म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'साहेब, तुम्ही लोकसभेची निवडणूक पक्षाच्या तिकीटावरच लढा,' असा कौल काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी दिला. अपक्ष निवडणूक लढण्याबाबत सत्तार समर्थकांनी 'नाही' असे उत्तर दिले आहे. यामुळे निवडणुकीत पक्षाच्या तिकीटावर उभे राहायचे किंवा नाही, याचा निर्णय समर्थकांनी आमदार सत्तार यांच्यावर सोडला आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रसने आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस जिल्हाध्यक्ष, आमदार अब्दुल सत्तार यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला आहे. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारी (२९ मार्च) समर्थकांचा आमखास मैदानावर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षातील सत्तार यांचे समर्थक उपस्थितीत होते. यावेळी रामकृष्ण बाबा पाटील यांनी विविध समाजाचे मतदार सत्तार यांच्या पाठिशी असल्याने त्यांना मदत करण्याचे जाहीर केले. समर्थकांसमोर बोलताना आमदार सत्तार यांनी 'एमआयएम' आणि त्या पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांच्यावर टिकास्त्र सोडले. 'एमआयएम'ने आधी निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले, पण जिंकण्यासाठी नव्हे तर मला रोखण्यासाठी 'एमआयएम' निवडणूक लढत असल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेस उमेदवार माझ्यासाठी जागा सोडण्याचे सांगत आहेत, पण त्यांना पक्षाने उमेदवारी दिली असल्याने त्यांनी निवडणूक लढवावी असे आवाहन केले. 'गेल्या २५ वर्षांत खासदार चंद्रकांत खैरे यांना शहराचा पाणी, रस्त्याचे प्रश्न सोडवता आले नाहीत. खैरेंमुळे औरंगाबाद शहर ही कचऱ्याची राजधानी झाली. ते फक्त भावनिक मुद्यांवर निवडणूक लढवतात, त्यांनी पाच मोठी विकासकामे दाखवावीत,' अशी टीका खासदार खैरे यांच्यावर केली.
\Bसत्तारांचे प्रश्न, समर्थकांचे उत्तर \B
आमदार सत्तार: लोकसभा निवडणूक लढवावी का?
समर्थक: (हात उंचावून) हो
आमदार सत्तार: पक्षाच्या तिकीटावर लढवावी का?
समर्थक: (हात उंचावून) हो
आमदार सत्तार: अपक्ष लढवावी का?
समर्थक: नाही
त्यावर आमदार सत्तार यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
………
\Bआमदार जलील हे तर रणछोडदास \B
आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणातून 'एमआयएम' आणि आमदार इम्तियाज जलील यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी हैदराबाद येथील 'रिमोट'बाबत मत व्यक्त केले. आमदार जलील हे रणछोडदास आहेत. कटकट गेटचा चिल्लर रस्ता करून विकास केल्याचा आव आणत आहेत. आगामी औरंगाबाद मध्य विधानसभा क्षेत्रातून आमदार जलील यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.