म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयाने उप केंद्र संचालक नेमण्याचे आपल्याकडील अधिकार थेट केंद्र संचालकांनाच दिले. अनेक परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकरणांना आळा घालण्यास मंडळाला अपयश आले असताना त्यात अशा प्रकारची मुभा परीक्षा केंद्रांच्या पथ्यावरच पडणार आहे. भरारी पथकांसह महसूल विभागाचे बैठे पथकांची जुळवाजुळव सुरू होती. ग्रामसेवकांनी बैठक पथकात काम करण्यास नकार दिला.
बारावी परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होत आहे. पेपर सुरू होण्याच्या काही तासापर्यंत मंडळातील लगबग सुरूच होती. त्यात यंदा मंडळाने कॉपीमुक्ती परीक्षेचा नारा दिला असला तरी तो प्रत्यक्षात येण्याची शक्यता दिसत नाही. औरंगाबाद विभाग दरवर्षी परीक्षेतील गैरप्रकारांनी गाजतो. त्यात यंदा मंडळाला एक निर्णय अनेक केंद्रासाठी फायद्याचाच ठरण्याची शक्यता आहे. मागील वर्षीपर्यंत परीक्षा केंद्रावर नेमण्यात येणारे उप केंद्र संचालक यांची नेमणूक शिक्षण मंडळाकडून केली जात होती. यंदा त्याचे अधिकार केंद्र संचालकालाच देण्यात आले आहे. औरंगाबाद विभागात ३८८ परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा होत आहे. केंद्रावर केंद्रसंचालकांना मदतनीस म्हणून उप केंद्र संचालकांची नेमणूक केली जाते. पूर्वी इतर शैक्षणिक संस्थेतील व्यक्तींची या पदावर नेमणूक केली जात होती. त्यांच्या स्तरावर नेमणुका करण्याचे अधिकार आल्याने अनेक केंद्रांवर आपल्याच मर्जीतील व्यक्तीकडे पदाची जबाबदारी येऊ शकते आणि गैरप्रकारांना बळ मिळू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यंदा केंद्र संचालकांच्या स्तरावर नेमणुका करण्याचे अधिकार आल्याने अनेक केंद्रावर आपल्याच मर्जीतील व्यक्तीकडे पदाची जबाबदारी येऊ शकते आणि गैरप्रकारांना बळ मिळू शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे.
\Bविभागात ३२ भरारी पथके\B
औरंगाबाद विभागातून एक लाख ६८ हजार २५१ परीक्षार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी मंडळ, शिक्षणाधिकारी यांच्यास्तरावर मंडळाचे भरारी पथकांची नेमणूक करण्यात येते. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी मंडळाने यंदा ३२ भरारी पथक नेमण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी आठ, तर बीड, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी सहा पथकांची नेमणूक केली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी यांचा समावेश असणार आहे. त्यासह काही परीक्षा केंद्रांची व्हिडिओ शुटिंग केली जाणार आहे.
\Bउशिरा येणाऱ्यांना प्रवेश नाहीत\B
परीक्षेसाठी यंदाही निश्चित वेळेत परीक्षा केंद्रावर पोचणे परीक्षार्थींना बंधनकारक आहे. सकाळी ११ वाजता पेपर असेल, तर त्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही. काही अतिशय महत्त्वाचे कारण असेल तरच दहा मिनिटांची संधी दिली जाईल. त्यासाठी विद्यार्थ्याला हमीपत्र द्यावे लागणार आहे. मागील वर्षापासून हा नियम मंडळाने केला आहे. त्यापूर्वी परीक्षा सुरू झाल्यानंतर काही कारणास्तरव अर्धातास उशिर झालातरी, संधी दिली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहण्याचे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
\Bजिल्हानिहाय परीक्षार्थी\B
जिल्हा.......परीक्षा केंद्र......विद्यार्थी
औरंगाबाद....१३६............६२१९१
बीड.............९५.............३९२३६
जालना.........६७.............२९३८६
परभणी..........५६............२४१५४
हिंगोली..........३४............१३२८४