म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद औरंगपुरा येथील प्रणव प्लाझा या तीन सेक्टरच्या अपार्टमेंटमध्ये पाणीबाणी निर्माण झाल्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांनी मंगळवारी महापालिकेत धाव घेतली. पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली. गुरुवारी पाणी आले नाही तर शुक्रवारी प्रणव प्लाझामधील सर्व रहिवासी डब्बे घेऊन महापालिकेत येऊन बसतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. प्रणव प्लाझा अ, ब, क सेक्टर ही इमारत औरंगपुरा भागात भाजी मंडईच्या परिसरात आहे. औरंगपुरा भागास ज्युबलीपार्क येथील जलकुंभातून पाणी पुरवठा होतो. प्रणव प्लाझाला देखील याच जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या चार-सहा महिन्यांपासून प्रणव प्लाझामध्ये पाणीच येत नसल्यामुळे येथील रहिवाशांनी मंगळावारी थेट महापालिकेत धाव घेतली. त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली. यावेळी उपमहापौर विजय औताडे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी उपस्थित होते. रहिवाशांनी महापौरांबरोबर पाणीबाणी बद्दल चर्चा केली. प्रणव प्लाझाला मुद्दाम पाणी दिले जात नाही, असा आरोप करीत त्यांनी पाणी पुरवठ्याच्या यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. चार-सहा महिन्यांपासून पाणी येत नाही. टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते, असे त्यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. आता गुरुवारी पाण्याचा दिवस आहे. गुरुवारी योग्यप्रकारे पाणी पुरवठा न झाल्यास शुक्रवारी मुलाबाळांसह डब्बे घेऊन आम्ही महापालिकेत येऊन बसू असा इशारा देण्यात आला. पाणी प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. गुरुवारी पाणी पुरवठा निश्चितपणे होईल, असे ते म्हणाले. महापौरांची भेट घेण्यासाठी मंगल खिवंसरा, प्रशांत भूमकर, जब्बार, भाग्यश्री बावस्कर, मंगल भालेराव, स्नेहल कुलकर्णी, रेखा मुंडे यांच्यासह अन्य रहिवासी पालिकेत आले होते. त्यांच्या बरोबर त्यांची लहान लहान मुले देखील होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट