म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अमेरिकेचे थोर राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यपकांना पत्र लिहून त्यांच्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल अवगत केले होते. हे पत्र 'अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र' म्हणून जगप्रसिद्ध आहे. त्याचे पोस्टर अनेक शाळांमध्ये लावलेले असते. नुकत्याच झालेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्यात मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकच पुढाकार घेत असल्याचे पाहून
औरंगाबादचे शिक्षणाधिकारी व्यथित झाले आहेत. त्यांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांना पत्र लिहून परीक्षेतील कामकाजाबद्दल चांगलीच कानउघाडणी केली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षा नुकत्याच संपल्या. या परीक्षेत जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेट दिल्यास काय स्थिती होती याबाबत शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण यांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांना खुले पत्र लिहिले आहे. या पत्राची शिक्षण क्षेत्रात जोरदार चर्चा आहे. कॉपी प्रकरणे कशी समोर आली, संस्थाचालकांचा कॉपी पुरविण्यात कसा उत्साह होता यापासून काय करायला हवे याच्या सूचनाही केल्या आहेत. पत्रातून मुख्याध्यापक, प्राचार्य शिक्षणांना 'शालजोडी' लगावली असून काही ठिकामी चिमटे काढले आहेत. हे पत्र म्हणजे एकूणच शिक्षण व्यवस्थेतील गैरकारभार चव्हाट्यावर मांडणारे आहे.
विद्यार्थी अहोरात्र आणि कठोर मेहनत करून परीक्षेला बसले होते, अशी जाणीव करून देत त्यांनी व्यवस्थेला खडे बोल सुनावले आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण येथील विद्यार्थी ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर प्रवेश घेत असल्याकडे लक्ष वेधले आहे. यावर त्यांनी थेट दक्षिण अफ्रिकेतील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील एका संदेशाचा उल्लेख केला आहे. 'एखाद्या देशाला नष्ट करायचे असेल, तर त्यासाठी 'अॅटम बॉम्ब' किंवा लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागावी लागत नाहीत. केवळ शिक्षणाचा दर्जा खालावण्याची व्यवस्था केली आणि परीक्षेत कॉपी करण्याची मोकळीक दिली तरी हे शक्य होते,' या संदेशाचा त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे.
\Bपत्रात असे आहे म्हटले...\B
काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांपेक्षा संस्थाचालक, संस्था प्रतिनिधी, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षक हेच कॉपी पुरविण्यासाठी अग्रेसर पाहून मन विष्ण्ण झाले. कॉपी पुरविण्यासाठी संस्थाचालक आणि शिक्षकांचा उत्साह वाखणण्यासारखा दिसून आला. जोपर्यंत कॉपी हा प्रकार शिक्षकांच्या डोक्यातून जाणार नाही तोपर्यंत कॉपीमुक्त परीक्षा हे एक स्वप्न म्हणूनच राहणार आहे. दहावीच्या गुणांवर कुठल्याही प्रकारची प्रवेश परीक्षा नाही, हे माहीत असूनही शिक्षक कॉप्या पुरवण्यात का अग्रेसर असतात याचे उत्तर मुळात जाऊन शोधणे गरजेचे आहे. ६० ते ६५ टक्के गुणांची ऐपत असलेल्या विद्यार्थ्याला ८५ ते ९० गुणांपर्यंत नेऊन ठेवून कोणता पुरुषार्थ आपली मंडळी साध्य करणार आहे. कृतीपत्रिका असल्यामुळे कॉपी कमी होईल, अशी अपेक्षा होती. रेडीमेड पुस्तकातून कॉपी करणे शक्य नसल्यामुळे आता परीक्षेच्या प्रत्येक दालनातून 'सामूहिक डिक्टेशन' करण्यात आल्याचे दिसून येते.