म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
निवडणुकीचे वारे तापत असतानाच मराठवाड्यात दुष्काळाच्या तीव्र झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. चार जिल्ह्यांतील गावांना उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. आता मार्च महिन्यांत गावांसोबत शहरांनाही पाणीटंचाईने कवेत घेतले आहे. मराठवाड्यातील ५० नगर पालिका आणि २५ नगर पंचायतींपैकी २२ शहरांमध्ये भीषण पाणीटंचाई, तर २१ शहरांत तीव्र पाणीटंचाई असल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाला मिळाला आहे. मराठवाड्यातील चार महापालिकांची स्थितीही फार वेगळी नाही.
शहरांसाठी पाणीपुरवठा योजना असताना प्रकल्पांमध्ये पाणीच नसल्याचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील अनेक शहरांना दहा ते बारा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भीषण टंचाई असलेल्या २२ शहरांना पाणीपुवठा करणाऱ्या स्त्रोतात मार्च अखेरपर्यंतच पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, सिल्लोड, वैजापूर, जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर व घनसावंगी, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व पालम, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, बीड जिल्ह्यातील बीड शहर, गेवराई, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरुर कासार, लातूर जिल्ह्यातील औसा, देवणी, जळकोट, चाकूर व रेणापूर, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा शहराचा समावेश आहे. यापैकी अनेक शहरांत दहा ते पंधरा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
मराठवाड्यातील सर्वात मोठ्या औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाचा साठा शून्यावर आला आहे, मृतसाठ्यात मुबलक पाणी असले तरी केवळ महापालिकेच्या ढिसाळपणामुळे शहराला सहा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. या शिवाय विभागातील ३२ शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांत जून व जुलैपर्यंतचा पाणीसाठा असला तरी तेथे सौम्य पाणीटंचाई आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, पैठण, गंगापूर जालना जिल्ह्यातील जालना शहर, अंबड, परतूर व मंठा, परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, मानवत व पूर्णा, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, नांदेड जिल्ह्यातील किनवट, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी वैजिनाथ, माजलगाव, केज, व किल्लेधारूर, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, निलंगा व शिरूर अनंतपाळ, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, मुरूम, भूम, परंडा, वाशी व नळदुर्ग या शहरांचा समावेश आहे.
पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या बहुतांश शहरांत सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जूनपर्यंत उपाययोजना करण्यासाठी काही नगर पालिकांनी टँकर, विहीर अधिग्रहण, विंधन विहीर तसेच प्रकल्पात चर खोदण्याचा प्रस्ताव दिला आहे. एकूणच मराठवाड्यातील ७९ शहरांपैकी बहुतांश शहरी भागांत पाणीटंचाई असून नागरिकांना पिण्याचे पाणी खरेदी करावे लागत आहे.
\Bमहिनानंतर २१ शहरांत बिकट स्थिती \B
तीव्र पाणीटंचाई असलेल्या २१ शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमध्ये एप्रिल अखेरपर्यंतचा पाणीसाठा आहे. त्यानंतर स्थिती बिकट होऊ शकते. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री व सोयगाव, पाथरी, सोनपेठ, नांदेड जिल्ह्यातील कंधार, कुंडलवाडी, देगलूर, धर्माबाद, बिलोली, लोहा, उमरी, हदगाव, भोकर, मुखेड, मुदखेड, अर्धापूर, माहूर, हिमायतनगर, नायगाव, तर लातूर जिल्ह्यातील उदगीर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब या शहरांचा समावेश आहे.