दिसत आहे. दिवसातून दोन वेळेस कचरा नेल्यास परिणाम वेगळे दिसतील.
-योगेश वाघमारे
ओला-सुका कचरा संकलित केला जात आहे. हर्सूल येथील सावंगी तलावाच्या बाजुलाच कचऱ्याचे ढीग लागले आहेत. यामुळे आगामी काळात गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कचरावर लवकरात लवकर प्रक्रिया सुरू करावी.
-रामेश्वर सोनवणे
चेतनानगरमध्ये दररोज कचरा संकलित केला जातो. मात्र तो जांभूळ वन येथे टाकला जात आहे. हे वन निर्माण करण्यासाठी एक ते दीड कोटी रुपये खर्च झाले आहेत. नागरिकांच्या विरोधानंतरही अनेकदा रात्रीतून कचरा टाकून हे वन उद्ध्वस्त करण्यात आले.
-शिवा भगुरे
वॉर्ड कचरामुक्त झाला असला तरी शेजारीच सावंगी तलावा जवळ कचरा टाकला जात आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने समस्या जाणवत नाही. येत्या पावसाळ्यापूर्वी ही समस्या सोडविली नाही तर त्याचा फटका हर्सूलकरांना बसणार आहे. सध्या हर्सूलमध्ये जायकवाडीचे पाणी दिले जाते. पण, अजूनही अर्धा भाग तळ्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आगामी काळात कचऱ्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात.
-हरिदास म्हस्के
आमची वस्ती सावंगी तलावा जवळ आहे. येथे साचलेल्या कचऱ्यामुळे रात्री परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते. तलावा शेजारी आमचे शेत असून दुर्गंधीमुळे शेतगडी काम करण्यास तयार नाहीत. कचरा टाकण्यास आम्ही विरोध केला तेव्हा प्रक्रिया होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. आतापर्यंत कचऱ्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया सुरू झालेली नाही.
-साजीद पठाण
फातेमानगर, फिजापार्क, करीमनगर, उमर कॉलनी, हुजैफा पार्कसह इतर भागात घंटागाडी येत नाही. या भागातील कचरा उचलला जात नाही. या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छत होऊन आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत.
-मुख्तार पटेल
हर्सूलला जोडून नवीन वसाहती वसत आहगेत. या विस्तारित भागातही सुविधा देण्याची गरज आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष आहे. कचरा उचलण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्याचा स्थानिक नागरिकांना खूप त्रास होत आहे.
-अझहर पठाण
कचराकोंडी निर्माण होण्यापूर्वीपासून या प्रभागातून घंटागाडीद्वारे कचरा संकलन केले जाते. ओला-सुका कचरा वेगळा करून संकलन केले जाते. कचराकोंडी निर्माण झाल्यानंतर एन-१२, एन-९ आणि एन-११ येथे पिट तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात होती. या भागातील कचरा संकलन कामाची तत्कालीन पालकमंत्री व आयुक्त आणि सध्याच्या पालिका आयुक्तांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. या वॉर्डाचे नगरसेवक, नागरिकांच्या सहकार्यामुळे हा भाग १०० टक्के कचरामुक्त केला. पूर्वी सहा वॉर्डात ८५ कचराकुंड्या होत्या, आता एकही कचराकुंडी नाही.
-बी. एस. पटेल, स्वच्छता निरीक्षक
……
सावंगी तलावा शेजारी कचऱ्यावर प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. तलावाजवळ पडलेल्या कचऱ्याची दुर्गंधी सुटू नये याकरिता नियमित औषधी फवारणी केली जाते. यामुळे माशा आणि डासांचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. निश्चितच आगामी काळात कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हा त्रास पूर्णत: कमी होणार आहे.
-अजमत खान, वॉर्ड अधिकारी, झोन क्रमांक ४