म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेत आपण येण्याच्या अगोदर अनेक अधिकारी आले आणि चांगले काम करून गेले. त्यामुळे या महापालिकेत कुणीच येऊ इच्छित नाही, असे म्हणून शहराची विनाकारण बदनामी करू नका, असा इशारा महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिला आहे.
डॉ. निपुण विनायक यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर आक्षेप घेत राजू वैद्य यांनी त्यांना १३ कलमी पत्र दिले होते. डॉ. विनायक यांना अकार्यक्षम ठरवण्याचा प्रयत्न या पत्रातून झाला होता. डॉ. विनायक यांनी या पत्राला गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सविस्तर उत्तर दिले. वैद्य यांनी घेतलेले आक्षेप खोडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी वैद्य सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे वैद्य यांनी शुक्रवारी आयुक्तांना पुन्हा एक पत्र दिले आहे. या पत्राकडे आरोप म्हणून न पाहता सूचना म्हणून पहा आणि सकारात्मक कार्यवाही करा, अशी अपेक्षा वैद्य यांनी व्यक्त केली आहे.
वैद्य यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरातील समस्यांबाबत आपले लक्ष वेधणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे. जनतेने खूप विश्वासाने आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, पण आम्हाला कर्तव्यात कसूर करता येणार नाही.
आयुक्तांच्या पाठीशी आपण उभे राहिलो, असे पत्रात नमूद करताना वैद्य यांनी म्हटले आहे की, कचराकोंडी सोडवण्यासाठी सकाळी सहापासून जनतेत जाऊन त्यांची समजूत काढणे असेल, स्थायी समितीमध्ये आपण दिलेले प्रस्ताव असतील, त्यामध्ये सदस्यांनी कंपनी ब्लॅकलिस्ट आहे असा मुद्दा लावून धरल्यावर देखील आपल्या मदतीने त्यांची समजूत घालून त्याला मंजुरी देणे असेल, विनानिविदा तीन संस्थांना जनजागरण करण्याचे काम देणे असेल, रत्नाकर वाघमारे हे नांदेड येथील लिपिक ते उपायुक्त असा वादग्रस्त प्रवास करणारे अधिकारी आहेत. त्यांना तज्ज्ञ म्हणून नेमणूक देणे असेल अशा कितीतरी बाबतीत आम्ही नेहमीच तुमच्या योजनांना पाठिंबा दिला आहे. कचऱ्यावरील प्रक्रिया करण्याबद्दलचा 'डीपीआर' इंदूर येथील संस्थेने तयार केला आहे. त्यातच मशीन खरेदीचा मुद्दा आहे. त्यामुळे मशीन खरेदी करून लवकर कचरा मुक्ती व्हावी यासाठी पदाधिकारी पाठपुरावा करीत होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना चुकीचे ठरवणे योग्य नाही. सिटी बस सुरू केल्याबद्दल अभिनंदन, पण बसचे काम टाटा कंपनीलाच मिळावे यासाठी निविदा प्रक्रियेत काही अटी टाकल्याबद्दल आक्षेप घेतले गेले. त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही तुमच्या सोबत राहिलो, असे वैद्य यांनी पत्रात नमूद केले आहे. महापालिकेत २५ वर्षांनंतर भरती केली, पण त्यात योग्य प्रकारे आसन व्यवस्था नव्हती, याबद्दल सदस्यांनी आक्षेप घेतल्यावर ते आयुक्तांना सांगा, असे म्हणणे चुकीचे आहे का, असा सवाल देखील वैद्य यांनी उपस्थित केला आहे.
\Bवर्षभरापासून प्रश्न 'जैसे थे'\B
शहरातील समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी आम्ही प्रशासनाच्या बरोबरीने काम केले. वर्ष झाले तरी प्रश्न जिथल्या तिथेच आहेत. अनेक नगरसेवक त्यांच्या भागातील समस्या वारंवार मांडतात. वर्षानुवर्षे त्या सुटत नाहीत ही वस्तुस्थिती आहे, हे आपल्या निदर्शनास आणले त्यात गैर काय आहे? नागिरकांच्या समस्या सोडवण्यासाठी घटनेने दिलेल्या अधिकाराचा लोकप्रतिनिधी म्हणून वापर करीत राहणे याच चुकीचे काही नाही. आपणही हे समजून घ्यावे. शहराचा खेळखंडोबा होताना उघड्या डोळ्याने हे पाहणे शक्य नाही म्हणून हा पत्रप्रपंच, असे वैद्य यांनी पत्रात म्हटले आहे.