म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी वेरूळ आश्रमात दिलेल्या पहाट भेटीने अखेर शांतिगिरी महाराज 'संतुष्ट' झाले असून, त्यांचे लगेच मतपरिवर्तन झाले. त्यानंतर बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेवून 'आपण फक्त आशीर्वाद देऊ' असे म्हणत आपली तलवार म्यान केली. शांतिगिरी महाराजांचा भक्त परिवार फार मोठा आहे. 'जय बाबाजी' या नावाने तो ओळखला जातो. धार्मिक, अध्यात्मिक कामात गुंतलेले महाराज २००९मध्ये राजकीय पटलावर आले. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यावेळचे शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली. खैरे आणि शांतिगिरी महाराज यांचीच चर्चा त्यावेळी होती. शांतिगिरी महाराजांना त्यावेळी एक लाख ४२ हजार मते मिळाली, पण ते विजयी होऊ शकले नाहीत. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा खैरे यांच्या विरोधात उभे राहण्याची तयारी त्यांनी केली होती. त्याच उद्देशाने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज देखील नेले. खैरेंविरोधात यावेळी काँग्रेसकडून आमदार सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडीकडून एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यातच अंर्तगत नाराजी व विरोधामुळे खैरे त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत शांतिगिरी महाराजांनी पुन्हा एकदा उमेदवारी दाखल केली तर, आपल्याला धोका होऊ शकतो हे खैरे यांनी जाणले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खैरे यांनी बुधवारी भल्या पहाटे शांतिगिरी महाराज यांचा वेरूळचा आश्रम गाठला आणि महाराजांचे आशीर्वाद घेतले. खैरेंच्या भेटीमुळे 'समाधानी' झालेल्या महाराजांनी खैरेंच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. खैरेंच्या सोबत उभे राहून फोटोसेशनही केले. \Bअहो, आश्चर्यम् \Bशांतिगिरी महाराज आणि चंद्रकांत खैरे यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. महाराजांनी खैरेंच्या विरोधात वेळोवेळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते यावेळीही खैरेंच्या विरोधात निवडणूक लढवतील असे बोलले जात होते, पण त्यांनी निवडणूक न लढवता आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली. या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट