म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी न देता, त्यांना विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी ठेवणे आवश्यक आहे. आमदार जलील यांच्यापेक्षा अधिक योग्य आणि लोकसभेत पैसा खर्च करणारा नेता लोकसभा निवडणुकीत उभा करावा, अशी मागणी मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाच्या एका गटाकडून करण्यात आली आहे. यामुळे 'एमआयएम'कडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा करण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती पक्षाच्या काही सूत्रांनी दिली. लोकसभा निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाने बहुजन वंचित आघाडीसोबत युती केली आहे. दोन दिवसांपूर्वी आघाडीने ३७ उमेदवार जाहीर केले. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. आंबेडकर यांनी केलेल्या घोषणेमुळे औरंगाबाद आणि मुंबई दक्षिण या जागा ही 'एमआयएम'ला सोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले तर, दुसरीकडे 'एमआयएम'ने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवार द्यावा, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. पक्षश्रेष्ठींकडे ही मागणी गेल्यानंतर ओवेसी यांनी पक्ष निरीक्षकांना पाठवून उमेदवारीबाबत अहवाल देण्यासाठी मराठवाडा अध्यक्ष, पक्षाचे निरीक्षक फेरोज लाला यांना पाठविण्यात आले होते. याबाबत १४ मार्च रोजी अब्बास फंक्शन हॉल येथे पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत फेरोज लाला यांनी चर्चा केली. 'एमआयएम'च्या आमदारांनी एक ठराव घेऊन पक्ष निरीक्षकांकडे सुपूर्द केला. आमदार इम्तियाज जलील यांनाच उमेदवारी देण्याबाबत आग्रह धरण्यात आला आहे, असे अहवालात नमूद केले आहे. एकीकडे पक्ष कार्यकर्ते, नगरसेवक आमदार जलील यांच्या उमेदवारीची मागणी करीत असताना, काही पदाधिकाऱ्यांनी आमदार जलील यांना विधानसभेतच ठेवण्यात यावे. त्यांचे काम विधानसभेत चांगले आहे. त्यांची गरज राज्यात आहे. या जागी अधिक खर्च करणारा सक्षम उमेदवार शोधून देण्यात यावा, अशी मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील काही गटांतील नेत्यांनी या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोचवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे लोकसभेच्या उमेदवारीबाबत घोषणा थांबविण्यात आली असल्याची माहिती 'एमआयएम'च्या सूत्रांनी दिली. … \Bम्हणून झाला उशीर\B हैदराबाद येथील निवडणूक ११ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी उमेदवारी अर्ज हैदराबादेत सोमवारी (१८ मार्च) दाखल करण्यात आला. यामुळे औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारासाठी उशीर झाला असल्याची माहिती 'एमआयएम'च्या सूत्रांनी दिली. …… औरंगाबाद लोकसभा लढविण्यासाठी पक्षाकडून प्रक्रिया सुरू आहे. पक्षाकडून जो आदेश येईल. ते आम्ही मान्य करू. पक्षातंर्गत गट-तट नाहीत. विरोधकांकडून जाणीवपूर्वक प्रचार सुरू आहे. - इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट