म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बारावी परीक्षेत दिलेल्या सूचनांना अनेक केंद्रांनी केराची टोपली दाखवल्यामुळे संतापलेल्या मंडळाने दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास केंद्रसंचालकांना जबाबदार धरण्यात येईल, असा कडक इशारा दिला आहे. पुरेशी बैठक व्यवस्था नसेल तर, आत्ताच सांगा, अन्यथा कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले असून बाक उपलब्ध करून घ्या, अडचण असेल, तर ही बाब गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणू द्या, असे कळवण्यात आले आहे.
परीक्षा केंद्र घेताना भौतिक सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन परीक्षा केंद्राकडून देण्यात येते. शिक्षण विभाग सुविधा आहे की नाही, याची खातरजमा करण्याकडे दुर्लक्ष करते. परिणामी, अनेक केंद्रावर विद्यार्थ्यांची गैरसोय होते. बारावी परीक्षेत काही केंद्रावर चक्क जमिनीवर बसून परीक्षा घेण्यात आली. बैठक, जनरेटर, पिण्याचे पाणी, विद्यार्थी संख्येएवढे बाक, संरक्षण भिंत, सीसीटीव्ही आदी सुविधी असणे आवश्यक आहे. 'एका बाकावर एकच विद्यार्थी बसावा' असे मंडळाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानंतरही हे नियम पाळले जात नाहीत. बारावी परीक्षेतील असे प्रकार समोर आल्याने दहावीत असे प्रकार होवू नयेत यासाठी मंडळाने दहावी परीक्षा केंद्रसंचालकांना पत्र पाठवून सूचना केल्या आहेत.
\Bमंडळाच्या सूचना \B
एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थी जमिनीवर बसून परीक्षा देणार नाही, बाकाची कमतरता असल्यास संलग्न शाळेच्या विद्यार्थी संख्येएवढे बाक उपलब्ध करून घ्यावेत, बाकांबद्दल सहकार्य मिळत नसेल तर गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना कळवून बाक उपलब्ध करून घ्यावेत, याची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास केंद्रसंचालकास जबाबदार धरून प्रशासकीय कारवाई केली जाईल.
केंद्रसंचालकांना बैठक व्यवस्थेबाबत सूचनापत्र पाठवले आहे. त्यांनी बैठक व्यवस्थेसाठी आवश्यक तेवढे बाक उपलब्ध करून घ्यायचे आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्यात यावा. कोणत्याही परिस्थित एका बाकावर एकापेक्षा जास्त विद्यार्थी बसणार नाहीत याची काळजी केंद्रसंचालकांनी घ्यायची आहे.
-सुगता पुन्ने, विभागीय सचिव
\Bदहावीचे परीक्षा केंद्र…...६१६
परीक्षार्थी............१८६६७३\B