म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्थायी परीक्षा संचालक व कुलसचिव नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, साडेचार वर्षे प्रभारी अधिकाऱ्यांवर कारभार चालवणाऱ्या कुलगुरूंना कार्यकाळाच्या शेवटच्या दोन महिन्यात अधिकारी नेमण्याची घाई का झाली, असा सवाल राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी केला आहे. कुलगुरू आणि राज्यपालांना दिलेल्या पत्रात शितोळे यांनी कुलगुरूंना अलिखित संकेतांची आठवण करून देत प्रक्रियेला विरोध केला आहे. विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक पद रिक्त असल्यामुळे साडेचार वर्षे प्रभारी अधिकाऱ्यावर कारभार चालवण्यात आला. आतापर्यंत नऊ संचालकांनी चोपडे यांच्या कार्यकाळात काम केले. अनेकदा मागणी होऊनही स्थायी अधिकारी नियुक्त करण्यात आले नाही. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ जून महिन्यात पूर्ण होणार आहे. या शेवटच्या टप्प्यात चोपडे यांनी दोन्ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, शेवटी पदे भरण्याची घाई कशासाठी असा सवाल उपस्थित झाला आहे. या प्रक्रियेला राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी विरोध केला आहे. याबाबत चोपडे यांना दिलेल्या पत्रात त्यांनी महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन संचालक आणि कुलसचिव अशा प्रमुख पदांची नियुक्ती नवीन कुलगुरूंनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या टीमची निवड करावी असा संकेत आहे. तुमचा कार्यकाळ मे २०१९मध्ये संपणार आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात भरती प्रक्रिया करणे योग्य नाही. नवीन कुलगुरूंसाठी हा पर्याय राखून ठेवणे योग्य असेल. राज्यपालांचा प्रतिनिधी या अधिकाराने हे सूचवित आहे, असे शितोळे यांनी पत्रात म्हटले आहे. मागील पाच वर्षांत या जागा पूर्णवेळ न भरता प्रभारी अधिकाऱ्यांच्या मदतीने कामकाज चालवले आहे. आता शेवटच्या दोन महिन्यात घाई करणे योग्य दिसणार नाही, असे शितोळे यांनी सूचवले आहे. शेवटच्या कार्यकाळात मोठे आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेणे, नवीन प्राधिकरणे व समित्या नेमण्याचे निर्णय घेऊ नयेत असा अलिखित संकेत आहे. अत्यंत निकडीचा निर्णय असल्यास माझ्याशी व व्यवस्थापन परिषदेशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, असे शितोळे यांनी कुलगुरूंना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राची एक प्रत राज्यपालांना पाठवली आहे. कुलसचिव पदासाठी ३१ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. तर परीक्षा व मूल्यापन संचालक पदासाठी १६ अर्ज आले आहेत. या पत्रामुळे कुलगुरू कोंडीत सापडले असून प्रक्रिया बारगळण्याची शक्यता आहे. \Bवशिलेबाजीची खुली चर्चा \Bकुलगुरू चोपडे यांच्या कार्यकाळाचे शेवटचे दोन महिने शिल्लक आहेत. या टप्प्यात त्यांच्या निकटवर्तीय अधिकारी व प्राधिकरण सदस्याची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होण्याची विद्यापीठात चर्चा सुरू आहे. या प्रकाराची चर्चा वाढल्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनिमित्त शितोळे यांनी पत्र देऊन चोपडे यांच्या प्रक्रियेला 'ब्रेक' लावले आहे. \Bव्यवस्थापन परिषदेत चर्चा\B विद्यापीठात शुक्रवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मागील ६५ विषयांना मान्यता देण्यात आली. तसेच परीक्षा केंद्रावर अनेक वर्षांपासून लिहिलेल्या जुन्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडले आहेत. या उत्तरपत्रिका परीक्षा विभागाने नियमानुसार नष्ट कराव्यात असा ठराव घेण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट