म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद वक्फ बोर्डाने राज्यातील सहा प्रादेशिक कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना औरंगाबाद मुख्यालयात परत बोलविण्याचे आदेश दिले. या आदेशांची अंमलबजावणी झाली. मात्र, वक्फ बोर्ड कार्यालयात अधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. सध्या या प्रादेशिक अधिकाऱ्यांना संगणक कक्षात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वक्फ बोर्डाशी संबंधित असलेली कामे लवकरात लवकर व्हावीत. यासाठी प्रादेशिक कार्यालये तयार करण्यात आली होती. या प्रादेशिक कार्यालयांतर्गत नागपूर, अमरावती, मुंबई (कोकण), पुणे, नाशिक अशी कार्यालये तयार करण्यात आली होती. या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे वक्फ बोर्डाशी संबंधित कामे देण्यात आली होती. ही कामे व्यवस्थितरित्या पार पाडली जात नसल्याचा आरोप बोर्डाच्या काही सदस्यांनी केला होता. तसेच कोणत्याही कामाबाबत या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते काम औरंगाबाद मुख्यालयाकडे काम असल्याचे सांगत असल्याचाही आरोप करण्यात आला होता. ही सर्व कार्यालये औरंगाबादला आणण्याचा निर्णय वक्फ बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीनंतर नागपूर, अमरावती, मुंबई (कोकण), पुणे आणि नाशिक प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना औरंगाबादला बोलविण्यात आले आहे. हे अधिकारी औरंगाबादला दाखल झाले. या अधिकाऱ्यांना बसण्यासाठी तात्पुरती जागेची व्यवस्था संगणक कक्षात करण्यात आली आहे. सध्या संगणक कक्षात जुन्या कागदपत्रांची स्कॅनिंग करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी प्रादेशिक अधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा देण्यात आली आहे. या प्रादेशिक कार्यालयाकडे असलेल्या फाइलही जमा करण्यात आलेल्या आहेत. नागपूर, अमरावती किंवा मुंबईहून आलेल्या नागरिकांना प्रादेशिक अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी संगणक कक्षात जाऊन संपर्क साधावा लागत आहे. यामुळे शहराबाहेरून आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये करणार व्यवस्था वक्फ बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष एम. एम. शेख यांच्यासाठी वक्फ बोर्डात एक केबिन तयार करण्यात आली आहे. या केबिनच्या जागेवर प्रादेशिक अधिकाऱ्यांना बसण्याची जागा करून देण्याची कार्यवाही सुरू आल्याची माहिती वक्फ बोर्डाच्या सूत्रांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट