म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात दुष्काळी मदतीसाठीची १०५० कोटी रक्कम दोन हप्त्यात मिळाली. ५२५ कोटींचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर तीन आठवडयात मदतीचा ५२५ कोटी रुपयांचा दुसरा हप्ताही मिळाला. मात्र, पहिल्या टप्प्यातील १६ टक्के अनुदान वाटप शिल्लक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. मराठवाड्यातील ४८ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ३३ लाख ७१ हजार हेक्टरवरील पिके दुष्काळामुळे करपली झाली असून, एकूण ३६ लाख २७ हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल ३२ लाख ५५ हजार (९० टक्के) शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. हे शेतकरी जाहीर झालेल्या अनुदानाची वाट पाहत होते. अनुदानाच्या पहिल्या टप्प्यात ५२५ कोटी २९ लाख ३६ हजार रुपये रक्कम मिळाली. त्यातील ४५५ कोटी ५१ लाख ४२ हजारांचे वाटप झाले असून, ६९ कोटी ७८ लाख रुपये रक्कम अजूनही पडून आहे. त्यामुळे अनुदान ज्यांना मिळाले नाही, ते शेतकरी प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे आता दुसऱ्या टप्प्यातील अनुदानही मराठवाड्याला प्राप्त झाले असून, प्रत्येक जिल्ह्यांना अनुदान देण्यात आले आहे. मराठवाड्याला आवश्यक असलेल्या दोन हजार ५६४ कोटी रुपयांच्या मदतीच्या रकमेपैकी एक हजार ५० कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली होती. यातील पहिल्या टप्प्यासाठी ५२५ कोटी २९ लाख, तर दुसऱ्या टप्प्यासाठीही तितकेच अनुदान मिळाले आहे. या दुष्काळामध्ये २९ लाख ६५ हजार हेक्टरवर कोरडवाहू पिके, दोन लाख ८० हजार हेक्टवरील बागायती पिके तर एक लाख २६ हजार हेक्टरवरील फळबागांना मोठा फटका बसला आहे. --- \Bमटा भूमिका \B--- \Bशेतकऱ्यांना दिलासा द्या \B--- मराठवाड्यात तीव्र दुष्काळ पडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम गेला. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील भूजल पातळी तब्बल दोन मीटरने खोल गेली आहे. गेल्या पाच वर्षांतील ही नीचांकी पातळी आहे. इतके गंभीर संकट असल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी तातडीने दुष्काळाचा निधी दिला. या निधीच्या वाटपात प्रशासनाकडून दिरंगाई सुरू असल्याचे दिसते. अनुदानाच्या पहिल्या टप्प्यातील १६ टक्के रक्कम ही दुसऱ्या टप्प्यातील रक्कम येऊनही वाटप नाही, म्हणजे हे अती झाले. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपणही थोडे संवेदनशील व्हावे. कुणाच्या घराची चूल आपल्या कामामुळे पेटेत असेल तर याहून मोठे आणि आनंददायी काम अजून कोणते? अशीच भावना ठेऊन प्रशासनाने काम करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. --- \Bजिल्हानिहाय मिळणारी रक्कम (दुसरा टप्पा) \B--- जिल्हा.....................एकूण मदत.................मान्यता दिली.................. दुसरा हप्ता --- औरंगाबाद..................५४५.१३.......................२२३.२८...................१११.६४ जालना.......................४७८.०३......................१९५.८०..................९७.९० बीड...........................६१९.८३.......................२५३.८८..................१२६.९४ लातूर........................१६.२१...........................६.२१......................३.३१ उस्मानाबाद..................३४१.७१......................१३९.९६..................६९.९८ नांदेड..........................१२५.७६.....................५१.५१....................२५.७५ परभणी..........................२६२.५६.....................१०७.५४..................५३.७७ हिंगोली........................१७५.६८.......................७१.९५...................३५.९७ ---- एकूण.........................२५६४.९१....................१०५०.५८...................५२५.२९
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट