…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'साहेब, माझा नवरा आणि बहीण बायपासवर झालेल्या अपघातात गेले. आता आमच्या लेकराबाळांचाही जीव जाणार का,' असा संतप्त सवाल बीड बायपासवर सोमवारी झालेल्या सभेत स्मिता पाठारे यांनी सोमवारी केला. तेव्हा पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आमदार संजय शिरसाट आणि महापौर नंदकुमार घोडेले अक्षरश: निरुत्तर झाले.
बीड बायपास रोडवरील अपघातचक्र थांबत नाही. आठवड्यात दोन महिलांचा बळी गेला. त्यामुळे संतापलेल्या सातारा-देवळाई भागातील नागरिकांनी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता जाबिंदा लॉन्स येथे सभा घेतली. नागरिकांच्या भावना इतक्या तीव्र होत्या की, सभेसाठी जाबिंदा लॉन्सच्या शेजारी मंडप टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, संतप्त सातारावासियांनी याला नकार देत उन्हातच आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. यावेळी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती. सभेत प्रशांत अवसरमल यांनी प्रास्ताविक केले. 'वारंवार होत असलेल्या अपघातामुळे सातारा - देवळाई परिसरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढा,' असे आवाहन केले. यावेळी अनेक महिलांनी आपले मत मांडले. यावेळी संतप्त झालेल्या स्मिता पाठारे म्हणाल्या, 'माझा नवरा, बहीण बायपासवर अपघातात गेले. आता आमच्या लेकरांचा बळीही असाच जाणार का,' असा भावनिक सवाल केला. तेव्हा पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आमदार संजय शिरसाट आणि महापौर नंदकुमार घोडेले यांचे चेहरे क्षणात उतरले. यावर काय उत्तर द्यावे, कुणालाही सुचले नाही. त्यानंतर सविता कुलकर्णी ,ज्योती अवसरमल, शोभा सुंभ, रेखा सोनवणे, मीना भोसरे, मंगल दरे, मधू गोरे यांच्यासह इतर महिलांनी पाठारे यांच्या भावनेला प्रतिसाद देत आपले म्हणणे मांडले. नागरिकांचा तीव्र संताप पाहून आमदार संजय शिरसाट यांनीही वारंवार होत असलेल्या अपघाताबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी काही नागरिकांनी सर्व्हिस रोडबाबत अजूनही काहीच निर्णय होत नाही. बायपासचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गी लावावा. वाहनांच्या वेगावर निर्बंध घालावेत, अशी मागणी केली. अपघात झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप निर्माण होतो. तेव्हा कारवाई करण्याबाबत प्रशासनाला जाग येते. गेल्या काही वेळेपासून हे वारंवार होत आहे. आजच्या आज बीड बायपासच्या समस्येवर तोडगा काढा, अशी भूमिका काही नागरिकांनी घेतली. उसळलेला जनक्षोभ पाहता पोलिस आयुक्तांनी या मागण्यांवर त्वरित कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शोभा यादव, गोदावरी गायकवाड, अनामिका अंकुश, रमेश वाहुळे, रणजित ढेपे, अल्ताफ बागवान, अभिजित देशमुख, अजिंक्य गायकवाड, नगरसेवक सायली जमादार, प्रदीप बुरांडे, राजेंद्र राठोड, कृष्णा दुधमल, संभाजी हाके, प्रा. साद लोधी, कांता कदम, सविता देशमुख यांच्यासह सातारा देवळाई परिसरातील अन्य नागरिकांची उपस्थिती होती.
…
\Bपालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करा
\Bबीड बायपास रोडवर अपघात दोघांचा बळी गेल्यानंतर रविवारी सातारा देवळाई भागातील काही नागरिकांनी सातारा पोलिस ठाणे गाठले. बायपास रोडवरील अपघात हे महापालिकेच्या चुकीमुळे होत आहेत. त्यायामुळे महापालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आमदारांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
\Bजनक्षोभानंतर चार तास पाहणी
\Bबायपासवरील सभेत नागरिकांनी केलेल्या आगपाखडीमुळे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बीड बायपास रोडची चार तास पाहणी केली.
सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण काढून घेण्यासाठी मालमत्ताधारकांना दम दिला. अतिरेक करणाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी 'पोलिसी' भाषेत समज दिली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अतिक्रमण हटविले नाही, तर गुन्हे दाखल करू असा इशाराही त्यांनी दिला.
\Bअपघात रोखण्यासाठी उपायोजना...
\B- जनक्षोभानंतर पोलिस कामाला. उपायोजना केल्या जाहीर.
- जड वाहनांची प्रवेश बंदी अजून एक तास वाढविण्याचा निर्णय.
- वाहनांचा वेग कमी करण्यासाठी झिग झॅग बरिगेटस लावणार.
- माऊलीनगर ते महानुभव चौकापर्यंत हा प्रयोग तूर्तास सुरू करणार.
- रस्त्यावरील डिवायडरजवळ गतिरोधक टाकण्याचा विचार सुरू
- देवळाई चौक ते एमआयटी हा सर्व्हिस रोड खुला करणार.
- देवळाई ते महानुभव आश्रम दुसऱ्या बाजूला सर्व्हिस रोड करणार.