म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे, असे म्हणत एकट्या महापालिकेलाच दोष देऊन चालणार नाही, अशी स्षष्ट भूमिका विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली आहे. 'तूर्त योग्य मार्ग बघू, अन्यथा सर्वसामान्य नागरिक म्हणून रस्त्यावर उतरण्याचा अधिकार मलाही आहे व त्यानुसार, रस्त्यावर उतरू शकतो,' असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 'रस्त्यावर कचरा न टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे ही जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांचीही आहे. मी ज्या शहरात राहतो तेथे माझ्या शेजारी कचराकुंडी नको, मी कचराकुंडीत राहणार नाही,' असे केंद्रेकर म्हणाले. 'शहराचा कचराप्रश्न सोडवण्यासाठी जवान, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली, मात्र बैठकीला उपस्थित केवळ घनकचरा व्यवस्थापक नंदकिशोर भोंबे उपस्थित राहतात. ' असे म्हणत, 'मी आधी स्वत:कडे शहराचा नागरिक म्हणून पाहतो; त्यानंतर अधिकारी. जर महापालिकेने कचराप्रश्न तातडीने सोडवला नाही, तर मी अधिकारी म्हणून नाही, तर शहराचा नागरिक म्हणून रस्त्यावर उतरेल, मात्र तशी वेळ येणार नाही. कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर समस्या आटोक्यात आलेली असेल,' असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्लास्टिकबंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी एक दिवस आगोदरच प्लास्टिकबंदी संदर्भात बैठक घेत अधिकाऱ्यांना तंबी दिली होती. या बैठकीनंतर महापालिकेने शहरात तत्काळ कारवाई सुरू केली होती. प्लास्टिक पिशव्यांबाबत कारवाई करताना पाण्याच्या बाटल्यासंदर्भात काय ? असे आयुक्तांना विचारले असता, एकुणच प्लास्टिकबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका केंद्रेकरांनी मांडली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट